Thursday, 26 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३६)

शब्दाला अर्थाची जोड नसेल तर ज्याप्रमाणं तो पोकळ होतो, त्याप्रमाणं त्याला आचरणाची जोड नसेल तरी तो निरर्थक ठरतो. म्हणून, आपल्या शब्दाला, बोलण्याला आचरणाची जोड दिली पाहिजे, या बाबतीत तुकाराम अतिशय आग्रही होते. या संदर्भातील त्यांचा एक अभंग अतिशय विख्यात आहे. त्यामधे ते म्हणतात,

३६
बोले तैसा चाले ! त्याची वंदीन पाउले !!१!!
अंगें झाडीन अंगण ! त्याचे दासत्व करीन !!२!!
त्याचं होईन किंकर ! उभा ठाकेन जोडोनि कर !!३!!
तुका म्हणे देव ! त्याचे चरणी माझा भाव !!४!!
                    (अभंग क्र.४३१६)


तुकारामांनी या अभंगात व्यक्त केलेली भावना अतिशय उत्कट आहे. कोणताही दुटप्पीपणा वा ढोंग न करता बोलणं आणि वागणं यांमधे सुसंगती ठेवणाऱ्या व्यक्तीविषयी तुकारामांनी जो आदर व्यक्त केला आहे, तो त्यांच्या आंतर्बाह्य विशुद्ध शीलाचा द्योतक आहे. ते अशा माणसाच्या पायांवर मस्तक ठेवून त्याला वंदन करण्यास, स्वतःच्या हाताने त्याचे आंगण झाडण्यास, त्याचं दास्य करण्यास आणि त्याचा नोकर होऊन त्याची आज्ञा ऐकण्यासाठी त्याच्या पुढं हात जोडून उभं राहण्यास तयार आहेत. असा मनुष्य म्हणजे देव आहे आणि माझ्या मनातील आदराची भावना त्याच्या चरणी आहे, असं ते म्हणतात. आपण जेव्हा एखादा शब्द उच्चारतो, तेव्हा आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी येते, याचं भान तुकारामांच्या या अभंगामुळं येऊ शकतं आणि आलं पाहिजेही.



(संग्राहक :- संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८





No comments:

Post a Comment