Tuesday, 4 April 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ५२)



    कित्येकदा खूप सुखं आपल्या वाट्याला येऊ लागल्याचं जाणवतं, परंतु ती आपल्या पदरात पडेपर्यंत अनेक अडचणी येतात आणि मग ज्यांची चाहूल लागलेली असते, अशी कित्येक सुखं आपल्यापर्यंत पोचतच नाहीत. या वास्तवाचं भान असलं, की माणसाला अपेक्षाभंगाचं दुःख भोगावं लागत नाही. झाडाला येणाऱ्या मोहराचं उदाहरण देऊन तुकारामांनी हे अतिशय अर्थपूर्ण रीतीनं समजावलं आहे. ते म्हणतात,

५२
महुरा ऐसी फळे नाही ! आली काही गळती !!१!!
पक्वदशे येती थोडी ! नास आढी वेचे तों !!२!!
विरळा पावे विरळा पावे ! अवघड गोवे सेवटाचे !!३!!
उंच निंच परिवार देवी ! धन्या ठावी चाकरी !!४!!
झळके तेथे पावे आणी ! ऐसे क्षणीं बहु थोडे !!५!!
पावेल तो पैल थडी ! म्हणो गडी आपुला !!६!!
तुका म्हणे उभाऱ्याने ! कोण खरे मानितसे ? !!७!!
              (अभंग क्र. १२९०)

    माणसाच्या मनामधे स्वप्नं निर्माण करण्याची अपार क्षमता असली, तरी त्यानं निर्माण केलेल्या असंख्य, अनंत स्वप्नांपैकी मोजकी स्वप्नंच वास्तवात साकार होत असतात, हा एक कठोर, निर्दय अनुभव तुकारामांनी या अभंगात मांडला आहे.
    झाडावर मोहर जितका येतो, तितकी फळं येत नाहीत. मोहराच्या बाबतीत अनेकदा मनामधे असा विचार येऊन जातो, की निसर्ग हा फार उधळपट्टी करणारा आहे. झाडाची फांदी न् फांदी, डहाळी न डहाळी जेव्हा मोहरून येते, तेव्हा असं वाटतं, की त्यानं ओंजळी भरभरून फळांचे बीजभूत अणुरेणू त्या झाडावर विनाकारण उधळले आहेत. इतक्या मोहराची गरज नव्हती, असंही वाटतं. पण बारकाईनं पाहिलं, की त्याच्या या उधळपट्टीचं रहस्य समजतं. मोहरल्यापासून फलधारणेपर्यंतच्या प्रवासात जे अनंत आघात होतात, त्याचा अनुभव असल्यामुळंच तो ही स्वैर उधळण करीत असतो. अशी प्रचंड उधळण केल्यावर त्या अनंत मोहरकणांपैकी मोजके का होईना सर्व आघातांमधून, सर्व अपघातांमधून वाचून फळांमधे रूपांतरित होतील, हे ओळखून त्यानं असं केलेलं असतं. वादळवारं, गारांचा वर्षाव, कीड इ. प्रकारची अनेक संकटं वाटेत येतात. त्यांना झुकांडी देऊन, त्यांची नजर चुकवून, त्यांचे वार झेलून, त्यांचं प्रतिकार करून काही मोहरकण त्यांच्या तडाख्यातून निसटतात आणि त्यांची फळं बनतात. बाकीचे असंख्य कण गळून जातात, आघातांपुढं शरणागती पत्करतात, प्रवासाच्या प्रारंभीच आपली जीवनयात्रा संपवितात. यानंतरचा प्रवासही सुखरूप नसतो. मोहराची जी फळं बनलेली असतात, त्यापैकी काही फळं लहान असतानाच गळतात. त्यालाही अशाच प्रकारची काही संकटं कारणीभूत होतात. त्यातून जी वाचतात, त्यापैकी थोडीच पक्वदशेला येतात, पाद लागेपर्यंत टिकतात. पाडाला आल्यानंतर शेतकरी फळं झाडावरून उतरवून घेतो आणि चांगली पिकविण्यासाठी त्यांची आढी लावतो. ती फळं पिकत घालतो. पण जितकी फळं आढीला लावली जातात, तितकी सगळी उत्तम रीतीनं पिकून तयार होत नाहीत. काही नासतात. काही इतर कारणांनी खराब होतात. झाडावरून काढताना जमिनीवर आपटलेली वा फुटलेली फळं नीट पिकत नाहीत. उष्णता वगैरेंचं प्रमाण योग्य साधलं नाही, तर काही फळं नासतात. आणि एवढं सगळं घडून गेल्यावर बाकीची फळं आस्वाद घेण्याला योग्य म्हणून तयार होतात. शेतकरी त्यांतील काहींचा आपल्या कुटुंबियांसह आस्वाद घेतो. काही शेजाऱ्यापाजाऱ्यांना व आप्तेष्टांना देतो. काही बाजारात विकतो.
     मोहरापासून सुरु झालेला प्रवास आस्वाद्य अवस्थेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पूर्ण करणारी फळं थोडीच असतात. प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला मोहर बघून शेतकऱ्याच्या मनात जी अनंत स्वप्नं निर्माण झालेली असतात, त्यांपैकी कित्येकांचा चुराडा झाल्याचं त्याला पहावं लागतं. शेतकऱ्याच्या जीवनात येणाऱ्या स्वप्नभंगाच्या या वेदना कमालीच्या क्लेशकारक असतात. इतर क्षेत्रांतील कोणा व्यक्तींच्या वाट्याला अशा वेदना क्वचितच येत असतील. उत्तम मशागत करावी, तर पेरणीसाठी पाऊस वेळेवर पडत नाही. पाऊस वेळेवर पडून पेरणी उत्तम झाली, तर नंतर पाऊस ओढ देतो आणि आलेले अंकुर कोमेजून जातात. पुढं तण वगैरे काढून पीक जोमात आल्यामुळं मन हरखून जावं, तोवर टोळधाड वा किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यातून वाचून कणसं छानपैकी फुलोऱ्यावर आली, तर धोधो पाऊस पडून फुलोरा झडतो आणि पिशा उरतात. प्रत्येक पिकाच्या बाबतीत केव्हा ना केव्हा असंच काही तरी घडतं. किती वेळा स्वप्नं हिरवळतात आणि पुन्हा कोमेजतात. आपण जेवढी स्वप्नं पाहतो, तेवढी कधीही सफल होत नसतात; म्हणून स्वप्नं पहायचं बंदही करायचं नाही आणि स्वप्नभंग झाला म्हणून खचायचंही नाही, हे चित्त स्थिर ठेवण्याचं तत्त्वज्ञान समाजाच्या सर्व घटकांना शेतकऱ्याकडून शिकता येतं. तुकारामांनी ते या अभंगात अतिशय प्रभावी रीतीनं मांडलं आहे.
    मोहरापासून अखेरच्या उत्तम अवस्थेपर्यंत जशी थोडीच फळं पोचतात, तसंच मानवी जीवनात हाती घेतलेलं काम मधे येणाऱ्या सर्व संकटांवर मात करून तडीला नेणारे लोकही विरळेच असतात. अनेक जण वाटेत अडखळतात, मरगळतात, थकतात आणि हार मान्य करून प्रवास थांबवतात. शेवटचं 'गोवे' म्हणजे ठिकाण वा मुक्काम गाठणारे बहाद्दर फार थोडे असतात. त्या मुक्कामापर्यंत पोचणं हे फार अवघड असतं. देवाजवळ उच्च, नीच अशा सर्व लोकांचा परिवार असतो. पण सगळे जण सारखी भक्ती करणारे नसतात. खरी भक्ती करणारे, भक्तीचा अत्युच्च टप्पा गाठणारे मोजकेच असतात. एखाद्या धन्याकडं अनेक जण चाकरी करीत असतात. पण त्यांतील प्रामाणिक कोण आणि अप्रामाणिक कोण, हे त्या धन्याला कळत असतं. जो आपल्या कर्तृत्वानं, निष्ठेनं, प्रामाणिकपणानं झळकतो, त्याच्याजवळच मालक जातो, त्याला जवळ करतो. परंतु असे लोक फार थोडे असतात.
     कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना येणाऱ्या सर्व अडथळ्यांना ओलांडून पैल थडीला पोचणारा एखादाच असतो. तो खरा आपला गडी होय. तो खरा कर्तृत्ववान, पराक्रमी, शूर होय. पिकून तयार होणारं फळ हे जसं खरं फळ, तसा हा खरा माणूस होय. असं कर्तृत्व नसताना नुसती बाह्य उभारी दाखविणारे, उसनं अवसान आणणारे, फुशारकी मारणारे लोक हे कसोटीवर टिकत नाहीत. त्यांना कोणी खरा मान देत नाही.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Sunday, 2 April 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ५१)

मानवी जीवनात सतत चढ-उतार होत असतात. माणसानं अशा गोष्टींना संतुलित वृत्तीनं सामोरं जावं, हा संदेश तुकारामांनी एका अतिशय सुरेख अभंगात दिला आहे. ते म्हणतात,

५१

कैं वाहावे जीवन ! कैं पलंगीं शयन !!१!!
जैसी जैसी वेळ पडे ! तैसे तैसे होणे घडे !!२!!
कैं भौज्य नानापरी ! कैं कोरड्या भाकरी !!३!!
कैं बसावे वहनीं ! कैं पायी अन्हवाणी !!४!!
कैं उत्तम प्रावर्णे ! कैं वसने ती जीर्णे !!५!!
कैं सकळ संपत्ती ! कैं भोगणे विपत्ती !!६!!
कैं सज्जनाशी संग ! कैं दुर्जनाशी योग !!७!!
तुका म्हणे जाण ! सुख दुःख ते समान !!८!!
                 (अभंग क्र. २८१९)

कधी सेवक बनून पाणी वाहून नेण्याचं काम करावं, तर कधी धनवंत बनून पलंगावर झोपण्याचं सुख भोगावं. माणसाच्या जीवनात येणारे हे परस्परविरोधी प्रसंग असतात. आपल्यावर जशी वेळ येईल, तसं तिला सामोरं जावं. कधी नाना प्रकारच्या पक्वान्नांचं भोजन करायला मिळतं, तर कधी कोरड्या भाकरी खाण्याचा प्रसंगही अनुभवावा लागतो. कधी वाहनात बसून आरामशीर प्रवास करण्याची संधी मिळते, तर कधी अनवाणी पायी चालण्याची वेळ येते. कधी उत्तम वस्त्रं परिधान करायला मिळतात, तर कधी जुने, फाटके कपडे वापरावे लागतात. कधी सर्व प्रकारची संपत्ती लाभते, तर कधी संकटांचे भोग भोगावे लागतात. कधी सज्जनांची संगत लाभते, तर कधी दुर्जनांचा सामना करावा लागतो. जीवन हे असं आहे. या प्रवासात सुखंही वाट्याला येतात आणि दुःखंही भोगावी लागतात. विवेकी माणूस सुखांच्या काळात हुरळून जात नाही, उद्दाम होत नाही आणि दुःखांच्या काळात खचून जात नाही, वैफल्यग्रस्त होत नाही. दोन्ही प्रकारच्या अवस्थांमधे जो आपल्या मनाचं संतुलन राखतो, त्याचंच जीवन खऱ्या अर्थानं कृतार्थ होतं.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Sunday, 12 March 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ५०)

श्रम न करता कोणाकडून फसवून वा लुबाडून काही घेणं आणि या मार्गानं श्रीमंत बनणं वा आपला संसार समृद्ध करणं तुकारामांना मान्य नव्हतं. एका अभंगात ते म्हणतात,
५०

चाकरीवाचून ! खाणे अनुचित वेतन !!१!!
धणी काढोनिया निजा ! करील ये कामाची  पूजा !!२!!
उचितावेगळे ! अभिलाषे तोंड काळे !!३!!
सांगे तरी तुका ! पाहा लाज नाही लोकां !!४!!
                 (अभंग क्र. २२१३)

ज्या कामासाठी वेतन घ्यायचं, ते काम न करता वेतन घेणं हे अनुचित होय. कुणीही कामचुकारपणा करू नये, हे समाजव्यवस्थेच्या निकोप धारणेसाठी आवश्यक असतं. परंतु अनेकदा समाजामधे वेगळं चित्र दिसतं. अनेकांना कष्ट नको असतात आणि सुखोपभोग मिळविण्याची मोठी लालसा मात्र असते. व्यक्तिगतदृष्ट्या हे अनैतिक असतं आणि समाजहिताच्या दृष्टीनंही घातक असतं. तुकारामांनी या अभंगाद्वारा तमाम लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. मालकाला जे काम करून घ्यायचं असतं, ते काम झाल्यानंतर तो काम करणाऱ्याच्या कामाची पूजा करतो. परंतु, जो या उचित पद्धतीपेक्षा वेगळं करतो आणि काम न करता वेतनाची अभिलाषा करतो, त्यांचं तोंड काळं होय. याचा अर्थ कामचुकारपणा करून वेतन घेणाऱ्याची अखेरीस अपकीर्तीच होते, तो लोकांच्या नजरेतून उतरतो, लोक त्याला ऐतखाऊ म्हणतात आणि खरं काम करण्याचा जो आनंद असतो, त्या आनंदालाही तो मुकतो. तुकाराम हे आग्रहानं सांगत असतानाही काही लोकांवर त्यांचा योग्य परिणाम होत नव्हताच, त्यांचा अनुकूल प्रतिसाद मिळत नव्हताच, त्यांच्यामधे परिवर्तन होत नव्हतंच. कितीही सांगितलं, तरी त्याकडं लक्ष न देणाऱ्या या लोकांना तुकाराम काहीशा त्राग्यानं निलाजरे म्हणतात.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Saturday, 11 March 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ४९)

काम टाळण्याची प्रवृत्ती असलेले लोक कशा प्रकारे सबबी सांगतात, ते काहीशा विनोदी पद्धतीनं तुकारामांनी एका अभंगात पुढीलप्रमाणे नोंदविलं आहे:

४९
ढालतलवारें गुंतले हे कर ! म्हणे मी जुंझार कैसा झुंजो !!१!!
पेटी पडदळे सिले टोप ओझे ! हे तो जाले दुजे मरणमूळ !!२!!
बैसविले मला येणें अश्वावरी ! धावू पळू तरी कैसा आता ? !!३!!
असोनि उपाय म्हणे हे अपाय ! म्हणे हायहाय काय करू !!४!!
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म ! मूर्ख नेणे वर्म संतचरण !!५!!
                       (अभंग क्र. ४३४८)

         स्वतःला पराक्रमी समजणारा एक योद्धा म्हणतो, "मी झुंजार आहे, परंतु माझे हे हात ढाल आणि तलवार धरण्यात गुंतले आहेत, मग मी कसा झुंजू ? पोटावर तलवार अडकवण्यासाठी पट्टा आहे, हत्यारं आहेत, डोक्यावर जिरेटोप आहे. हे ओझं तर मरणाचं दुसरं कारण झालं आहे. यानं मला घोड्यावर बसविलं आहे. मी आता धावू-पळू तरी कसा ?" अशा रीतीनं उपाय ठरणाऱ्या गोष्टींना तो अपाय म्हणत आहे. तो 'हाय हाय, मी काय करू ?' असं म्हणत आहे. तुकाराम म्हणतात, "खरं तर हा स्वतः परब्रह्म आहे. परंतु, हे कळण्यासाठी संतांच्या चरणाजवळ बसलं पाहिजे, हे रहस्य या मूर्खाला कळत नाही."
         ज्या गोष्टी यशाचं साधन बनू शकतात, त्या गोष्टीच आपल्या यशाच्या मार्गातील अडथळा आहेत, असं सांगून काम टाळणाऱ्या लोकांचं हे वर्णन वरवर पाहता अतिशयोक्तीचं वाटलं, तरी प्रत्यक्षात अशा सबबी सांगण्याची प्रवृत्ती आपल्याला सर्रास आढळते. माणसाकडं मोठमोठी कामं करण्याची प्रचंड शक्ती असते. परंतु अनेकदा त्याला स्वतःकडं असलेल्या त्या शक्तीचं भान नसतं. तो प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिला असता, त्याला आपल्या या शक्तीचं भान येऊ शकतं. तो त्यांच्याकडून स्फूर्ती घेवू शकतो. परंतु लोक अशी स्फूर्ती घेण्याऐवजी काम टाळण्यासाठी कुठली ना कुठली निमित्तं सांगत बसतात. त्यामुळं ती स्वतःचंच सुख गमावून बसतात. संत तुकारामांनी कामचुकार लोकांच्या विशिष्ट प्रवृत्तीवर अचूक बोट ठेवलं असून ती प्रवृत्ती दूर ठेवण्याची दृष्टी दिली आहे.

(संग्राहकसंजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील )
९४२२३४५३६८
 

Saturday, 25 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ४८)

मनुष्य कोणता का व्यवसाय करीत असेना, तो जर प्रामाणिकपणे कष्ट करीत असेल, तर धनसंपत्ती त्याच्याकडं आपोआप चालून येते, हे व्यापाराचं उदाहरण देऊन तुकारामांनी एका अभंगात स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात,

४८

धनवंता घरीं ! करी धन चि चाकरी !!१!!
होय बैसल्या व्यापार ! न लगे सांडावे चि घर !!२!!
रानीं वनीं द्वीपीं ! असती ती होती सोपी !!३!!
तुका म्हणे मोल ! देता काही नव्हे खोल !!४!!
                  (अभंग क्र. २७९९)

ज्यानं प्रयत्न करून धन मिळवलेलं असतं, त्याच्या घरी धनच चाकरी करू लागतं. व्यापाराचं उदाहरण घेतलं, तरी हे स्पष्ट होतं. व्यापार घरबसल्या होत असतो. ग्राहक व्यापाऱ्याकडं येत असल्यामुळं व्यापाऱ्याला घर सोडावं लागतच नाही. मनुष्य रानात असो, वनात असो अथवा बेटावर असो, त्याच्याकडं धन असलं, की त्याची सगळी कामं सोपी होतात. त्याला जे काही हवं असतं, त्याची किंमत मोजली, की त्याला सर्व काही मिळतं, त्याच्या दृष्टीने काही अवघड रहात नाही. संसार सुखाचा करू इच्छिणाऱ्या माणसानं धनाचा द्वेष करू नये, कोणता ना कोणता उद्योग नीट करून धन मिळवावं आणि त्याच्या आधारे आपलं जीवन सफल करावं, हा तुकारामांचा मोलाचा सल्ला आहे.

(संग्राहक संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Saturday, 18 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ४७)

संसार
      संसार यशस्वी कसा करावा, याचं अगदी व्यावहारिक आणि तरीही सैद्धांतिक स्वरूपाचं वर्णन करणारा त्यांचा एक अभंग अतिशय विख्यात आहे. त्यामधे ते म्हणतात,

४७

जोडोनिया धन उत्तम वेव्हारें ! उदास विचारें वेच करी !!१!!

उत्तम चि गती तो एक पावेल ! उत्तम भोगील जीव खाणी !!२!!

परउपकारी नेणे परनिंदा ! परस्त्रिया सदा बहिणी माया !!३!!

भूतदया गाईपशूचे पालन ! तान्हेल्या जीवन वनामाजी !!४!!

शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट ! वाढवी महत्त्व वडिलांचे !!५!!

तुका म्हणे हे चि आश्रमाचे फळ ! परमपद बळ वैराग्याचे !!६!!
                          (अभंग क्र. २८६४)

            उत्तम व्यवहार करून धन जोडावं. याचा अर्थ ते गैरमार्गानं मिळवू नये. कुणाला फसवून, कुणाला लुबाडून मिळवू नये. दुसऱ्याच्या कष्टाचं फळ आपण ओरबडून घेऊ नये. कष्ट करावेत. राबावं. घाम गाळावा. शहाणपणानं नेटका, निर्दोष व्यवहार करावा आणि या पद्धतीनं धन मिळवावं. समृद्धी उभी करावी. अशा नैतिक मार्गानं मिळवलेलं जे धन असेल, त्याच्या मोहात मात्र अडकू नये. त्याची आसक्ती धरू नये. त्याचा योग्य उपयोग जरूर करावा, पण तो काहीसा तटस्थपणानं, अलिप्त वृत्तीनं करावा. संपत्तीच्या बाबतीत अत्यंत संतुलित भूमिका तुकारामांनी इथं मांडल्याचं आढळतं. जो मनुष्य इतक्या विचारी पद्धतीनं वर्तन करील, तो उत्तम गतीच प्राप्त करील. त्याचं कल्याण होईल. इथं परंपरागत पद्धतीनं पारलौकिक गतीही तुकारामांना अभिप्रेत असली, तरी ते ऐहिक गतीलाही अचूकपणे लागू पडतं, यात शंका नाही.
           वर्तनाचे आणखीही काही नियम तुकारामांनी इथं सांगितले आहेत. माणसानं दुसऱ्यावर उपकार करावा. अडीअडचणीत असलेल्या, गोरगरीब, दुःखीकष्टी माणसांना मदत करावी. या उपदेशानुसार वागणारा हा मनुष्य दुसऱ्याची निंदाही करीत नाही. याचा अर्थ दुसऱ्याचा मत्सर करण्याची, द्वेष करण्याची त्याची वृत्ती नसते. परस्त्रियांना तो मायबहिणींप्रमाणं मानतो. याचा अर्थ तो आपलं शील जपतो. पत्नीची अवहेलना करीत नाही. तिच्याशी सुखसमाधानानं संसार करतो. त्याच्या अंगी भूतदया असते. प्राणिमात्रांविषयी कणव असते. आपलेपणा असतो. त्यांच्या सुखदुःखांत सहभागी होण्याची वृत्ती असते. तो गाईंचं व इतर गुरांचं नीट पालन करतो. त्यांची काळजी घेतो. त्याद्वारे घरात दूधदुभतं भरपूर मिळेल, अशी व्यवस्था करतो. रानावनात कोणी तहानलेला असेल, तर त्याला पाणी देतो. याचा अर्थ कोणी संकटात असला, तर त्याला मदतीचा हात देतो. त्याच्याशी बेपर्वाईनं वागत नाही. त्याची उपेक्षा करीत नाही. त्याच्याशी आपलं काय देणं-घेणं आहे, अशी भूमिका घेत नाही. तो आपली मनःशांती ढळू देत नाही. माणसाच्या जीवनात अनेकदा अस्वस्थ होण्यासारखे प्रसंग येतात. संकटांचे आघात होतात. निंदा-टीका पचवण्याचे प्रसंग येतात. परंतु हे सर्व शांतपणे झेलण्याची मनोवृत्ती त्यांच्याकडं असते. तो अशा प्रसंगांमुळं खचून जात नाही. आपला तोल जाऊ देत नाही. मनःशांती ढळू देत नाही. तो कुणाचंही वाईट चिंतत नाही. दुसऱ्याचं नुकसान व्हावं, म्हणून त्यांच्या मार्गात काटे पेरण्याचा दुष्टावा करीत नाही. अशा प्रकारच्या वर्तनामुळं तो आपल्या वडिलांचं महत्त्व वाढवतो. आपल्या वाडवडिलांचा, पूर्वजांचा लौकिक वाढवतो. अमुक-अमुक दांपत्याचा मुलगा असा विवेकी, निःस्पृह, संयमी, समंजस, कर्तबगार आहे, असं लोक म्हणतात, तेव्हा त्याच्या आईवडिलांचा गौरव होतो. अशा प्रकारचं अत्यंत समाधानी, तृप्त, निरामय जीवन हेच गृहस्थाश्रमाचं फळ होय. संसार करायचा, तो अशा प्रकारचं आनंदी जीवन भोगण्यासाठीच होय. संपत्तीची हाव धरून, त्यासाठी अनिष्ट मार्ग पत्करून, इतरांना लुबाडून, अन्याय करून वैभव उभं करणं आणि विलासात, सुखोपभोगात लोळणं, हे काही गृहस्थाश्रमाचं प्रयोजन नव्हे. संसारात राहून संयत जीवन जगणं, ही खरं तर वैराग्याची सर्वोच्च अवस्था म्हटली पाहिजे, हे वैराग्याचं सामर्थ्य म्हटलं पाहिजे. वैराग्य अनुभवण्यासाठी बैरागी होण्याची वा संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहून, संयमपूर्वक अनुरागी बनूनही वैराग्याचा अनुभव घेता येतो, यात शंका नाही.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Monday, 13 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (चमत्कार ४६)

तुकारामांच्या ईश्वरविषयक धारणा अतिशय वस्तुनिष्ठ होत्या. ईश्वर आपल्या स्वतःच्या जवळच असतो, त्याला इतरत्र शोधणं व्यर्थ आहे, अशी त्यांची भावना होती. एका अभंगात ते म्हणतात,

४६

देहीं असोनिया देव ! वृथा फिरतो निर्दैव !!१!!
देव आहे अंतर्यामीं ! व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं !!२!!
नाभी मृगाचे कस्तुरी ! व्यर्थ हिंडे वनांतरीं !!३!!
साखरेचे मूळ ऊस ! तैसा देहीं देव दिसे !!४!!
दुधीं असता नवनीत ! नेणे तयाचे मथित !!५!!
तुका सांगे मूढजना ! देहीं देव का पाहाना !!६!!
                      (अभंग क्र. ४४८२)

देव आपल्या शरीरातच असतो, याचा अर्थ आपल्या ठिकाणी जे सद्गुण असतात, जे चांगले आचारविचार असतात, त्यांच्यामधेच ईश्वराचं अस्तित्व असतं. कित्येकदा माणसाला हे कळत नाही. तो ईश्वराचा शोध घेण्यासाठी उगाचच बाहेरच्या जगात फिरत असतो. स्वतःच्या ठिकाणी असलेल्या सर्वश्रेष्ठ वैभवाचं भान नसलेला हा मनुष्य दुर्दैवीच म्हणावा लागेल. देव त्याच्या अंतर्यामीच असतो, परंतु तो त्याचा शोध घेण्यासाठी उगाचच तीर्थक्षेत्रं धुंडाळत असतो. त्याचं हे वागणं कस्तुरीमृगासारखं असतं. त्या मृगाचा नाभीमधेच कस्तुरी असते. परंतु तो तिचा शोध घेण्यासाठी सगळ्या वनामधे उगाचच हिंडत राहतो. खरं म्हणजे ऊस हेच जसं साखरेचं उगमस्थान असतं, साखर सत्त्वरूपानं मूलतः उसातच असते, तसा देव माणसाच्या देहातच असतो. लोणी दुधातच असतं, परंतु त्या दुधाचं दही बनवावं आणि त्याचं मंथन करून लोणी मिळवावं, हे ज्याला कळत नाही, तो इतर मार्गांनी कितीही प्रयत्न केले, तरी लोणी मिळवू शकत नाही. आपल्या आत डोकावून न पाहणाऱ्या, स्वतःच्या अस्तित्वाचा नीट शोध न घेणाऱ्या लोकांविषयी तुकाराम करुणेपोटीच नाराजी व्यक्त करतात. तुम्ही असे कसे मूढ आहात, स्वतःच्या शरीरात तुम्ही देवाला का पहात नाही, असा वेडेपणा का करीत आहात, असा प्रश्न त्यांनी लोकांना अगदी तळमळीनं विचारला आहे. ईश्वराच्या अस्तित्वाचा, स्वरूपाचा आणि स्थानाचा शोध कसा घ्यावा, याविषयीचं तुकारामांनी केलेलं हे मार्गदर्शन सत्यही आहे आणि सुंदरही आहे.

(संग्राहकसंजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Saturday, 11 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (चमत्कार ४५)

तुकारामांनी शुभ आणि अशुभ यांच्या संदर्भात आपल्याला एक अतिशय आश्वासक संदेश दिला आहे. एवढ्या महान संतानं दिलेला हा संदेश आपण ध्यानात घेतला नाही, तर आपल्यासारखे करंटे आपणच, असं म्हणावं लागेल. ते म्हणतात,

४५

शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ ! अशुभ मंगळ मंगळाचे !!१!!
हातीचिया दीपें दुराविली निशी ! न देखिजे कैसी आहे ते ही !!२!!
सुख दुःखाहूनि नाही विपरीत ! देतील आघात हितफळे !!३!!
तुका म्हणे आता आम्हांसी हे भले ! अवघे चि जाले जीव जंत !!४!!
                                (अभंग क्र. २००३)

या अभंगात सर्व दिशा आणि काळ शुभ झाले, एवढेच सांगून ते थांबत नाहीत. सर्वसामान्य माणसं ज्यांना अशुभ म्हणतात, त्या गोष्टी आमच्या दृष्टीनं मंगलातील मंगल, शुभातील शुभ म्हणजे सर्वांत शुभ झाल्या आहेत, असं म्हणतात. तुकारामांवर अपार प्रेम करणाऱ्या लोकांनी त्यांच्या या वृत्तीचा अंगीकार केला पाहिजे, असं मला वाटतं. माणसांमधे आरपार बदल करून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्या या विचारात आहे. याच अभंगात त्यांनी पुढं काढलेले उद्गार कसे आत्मविश्वासानं ओतप्रोत भरलेले आहेत. हातात घेतलेल्या दिव्यामुळं रात्र दुरावली आहे आणि ती कशी आहे, ते दिसतही नाही इतकी दुरावली आहे, असं ते म्हणतात. हा दिवा विचारांचा आहे. विवेकाचा आहे. ज्ञानाचा आहे. मानसिक सामर्थ्याचा आहे. अज्ञानाची आणि दुबळेपणाची रात्र कुठल्या कुठं पळून गेली आहे. ते केवळ एक आत्मनिष्ठ अनुभव म्हणून ते सांगत आहेत, असं नाही. आपल्या तमाम भावंडांनी हा विचार पचवावा, हे सामर्थ्य प्राप्त करावं, अशीच त्यांची भावना आहे. असं सामर्थ्य प्राप्त झालं, की अशुभाचंही शुभात रूपांतर होतं. आघात देखील हितकारक फळं देतील, याचा अर्थ संकटं नुसती दूर होतील वा नष्ट होतील असं नाही, तर त्या संकटांचंच हितकारक, कल्याणकारक गोष्टींमध्ये रूपांतर होईल. स्वतःचं आंतरिक विश्व बदललं, की बाहेरचं अवघं विश्वही बदलेल. मग कुणी अशुभ, अपवित्र आहे, ही भावना राहणार नाही. सगळे प्राणीही भले वाटू लागतील. चांगले वाटू लागतील. या अभंगाच्या अखेरीस तुकाराम म्हणतात, की सर्व जीवजंतू हे आता त्यांच्या दृष्टीनं भले झाले आहेत. मनाची उत्कट प्रसन्नतेनं फुललेली ही अवस्था आपल्याला लाभावी, असं कुणालाही वाटावं, इतकं मोठं वैभव या उद्गारात आहे.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

