Monday, 16 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३२)

भाषा हे माणसाला लाभलेलं संपर्काचं अतिशय महत्वाचं साधन आहे. तुकारामांनी भाषेचं आणि तिच्यामधील शब्दांचं महत्त्व उत्तम रीतीनं जाणलं होतं. ते स्वतः तर शब्दप्रभू होतेच. एकेका शब्दावर त्यांचं नितान्त प्रेम होतं. शब्दाचा गौरव करताना ते म्हणतात,
३२
आम्हा घरीं धन शब्दाची च रत्ने | शब्दाची च शस्त्रे यत्न करू ||१||
शब्द चि आमुच्या जीवात्मा जीवन | शब्दें वाटू धन जनलोकां ||२||
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव | शब्दें चि गौरव पूजा करू ||३||
                     (अभंग क्र. ३३९६)

सामान्यतः माणूस जीवनात सुखी आणि यशस्वी होण्यासाठी पैसाआडका, सोनंनाणं, रत्नं जमवण्याच्या मागं असतो. तुकारामांसारखी माणसं मात्र आपलं सुख अशा भौतिक वस्तूंमधे शोधत नाहीत. त्यांची स्वतःची काही मूल्यं असतात, दृष्टीकोण असतात. तुकारामांनी आपल्या जीवनातील फार मोठा आनंद शब्दाच्या माध्यमातून प्राप्त केला होता. त्यामुळं शब्दाचा अपार गौरव करताना ते म्हणतात :  आमच्या घरी शब्दाचीच रत्नं आहेत. समाजव्यवस्था बदलण्यासाठी तुकारामांना एक प्रकारचं युद्धच करावं लागलं. परंतु त्या युद्धासाठी त्यांनी शस्त्रं वापरली, ती शब्दाचीच. त्यांचा वापर योग्य रीतीनं करण्यासाठी त्यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. त्यांच्या दृष्टीने शब्दांचं स्थान इतकं असाधारण होतं, की शब्द आपल्या जीवाचं जीवन आहे, असं ते म्हणतात. आपल्या अस्तित्वाचं खरं सत्त्व शब्दांमधे आहे, आपल्या अभंगांमधे आहे, अशी त्यांची भावना होती. त्यांचं काव्य अक्षरशः त्यांच्या अस्तित्वाच्या गाभ्यामधून अंकुरलं होतं, हे त्यांच्या या वचनातून व्यक्त होतं. तुकाराम काही लोकांना प्रत्येक वेळी प्रत्यक्ष रीत्या भौतिक संपत्तीचं दान देत नव्हते. परंतु शब्दांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना दिलेलं वैभव पिढ्यानपिढ्या पुरणारं आहे. आपण लोकांना शब्दानं धन वाटत आहोत, हे त्यांचे उद्गार इतिहासाच्या कसोटीवर सत्य ठरले आहेत. आपल्या दृष्टीनं शब्द हाच देव आहे, या भाषेत त्यांनी शब्दांचं माहात्म्य सांगितलं आहे. या देवाचा गौरव करण्यासाठी, त्याची पूजा करण्यासाठी ते शब्दांचाच वापर करण्याची भाषा करीत आहेत. तुकाराम किती शब्दमय झाले होते, त्यांच्या व्यक्तित्वाचा अणुरेणूही कसा शब्दात्मक झाला होता आणि ते शब्दावर किती अपार प्रेम करीत होते, ते या अभंगातून मार्मिक रीतीने व्यक्त झालं आहे. शब्दाचं हे सगळं सामर्थ्य ओळखणारा मनुष्य आयुष्यात यशस्वी आणि आनंदी झाल्याखेरीज राहणार नाही.


(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

No comments:

Post a Comment