Wednesday, 11 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश ३१)

संतांचं जीवन लोकांवर उपकार करण्यासाठी असतं, या गोष्टीचा तुकारामांच्या मनावर फार मोठा प्रभाव पडलेला होता. हा प्रभाव त्यांच्या अस्तित्वाच्या अगदी गाभ्यापर्यंत पोचला होता आणि त्यामुळं ते स्वतः परोपकारी संत बनून गेले होते. त्यांनी स्वतःच आपल्या या उन्नत अवस्थेचं अतिशय समाधानानं, तृप्त मनानं आकलन केलं होतं आणि त्या प्रसन्न मनःस्थितीमधे त्यांच्या तोंडून स्वतःविषयीच पुढील उद्गार बाहेर पडले होते,

३१
अणुरेणुया थोकडा ! तुका आकाशाएवढा !!१!!
गिळूनि सांडिले कळिवर ! भव भ्रमाचा आकार !!२!!
सांडिली त्रिपुटी ! दीप उजळला घटीं !!३!!
तुका म्हणे आता ! उरलो उपकारापुरता !!४!!
            (अभंग क्र. ९९३)

बाह्य सृष्टीची असोत, की मानवाच्या अंतःसृष्टीची असोत, दोन परस्परविरुद्ध टोकं असतात. एका बाजूला अतिशय सूक्ष्म असे अणु-रेणू असतात, तर दुसऱ्या बाजूला सर्वव्यापी आकाश असते. समतेच्या अनुभवामुळं माणसाची अंतःसृष्टी जेव्हा बाह्य सृष्टीशी एकरूप होऊन जाते, तेव्हा मनुष्य एका बाजूला स्वतः अणु-रेणूंशी एकरूप असण्याचा अनुभव घेतो, किंबहुना त्यांच्यापेक्षाही सूक्ष्म असल्याची प्रचीती त्याला घेता येते. दुसऱ्या बाजूला आपण आकाशाइतके विशाल असल्याचा अनुभवही त्याला येतो. तुकारामांनी नेमकी हीच अवस्था अनुभवली होती. ही एक असाधारण अवस्था आहे. या अवस्थेमधे सर्व विश्वाशी एकरूप झालेला मनुष्य जणू काही स्वतःचं शरीर गिळून त्याचं अस्तित्व संपवून टाकतो. आपला अवघा मीपणा, सगळा अहंकार टाकून देतो. संसारामधे मनात भ्रम निर्माण करणाऱ्या जितक्या गोष्टी असतात, त्या सगळ्या बाजूला करतो. तुकाराम आपल्या माधुर्यानं ओतप्रोत भरलेल्या या उत्कट अनुभवाला शब्दरूप देत आहेत. आपल्या शरीरात दीप उजळला आहे, असं ते म्हणतात. जो अनुभव शब्दांत पकडणं भल्याभल्यांना जमणार नाही, तो अनुभव तुकारामांनी अतिशय सहजतेनं आणि तितक्याच सौंदर्यानं केवळ तीन शब्दांत आपल्या काळजापर्यंत पोचवला आहे. या उजळलेल्या प्रकाशमय अवस्थेत त्रिपुटी सांडल्याचं ते म्हणत आहेत. त्रिपुटी म्हणजे तीन गोष्टींचा समुदाय. या तीन गोष्टी कोणत्या याचा अभ्यासकांनी, पंडितांनी, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांनी जरूर शोध घ्यावा. परंतु तुकारामांच्या हृदयाची उजळलेली अवस्था शब्दांच्या आधाराविना ज्यांच्या हृदयात आपोआपच प्रवेश करते, त्यांना त्रिपुटीचा शब्दार्थ शोधण्याची गरज नाही. ते सर्व प्रकारचा आपपरभाव, मी-तूपणा दूर करून सर्व प्राणीमात्रांशी, सर्व सृष्टीशी एकरूप झाले आहेत, हाच अर्थ आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यासाठी काही प्राप्त करावं, असं आता त्यांच्या जीवनात काही उरलेलंच नाही. त्यांचं अवघं अस्तित्व आता इतरांना कल्याणाचा मार्ग दाखविण्यासाठी आहे. तुकारामांनी आपल्या अंतःकरणातील निरपेक्ष करुणा व्यक्त करताना शब्दांना जे लावण्य दिलं आहे, त्याला त्यांच्याच सांगायचं झालं, तर 'अंतपार नाही' !


(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

No comments:

Post a Comment