संत तुकारामांचे अभंगशतक (चमत्कार ४४)

काही लोक आपल्याकडं विशिष्ट प्रकारच्या शक्ती आहेत, इतरांकडं नसलेलं ज्ञान आहे, असं भासवून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात. तुकाराम अशा लोकांवर टीका करतात, याचा अर्थ सर्वसामान्य लोकांनी अशा ढोंगी लोकांपासून सावध रहावं, असंच सांगू इच्छितात. एका अभंगात त्यांनी म्हटलं आहे,

४४

सांगो जाणती शकुन ! भूत भविष्य वर्तमान !!१!!
त्यांचा आम्हांसी कंटाळा ! पाहो नावडती डोळां !!२!!
रिद्धीसिद्धींचे साधक ! वाचासिद्ध होती एक !!३!!
तुका म्हणे जाती ! पुण्यक्षयें अधोगती !!४!!
                          (अभंग क्र. १५०१)

आपल्याला शकुन-अपशकुनांची फळं कळतात, आपण अंतर्ज्ञानानं, भूत-भविष्य-वर्तमान अशा तिन्ही काळांतील घटना सांगू शकतो, असे काही लोक म्हणत असतात. ज्योतिषी, मांत्रिक वगैरे लोकांचा यांच्यामधे अंतर्भाव होतो. परंतु या लोकांकडं प्रत्यक्षात असं कोणतंही सामर्थ्य नसतं, हे तुकाराम निःसंदिग्धपणे जाणत होते. म्हणूनच, आपल्याला असं सांगणाऱ्यांचा कंटाळा आहे. आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडं पाहणं देखील आपल्याला आवडत नाही, असं तुकाराम अगदी ठणकावून सांगतात. आपल्याला रिद्धीसिद्धी नावाच्या अलौकिक शक्ती प्राप्त झाल्या आहेत, असं काही जण सांगतात. काही जण आपण 'वाचासिद्ध' आहोत, असं म्हणतात. म्हणजेच, आपण जे जे बोलतो, ते ते घडतं, असं ते भासवतात. अशा प्रकारचे लोक पुण्याचा क्षय होऊन अधोगतीला जातात, असं तुकाराम म्हणतात. याचा अर्थ, लोकांची अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांनी पूर्वी जरी काही सत्कर्म केलेली असली, तरी तीही वाया जातात. जे निष्पाप लोकांची वंचना करतात, त्यांचा स्वतःचाही अधःपात होतो, मग ते इतरांचं कल्याण करतील ही शक्यताच नाही. म्हणून, लोकांनी त्यांच्यापासून सावध रहावं, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये वा विसंबून राहू नये, असं तुकाराम महाराज सुचवत आहेत.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Tuesday, 7 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (चमत्कार ४३)

लोकांची फसवणूक करणाऱ्या चमत्कारासारख्या नाना प्रकारच्या चुकीच्या आणि घातक समजुती, प्रथा इत्यादींना तुकारामांचा कमालीचा विरोध होता. आपली ही भूमिका त्यांनी एका अभंगात अनेक उदाहरणांनी स्पष्ट केली आहे. आपल्या गोरगरीब लोकांनी अशा प्रथांसाठी आपलं धन, आपला वेळ, आपले श्रम वाया घालवू नयेत, हा तुकारामांच्या मिळणारा संदेश आपल्याला सदैव मार्गदर्शन करणारा आहे. ते म्हणतात,

४३

कपट काही एक ! नेणे भुलवायाचे लोक !!१!!
तुमचे करितो कीर्तन ! गातो उत्तम ते गुण !!२!!
दाऊ नेणे जडीबुटी ! चमत्कार उठाउठी !!३!!
नाही शिष्यशाखा ! सांगो अयाचित लोकां !!४!!
नव्हे मठपति ! नाही चाहुरांची वृत्ती !!५!!
नाही देवार्चन ! असे मांडिले दुकान !!६!!
नाही वेताळ प्रसन्न ! काही सांगो खाण खुण !!७!!
नव्हे पुराणिक ! करणे सांगणे आणीक !!८!!
नेणे वाद घटा पटा ! करिता पंडित करंटा !!९!!
नाही जाळीत भणदी ! उदो म्हणोनि आनंदी !!१०!!
नाही हालवीत माळा ! भोवते मेळवुनि गबाळा !!११!!
आगमीचे कुडे नेणे ! स्तंभन मोहन उच्चाटणे !!१२!!
नव्हे यांच्या ऐसा ! तुका निरयवासी पिसा !!१३!!
                     (अभंग क्र. २७२)

मी लोकांना भुलवण्याचं कोणतंही कपट जाणत नाही. मी तुमचं कीर्तन करतो आणि उत्तम गुण गातो. मी जडीबुटी दाखवणं जाणत नाही. मी आकस्मिक म्हणजेच निसर्गातील कारणकार्यसंबंधाच्या विरोधात जाणारे चमत्कार दाखवणं जाणत नाही. माझी शिष्यशाखा नाही. मी बोलावलेले नसताना कोणी लोक आले, तर त्यांना काही सांगतो, इतकंच. मी मठपती नाही. मी उदरनिर्वाहासाठी कुणाकडं चाहूरभर जमीन मागत नाही. मी देवपूजा करण्याचं दुकान मांडलेलं नाही. लोकांना काही खाणाखुणा सांगण्यासाठी मला वेताळ प्रसन्न नाही. मी करायचं वेगळं आणि सांगायचं वेगळं असं करणारा पुराणिक नाही. करंट्या पंडितासारखा घटा-पटाचा वाद करणं मी जाणत नाही. मी 'उदो' म्हणून आनंदानं धूप जाळत नाही. मी गबाळ्या म्हणजेच भोळ्या लोकांना भोवती जमवून माळा हलवीत नाही. मी धर्मशास्त्रातील कोड्यासारख्या गूढ गोष्टी जाणत नाही. मी व्यक्तीला जागच्या जागी थांबवणं, तिला मोहिनी घालणं, तिचं उच्चाटन करणं, अशा वेदातील म्हणजेच या संदर्भात अथर्ववेदातील विद्या जाणत नाही. तुका नरकात वास्तव्य करणाऱ्या म्हणजे दुर्गतीला जाणाऱ्या या लोकांसारखा वेडा नाही.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Monday, 6 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (अनुभव ४२)

जो मनुष्य स्वानुभवाच्या आधारे डोळस बनतो, चोखंदळ बनतो, त्याच्यापुढं कुणाची ढोंगबाजी चालत नाही, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एका अभंगात अनेक उदाहरणं दिली आहेत. ते म्हणतात,

४२

तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोलें ! जरी हिंडविले देशोदेशीं !!१!!
करणीचे काही न मने सज्जना ! यावे लागे मना वृद्धांचिया !!२!!
हिरियासारिखा दिसे शिरगोळा ! पारखी ते डोळां न पाहाती !!३!!
देऊनिया भिंग कामाविले मोती ! पारखिया हातीं घेता नये !!४!!
तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ ? ! आपुले हे चित्त आपणा ग्वाही !!५!!
                              (अभंग क्र. ४१०१)

तांब्याचं नाणं वेगवेगळ्या देशांत नेऊन चालविण्याचा प्रयत्न केला, तरी ते खऱ्या (सोन्याचा) नाण्याच्या मोलानं चालत नाही. चुकीचं वागणं सज्जनाच्या मनाला आवडत नाही. आपलं वागणं अनुभवी माणसांच्या मनाला पटायला हवं. गारगोटी हिऱ्यासारखी दिसते, परंतु हिऱ्याची पारख असलेले लोक तिच्याकडं नजरही टाकत नाहीत. काच देऊन मोती घेण्याचा प्रयत्न केला, तर पारख असलेले लोक ती काच हातातही घेत नाहीत. तुकाराम म्हणतात, उगाच नटून काय उपयोग ? आपण कसे आहोत, याला आपलं मन साक्षी असतं.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Friday, 3 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (अनुभव ४१)

तुकारामांनी एका अभंगात अनुभवाचे वेगवेगळे पैलू काही उदाहरणांच्या आधारे स्पष्ट करून दाखविले आहेत. ते म्हणतात,

४१

लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री ! अग्नि टणत्कारीं दिसो येतो !!१!!
सांगावे ते काई सांगावे ते काई ? ! चित्ता होय ठायीं अनुभव तो !!२!!
अन्नें सांगो येतो तृप्तीचा अनुभव ! करूनि उपाव घेऊ हेवा !!३!!
तुका म्हणे मिळे जीवनीं जीवन ! तेथे कोणा कोण नाव ठेवी ? !!४!!
                   (अभंग क्र. ३१५२)

अग्नी निर्माण करण्यासाठी लोखंड कापूस गारगोटी यांसारखी साधनसामग्री सिद्ध असली, तरी त्यांचं घर्षण झाल्यानंतरच अग्नी प्रकट होतो. याचा अर्थ नुसती साधनसामग्री असून भागत नाही. तिचा योग्य रीतीनं प्रयत्नपूर्वक वापर केला, तरच आपल्याला हवं ते फळ मिळतं. या बाबतीत 'सांगावे ते काई' असा प्रश्न त्यांनी दोनदा विचारला आहे. याचा अर्थ अनुभवाचं महत्त्व कितीही सांगितलं, तरी ते वर्णन पूर्ण होऊ शकणार नाही, अशी त्यांची भावना आहे. साध्य प्राप्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा प्रयत्नपूर्वक वापर केल्यानंतरच फळ मिळतं, हा अनुभव आपल्या मनाला मिळतो, असं ते म्हणतात. अन्नाचं नुसतं वर्णन करून तृप्ती मिळत नाही. अन्नाचं भक्षण केलं, तर तृप्तीचा अनुभव येतो आणि मग त्या अनुभवाचं वर्णन करता येतं. हे एकदा कळलं, की आपण अन्न मिळविण्याचा उपाय करतो. जगामधे वेगवेगळ्या माणसांचा वेगवेगळ्या माणसांशी संपर्क येतो, लोक विविध पदार्थांच्याही संपर्कात येतात. अशा वेळी हा संपर्क एकमेकात मिसळून गेल्यासारखा अनुकूल झाला, तर जीवन आनंदी होतं. एकमेकांच्या संपर्कात येणारे लोक एकमेकांना समजून घेतात, एकमेकांवर प्रेम करतात. मग कोणी कोणाला नावं ठेवत नाहीत. दूषणं देत नाही. हा मनाला प्रसन्न करणारा ऐक्याचा उत्कट अनुभव असतो.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Thursday, 2 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (अनुभव ४०)

ऐकीव माहिती, काल्पनिक कथा यांसारख्या गोष्टींपेक्षा अस्सल अनुभवाला महत्त्व देणं, हे तुकारामांच्या विचारसरणीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. एका अभंगात ते म्हणतात,

४०

नका दंतकथा येथे सांगो कोणी ! कोरडे ते मानी बोल कोण ? !!१!!
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार ! न चलती चार आम्हांपुढे !!२!!
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी ! राजहंस दोन्ही वेगळाली !!३!!
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ! येरा गाबाळाचे काम नाही !!४!!
                     (अभंग क्र. ३१२८)

इथं कुणी दंतकथा सांगू नका. अनुभवाचा आधार नसलेल्या दंतकथांमधील कोरडे बोल कोण मान्य करणार ? या जगात अनुभव हाच शिष्टाचार व्हायला हवा. अनुभवाचं पाठबळ नसलेले चाळे आमच्यापुढं चालणार नाहीत. अस्सल अनुभव कोणता आणि निराधार दंतकथा कोणती, हे विवेकी माणसाला नक्कीच ओळखता येतं.  दूध आणि पाणी एकत्र मिसळून आलं, तरी राजहंस त्यांना वेगळं करून योग्य ती निवड करतो, तसंच विवेकी माणसाचं असतं. अस्सल अनुभव जगणाऱ्या विवेकी, जातिवंत माणसांकडूनच खऱ्या-खोट्याचा योग्य निवाडा केला जातो. ज्यांच्याकडं विवेक नसतो, अशा भ्रमांवर जगणाऱ्या गबाळ्या लोकांना असा निवाडा करता येत नाही, हे त्यांचं काम नव्हे.


(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Tuesday, 31 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३९)

संतांची भेट झाली, की त्यांच्याकडून काहीतरी हिताचंच ऐकायला मिळतं, हे स्पष्ट करताना तुकाराम एका अभंगात म्हणतात,

३९

भल्याचे दर्शन ! तेथे शुभ चि वचन !!१!!
बोलावी हे धर्मनीत ! क्षोभें होत नाही हित !!२!!
मर्यादा ते बरी ! वेळ जाणावी चतुरी !!३!!
तुका म्हणे बहु ! लगे ऐसे बरे मऊ !!४!!
                    (अभंग क्र. ३०४०)

भल्या माणसाची भेट झाली, की त्याच्या तोंडून काही तरी हिताचंच ऐकायला मिळतं. काही तरी धर्माचं, नीतीचं बोलावं, हा त्याचा स्वभाव असतो. त्याला दुखावण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं काही नुकसान होत नाही, परंतु आपण आपल्या हिताला मुकतो. म्हणून, शहाण्या लोकांनी अशा प्रसंगी नीट मर्यादा जाणावी, वेळप्रसंग जाणावा आणि त्याच्या सहवासातून आपल्याला आपल्या हिताचं जे काही मिळवता येईल, ते मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्याबरोबर अतिशय मऊपणानं संयमानं, औचित्यानं बोलणं हे चांगलं असतं. त्याच्या बरोबरच्या अशा संवादामुळं आपल्याला त्याच्याकडून चार चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्यांच्यामुळं आपलं जीवन चांगल्या दिशेनं बदलू शकतं.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

 

Sunday, 29 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३८)

संतांचा उपदेश किती हितकारक असतो, हे सांगताना तुकारामांचं मन इतकं आनंदमय झालं आहे, की त्यांच्या शब्दाशब्दामधून प्रसन्नता ओसंडून वाहताना दिसते. एका अभंगात ते म्हणतात,

३८

जीवित्व ते किती ? ! हे चि धरिता बरे चित्तीं !!१!!
संत सुमनें उत्तरें ! मृदू रसाळ मधुरें !!२!!
विसावता कानीं ! परिपाक घडे मनीं !!३!!
तुका म्हणे जोडी ! हाय जतन रोकडी !!४!!
              (अभंग क्र.१३५१)

बोलून चालून आपलं आयुष्य किती थोडं असतं, याचा माणसानं आपल्या मनामधे नीट विचार करावा. असं केलं असता त्याचा नीट उपयोग करण्याची भावना तीव्र होऊ शकते. आयुष्याचं चीज व्हायचं असेल, तर आपल्या हितचिंतकांचा उपदेश ऐकणं हे आपल्या कल्याणाचं असतं. संतांचे उपदेशाचे बोल, ही खरं तर फुलं असतात. त्यांची वचनं मृदू असतात, रसाळ असतात, मधुर असतात. ती आपल्या कानांमधे विसावली, तर तिथून आपल्या आत उतरतात आणि त्यांचा आपल्या मनावर चांगला परिणाम होतो. आपल्याला होणारा हा लाभ असाधारण असतो. खरं तर हा रोखीचा व्यवहार असतो. माणसानं संतांच्या वचनांचा होणारा हा लाभ चांगला जतन करायला हवा, त्याच्या आधारे आपलं जीवन कृतार्थ करायला हवं.


(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Friday, 27 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३७)

शब्दांच्या बाह्य स्वरूपापेक्षा अर्थ अधिक महत्त्वाचा, शब्दांना अनुसरून केलेलं आचरण महत्त्वाचं, किंबहुना कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत बहिरंगापेक्षा अंतरंगच महत्त्वाचं, हे तुकारामांनी एका अभंगात मनाला सहज पटणाऱ्या भाषेत नोंदविलं आहे. ते म्हणतात,

३७

सोनियाचा कळस ! माजी भरिला सुरारस !!१!!
काय करावे प्रमाण ? ! तुम्ही सांगा संतजन !!२!!
मृत्तिकेचा घट ! माजी अमृताचा सांट !!३!!
तुका म्हणे हित ! ते मज सांगावे त्वरित !!४!!
                  (अभंग क्र. ११४६)

एखादा सोन्याचा घडा आहे आणि त्यामधे मद्य भरलेलं आहे. अशा वेळी घडा सोन्याचा आहे याला महत्त्व द्यायचं, की त्याच्यामधे मद्य भरलेलं आहे हे ध्यानात घ्यायचं, ते तुम्हीच सांगा, असं तुकारामांनी संतजनांना विचारलं आहे. त्यांनी हाच प्रश्न संतांना आणखी एक प्रकारे विचारला आहे. घडा मातीचा आहे. पण त्यामधे अमृताचा साठा आहे, अशी स्थिती असेल, तर महत्त्व कशाला द्यावं, ते मला त्वरित सांगा, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांना उत्तर काय अभिप्रेत आहे, ते स्पष्ट आहे. घडा सोन्याचा आहे, की मातीचा आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्यामधे काय आहे, हे खरं महत्त्वाचं आहे. तसंच, कोणत्याही गोष्टीचं बाह्य रूप कसं आहे, याकडं लक्ष देण्यापेक्षा तो पदार्थ आतून कसा आहे, त्याचं सत्त्व कसं आहे हे पहावं, असा तुकारामांचा दृष्टीकोण आहे.


(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८


 

Thursday, 26 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३६)

शब्दाला अर्थाची जोड नसेल तर ज्याप्रमाणं तो पोकळ होतो, त्याप्रमाणं त्याला आचरणाची जोड नसेल तरी तो निरर्थक ठरतो. म्हणून, आपल्या शब्दाला, बोलण्याला आचरणाची जोड दिली पाहिजे, या बाबतीत तुकाराम अतिशय आग्रही होते. या संदर्भातील त्यांचा एक अभंग अतिशय विख्यात आहे. त्यामधे ते म्हणतात,

३६
बोले तैसा चाले ! त्याची वंदीन पाउले !!१!!
अंगें झाडीन अंगण ! त्याचे दासत्व करीन !!२!!
त्याचं होईन किंकर ! उभा ठाकेन जोडोनि कर !!३!!
तुका म्हणे देव ! त्याचे चरणी माझा भाव !!४!!
                    (अभंग क्र.४३१६)


तुकारामांनी या अभंगात व्यक्त केलेली भावना अतिशय उत्कट आहे. कोणताही दुटप्पीपणा वा ढोंग न करता बोलणं आणि वागणं यांमधे सुसंगती ठेवणाऱ्या व्यक्तीविषयी तुकारामांनी जो आदर व्यक्त केला आहे, तो त्यांच्या आंतर्बाह्य विशुद्ध शीलाचा द्योतक आहे. ते अशा माणसाच्या पायांवर मस्तक ठेवून त्याला वंदन करण्यास, स्वतःच्या हाताने त्याचे आंगण झाडण्यास, त्याचं दास्य करण्यास आणि त्याचा नोकर होऊन त्याची आज्ञा ऐकण्यासाठी त्याच्या पुढं हात जोडून उभं राहण्यास तयार आहेत. असा मनुष्य म्हणजे देव आहे आणि माझ्या मनातील आदराची भावना त्याच्या चरणी आहे, असं ते म्हणतात. आपण जेव्हा एखादा शब्द उच्चारतो, तेव्हा आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी येते, याचं भान तुकारामांच्या या अभंगामुळं येऊ शकतं आणि आलं पाहिजेही.



(संग्राहक :- संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८





Wednesday, 25 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३५)

आता, शब्द महत्वाचे असतात, हे खरंच आहे. परंतु त्यांचं खरं सौंदर्य आणि सामर्थ्य अर्थामधे असतं. अर्थ बाजूला केला, तर शब्द निव्वळ फोलपटासारखे होतात. म्हणूनच, अर्थ न जाणता पाठांतर करणं तुकारामांना मान्य नव्हतं. ते म्हणतात,

३५
अर्थेंविण पाठांतर कासया करावे ? ! व्यर्थ चि मरावे घोकूनिया !!१!!
घोकूनिया काय ? वेगीं अर्थ पाहे ! अर्थरूप राहे होऊनिया !!२!!
तुका म्हणे ज्याला अर्थीं आहे भेटी ! नाही तरी गोष्टी बोलो नका !!३!!
                                  (अभंग क्र. ४२१२)

अर्थ समजून न घेता पाठांतर कशाला करावं ? शब्द नुसते उगाचच घोकून व्यर्थ कशाला मरावं ? शब्द नुसते घोकून काय उपयोग ? चटकन त्यांचा अर्थ पहावा. किंबहुना, आपण शब्दांच्या मदतीनं अर्थरूप व्हावं. जो मनुष्य अर्थाला भेटण्याचा, त्याला जाणण्याचा, त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं जीवन सार्थक होतं. आपल्याला अर्थापर्यंत जायचं नसेल, तर पोकळ शब्दांच्या गप्पा मारू नयेत.

