Thursday, 5 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २९)

दु:खानं व्याकूळ झालेल्या माणसाला मोठी मदत केली नाही आणि नुसता शब्दानं दिलासा दिला, तरी त्याच्या दृष्टीनं तो मोठा आधार असतो. तुकाराम म्हणतात,

२९
हा गे आलो कोणी म्हणे बुडतिया ! तेणें किती तया बळ चढे !!१!!
तुम्ही तंव भार घेतला सकळ ! आश्वासिलो बाळ अभयकरें !!२!!
भुकेलिया आस दाविता निर्धार ! किती होय धीर समाधान !!३!!
तुका म्हणे दिली चिंतामणीसाटी ! उचित कांचवटी दंडवत !!४!!
               (अभंग क्र. २५५५)

पाण्यात बुडत असलेल्या माणसाला 'हा पहा, मी आलो' एवढं नुसतं तोंडानं म्हटलं, तरी त्यामुळं त्याचं बळ किती वाढतं ! संत लोकांना नेमकं हे बळच देत असतात. आपण स्वतः हा अनुभव घेतल्याचं तुकाराम सांगत आहेत. एखाद्या लहान मुलाला आपला हात उंचावून 'घाबरू नकोस' असं आश्वासन द्यावं, तसं संतांनी आपल्या बाबतीत केलं आहे आणि आपला सगळा भार स्वतःच्या अंगावर घेतला आहे, असं तुकाराम कृतज्ञतापूर्वक सांगत आहेत. एखाद्या भुकेलेल्या माणसाला नक्की भोजन देण्याची आशा दाखविली, तरी तेवढ्यानं त्याला किती धीर येतो, समाधान वाटतं. दु:खी-कष्टी माणसाला आपल्या वागण्या-बोलण्यातून दिलासा देण्याचा आनंद काही औरच असतो, हे तुकारामांनी या अभंगातून आपल्याला तळमळीनं सांगितलं आहे. जो मनुष्य असा दिलासा देतो, त्याचे उपकार मोठे असतात. संत असे उपकारकच करत असतात. आपण त्यांना दंडवत घातला, तरी त्यांच्या उपकाराची फेड होऊ शकत नाही. हे तर, एखाद्यानं आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करणारं चिंतामणीसारखं रत्न द्यावं आणि आपण त्याची परतफेड म्हणून त्याला काच देण्याचा प्रयत्न करावा, तसं आहे.


(संग्राहकसंजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment