Sunday, 29 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३८)

संतांचा उपदेश किती हितकारक असतो, हे सांगताना तुकारामांचं मन इतकं आनंदमय झालं आहे, की त्यांच्या शब्दाशब्दामधून प्रसन्नता ओसंडून वाहताना दिसते. एका अभंगात ते म्हणतात,

३८

जीवित्व ते किती ? ! हे चि धरिता बरे चित्तीं !!१!!
संत सुमनें उत्तरें ! मृदू रसाळ मधुरें !!२!!
विसावता कानीं ! परिपाक घडे मनीं !!३!!
तुका म्हणे जोडी ! हाय जतन रोकडी !!४!!
              (अभंग क्र.१३५१)

बोलून चालून आपलं आयुष्य किती थोडं असतं, याचा माणसानं आपल्या मनामधे नीट विचार करावा. असं केलं असता त्याचा नीट उपयोग करण्याची भावना तीव्र होऊ शकते. आयुष्याचं चीज व्हायचं असेल, तर आपल्या हितचिंतकांचा उपदेश ऐकणं हे आपल्या कल्याणाचं असतं. संतांचे उपदेशाचे बोल, ही खरं तर फुलं असतात. त्यांची वचनं मृदू असतात, रसाळ असतात, मधुर असतात. ती आपल्या कानांमधे विसावली, तर तिथून आपल्या आत उतरतात आणि त्यांचा आपल्या मनावर चांगला परिणाम होतो. आपल्याला होणारा हा लाभ असाधारण असतो. खरं तर हा रोखीचा व्यवहार असतो. माणसानं संतांच्या वचनांचा होणारा हा लाभ चांगला जतन करायला हवा, त्याच्या आधारे आपलं जीवन कृतार्थ करायला हवं.


(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment