Friday, 27 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३७)

शब्दांच्या बाह्य स्वरूपापेक्षा अर्थ अधिक महत्त्वाचा, शब्दांना अनुसरून केलेलं आचरण महत्त्वाचं, किंबहुना कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत बहिरंगापेक्षा अंतरंगच महत्त्वाचं, हे तुकारामांनी एका अभंगात मनाला सहज पटणाऱ्या भाषेत नोंदविलं आहे. ते म्हणतात,

३७

सोनियाचा कळस ! माजी भरिला सुरारस !!१!!
काय करावे प्रमाण ? ! तुम्ही सांगा संतजन !!२!!
मृत्तिकेचा घट ! माजी अमृताचा सांट !!३!!
तुका म्हणे हित ! ते मज सांगावे त्वरित !!४!!
                  (अभंग क्र. ११४६)

एखादा सोन्याचा घडा आहे आणि त्यामधे मद्य भरलेलं आहे. अशा वेळी घडा सोन्याचा आहे याला महत्त्व द्यायचं, की त्याच्यामधे मद्य भरलेलं आहे हे ध्यानात घ्यायचं, ते तुम्हीच सांगा, असं तुकारामांनी संतजनांना विचारलं आहे. त्यांनी हाच प्रश्न संतांना आणखी एक प्रकारे विचारला आहे. घडा मातीचा आहे. पण त्यामधे अमृताचा साठा आहे, अशी स्थिती असेल, तर महत्त्व कशाला द्यावं, ते मला त्वरित सांगा, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांना उत्तर काय अभिप्रेत आहे, ते स्पष्ट आहे. घडा सोन्याचा आहे, की मातीचा आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्यामधे काय आहे, हे खरं महत्त्वाचं आहे. तसंच, कोणत्याही गोष्टीचं बाह्य रूप कसं आहे, याकडं लक्ष देण्यापेक्षा तो पदार्थ आतून कसा आहे, त्याचं सत्त्व कसं आहे हे पहावं, असा तुकारामांचा दृष्टीकोण आहे.


(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८


 

No comments:

Post a Comment