(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Tuesday, 24 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३४)

शब्द हे साधन अतिशय प्रभावी आहे, ते शास्त्रही आहे आणि म्हणूनच ते अतिशय जपून, काळजीपूर्वक आणि विवेकानं वापरलं पाहिजे, हा तुकारामांचा आग्रह होता. म्हणूनच शब्दप्रयोगाच्या बाबतीत ते समाजाला वारंवार मार्गदर्शन करीत असत. कुणी अर्थहीन, कठोर, भावशून्य आणि प्रसंगी दुसऱ्याच्या काळजाला जखमा करणारं बोलत असेल, तर आपण त्यापासून दूर रहावं, नाही तर तसं बोलण्याची आपल्यालाही सवय लागू शकते, हे समजावून सांगताना ते म्हणतात,

३४
फट्याचे बडबडे चवी ना सवाद ! आपुला चि वाद आपणासी !!१!!
कोणे या शब्दाचे मरावे घसणी ! अंतरे शाहाणी राहिजे हो !!२!!
गाढवाचा भुंक आइकता कानीं ! काय कोडवाणी ऐसियेचे ? !!३!!
तुका म्हणे ज्यासी करावे वचन ! त्याचे येती गुण अंगास ते !!४!!
                            (अभंग क्र. ४२०६)

एखादा मनुष्य मागचा पुढचा विचार न करता फटाफट बडबड करतो, त्याच्या बोलण्याला ना चव असते, ना स्वाद असतो. ते बोलणं काही हितकारक नसतं. असं बोलणं ऐकत बसण्यापेक्षा आपण अंतर्मुख होऊन आपल्याच विश्वात मग्न होणं चांगलं. आपण आपला स्वतःशीच वाद करावा, संवाद करावा. या आत्मवादातून, आत्मसंवादातून आपल्याला स्वतःचाच शोध घेता येईल. त्यातून आपल्याला आपले गुणदोष समजतील आणि आपण स्वतःचं शुद्धीकरण करू शकू, आपला विकास साधू शकू. दुसऱ्याचे नको असलेले शब्द ऐकून त्याच्याशी वाद घालण्याची घासाघीस करीत बसणं म्हणजे एक प्रकारचं मरणंच होय. असं उगीचच कुणी कशाला मरावं ? त्यापेक्षा आपल्या आत डोकावून पहावं, आपल्या आतच असलेल्या सुखाच्या भांडाराचा शोध घ्यावा, हेच शहाणपणाचं होय. गाढवाचं ओरडणं हे काही गोडव्यानं भरलेलं नसतं. आपण कानांनी ते ऐकलं, तर आपल्याला काही आनंद होत नाही, त्याचं कोडकौतुक वाटत नाही, आपण काही त्याचं ओरडणं ऐकून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही. हा सावधपणा आवश्यक आहे. कारण आपण ज्याच्याबरोबर बोलतो, संवाद करतो, त्याचे गुण आपल्या अंगाला चिकटतात.


(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Saturday, 21 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३३)

शब्दरूपी साधन कसं वापरावं, याविषयी तुकारामांनी आपल्याला नाना मार्गांनी सल्ला दिला आहे. ते म्हणतात,

३३
वचन ते नाही तोडीत शरीरा ! भेदत अंतरा वज्राऐसे !!१!!
काही न सहावे काशा ही कारणें ! संदेह निधान देह बळी !!२!!
नाही शब्द मुखीं लागत तिखट ! नाही जड होत पोट तेणें !!३!!
तुका म्हणे जरी गिळे अहंकार ! तरी वसे घर नारायण !!४!!
                   (अभंग क्र. २४४०)
एखादा मनुष्य जेव्हा दुसऱ्याला दुखावणारं काही तरी बोलतो, तेव्हा ते बोलणं काही ऐकणाऱ्याच्या शरीराला तोडत नाही. पण ते बोलणं वज्राप्रमाणं त्याच्या अंतःकरणाला भेदत जातं. अशा प्रकारे बोलणारा तापट माणूस कुठल्याही कारणानं काहीही सहन करीत नाही. एखाद्या बाबतीत त्याला काही संदेह, संशय असलाच, तर तो त्याचा देह बळी गेल्यानंतरच म्हणजे त्याच्या मृत्यूनंतरच दूर होतो. याचा अर्थ त्याला लागट बोलण्याची जी सवय लागलेली असते, ती तो हयात असेपर्यंत सुटत नाही. मरेपर्यंत तो त्याच पद्धतीनं बोलत राहतो. अशा प्रकारे बोलणारा मनुष्य जेव्हा काही शब्द उच्चारतो, तेव्हा ते शब्द काही त्याच्या तोंडात तिखट लागत नाहीत किंवा अशा शब्दामुळं काही त्याचं व ऐकणाराचं पोट जड होत नाही, त्यामुळं आपल्या बोलण्याचा काय परिणाम होतो , हे त्याला कळत नाही. परंतु या प्रकारातून घरात मात्र दुःखाचा कल्लोळ निर्माण होतो. खरं तर माणसानं जर अहंकार गिळला, तर घरामधे साक्षात ईश्वर वास्तव्य करू लागतो.


(संग्राहक :- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

 

Monday, 16 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३२)

भाषा हे माणसाला लाभलेलं संपर्काचं अतिशय महत्वाचं साधन आहे. तुकारामांनी भाषेचं आणि तिच्यामधील शब्दांचं महत्त्व उत्तम रीतीनं जाणलं होतं. ते स्वतः तर शब्दप्रभू होतेच. एकेका शब्दावर त्यांचं नितान्त प्रेम होतं. शब्दाचा गौरव करताना ते म्हणतात,
३२
आम्हा घरीं धन शब्दाची च रत्ने | शब्दाची च शस्त्रे यत्न करू ||१||
शब्द चि आमुच्या जीवात्मा जीवन | शब्दें वाटू धन जनलोकां ||२||
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव | शब्दें चि गौरव पूजा करू ||३||
                     (अभंग क्र. ३३९६)

सामान्यतः माणूस जीवनात सुखी आणि यशस्वी होण्यासाठी पैसाआडका, सोनंनाणं, रत्नं जमवण्याच्या मागं असतो. तुकारामांसारखी माणसं मात्र आपलं सुख अशा भौतिक वस्तूंमधे शोधत नाहीत. त्यांची स्वतःची काही मूल्यं असतात, दृष्टीकोण असतात. तुकारामांनी आपल्या जीवनातील फार मोठा आनंद शब्दाच्या माध्यमातून प्राप्त केला होता. त्यामुळं शब्दाचा अपार गौरव करताना ते म्हणतात :  आमच्या घरी शब्दाचीच रत्नं आहेत. समाजव्यवस्था बदलण्यासाठी तुकारामांना एक प्रकारचं युद्धच करावं लागलं. परंतु त्या युद्धासाठी त्यांनी शस्त्रं वापरली, ती शब्दाचीच. त्यांचा वापर योग्य रीतीनं करण्यासाठी त्यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. त्यांच्या दृष्टीने शब्दांचं स्थान इतकं असाधारण होतं, की शब्द आपल्या जीवाचं जीवन आहे, असं ते म्हणतात. आपल्या अस्तित्वाचं खरं सत्त्व शब्दांमधे आहे, आपल्या अभंगांमधे आहे, अशी त्यांची भावना होती. त्यांचं काव्य अक्षरशः त्यांच्या अस्तित्वाच्या गाभ्यामधून अंकुरलं होतं, हे त्यांच्या या वचनातून व्यक्त होतं. तुकाराम काही लोकांना प्रत्येक वेळी प्रत्यक्ष रीत्या भौतिक संपत्तीचं दान देत नव्हते. परंतु शब्दांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना दिलेलं वैभव पिढ्यानपिढ्या पुरणारं आहे. आपण लोकांना शब्दानं धन वाटत आहोत, हे त्यांचे उद्गार इतिहासाच्या कसोटीवर सत्य ठरले आहेत. आपल्या दृष्टीनं शब्द हाच देव आहे, या भाषेत त्यांनी शब्दांचं माहात्म्य सांगितलं आहे. या देवाचा गौरव करण्यासाठी, त्याची पूजा करण्यासाठी ते शब्दांचाच वापर करण्याची भाषा करीत आहेत. तुकाराम किती शब्दमय झाले होते, त्यांच्या व्यक्तित्वाचा अणुरेणूही कसा शब्दात्मक झाला होता आणि ते शब्दावर किती अपार प्रेम करीत होते, ते या अभंगातून मार्मिक रीतीने व्यक्त झालं आहे. शब्दाचं हे सगळं सामर्थ्य ओळखणारा मनुष्य आयुष्यात यशस्वी आणि आनंदी झाल्याखेरीज राहणार नाही.


(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८