Tuesday, 31 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३९)

संतांची भेट झाली, की त्यांच्याकडून काहीतरी हिताचंच ऐकायला मिळतं, हे स्पष्ट करताना तुकाराम एका अभंगात म्हणतात,

३९

भल्याचे दर्शन ! तेथे शुभ चि वचन !!१!!
बोलावी हे धर्मनीत ! क्षोभें होत नाही हित !!२!!
मर्यादा ते बरी ! वेळ जाणावी चतुरी !!३!!
तुका म्हणे बहु ! लगे ऐसे बरे मऊ !!४!!
                    (अभंग क्र. ३०४०)

भल्या माणसाची भेट झाली, की त्याच्या तोंडून काही तरी हिताचंच ऐकायला मिळतं. काही तरी धर्माचं, नीतीचं बोलावं, हा त्याचा स्वभाव असतो. त्याला दुखावण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं काही नुकसान होत नाही, परंतु आपण आपल्या हिताला मुकतो. म्हणून, शहाण्या लोकांनी अशा प्रसंगी नीट मर्यादा जाणावी, वेळप्रसंग जाणावा आणि त्याच्या सहवासातून आपल्याला आपल्या हिताचं जे काही मिळवता येईल, ते मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्याबरोबर अतिशय मऊपणानं संयमानं, औचित्यानं बोलणं हे चांगलं असतं. त्याच्या बरोबरच्या अशा संवादामुळं आपल्याला त्याच्याकडून चार चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्यांच्यामुळं आपलं जीवन चांगल्या दिशेनं बदलू शकतं.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

 

No comments:

Post a Comment