Tuesday, 3 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २६)

संत स्वतःच्या परोपकारी वृत्तीमुळं दु:खी लोकांचं दु:ख दूर करण्याचा स्वतःहून प्रयत्न करतात, हे त्यांचं मोठेपण होय. परंतु, जो दु:खी असतो, त्यानं संतांची वाट पहात बसण्याऐवजी स्वतः त्यांच्याकडं जावं, आपलं दु:ख त्यांच्यापुढं मांडावं आणि ते दूर करण्याचा उपाय जाणून घ्यावा, असं तुकारामांना वाटतं. जणू काही आपल्याला काही गरजच नाही आणि उपदेश करण्याविना संतांचच काही तरी अडलेलं आहे, अशा समजुतीत राहू नये, हे अतिशय प्रभावी शब्दात नोंदवताना तुकारामांनी एका अभंगात काही मार्मिक उदाहरणं दिली आहेत. ते म्हणतात,

२६
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ ? ! देखोनिया गूळ धाव घाली !!१!!
याचकाविण काय खोळंबला दाता ? ! तोचि धावे हिता आपुलिया !!२!!
उदक अन्न काये म्हणे मज खा ये ? ! भुकेला तो जाये चोजवीत !!३!!
व्याधी पिडिला धावे वैद्याचिया घरा ! दु:खाच्या परिहारा आपुलिया !!४!!
तुका म्हणे जया आपुले स्वहित ! करणे तो चि प्रीत धरी कथे !!५!!

                                    (अभंग क्र. २३८०)

 गूळ हे मुंगीचं खाद्य असतं. पण गुळाच्या वतीनं कुणी मुंगीला ' ये आणि गूळ खा ' असं निमंत्रण पाठवलेलं नसतं. गुळाला गरज नसते, तर मुंगीलाच गरज असते. मुंगीलाही आपली गरज कळते आणि ती गूळ पाहून तो खाण्यासाठी त्याच्याकडे धाव घेते. याचक आणि दाता यांच्या बाबतीतही हीच स्थिती असते. दाता काही याचकाविना खोळंबून बसलेला नसतो. याचकाला आपलं हित कळतं आणि तो आपल्या हितासाठी दात्याकडं धाव घेतो. पाणी काही ' या आणि मला प्या ' असं म्हणत नाही. अन्न काही ' या आणि मला खा ' असं म्हणत नाही. ज्याला तहान लागलेली असते, तोच शोध घेत पाण्याकडं जातो. ज्याला भूक लागलेली असते, तोच शोध घेत अन्नाकडं जातो. ज्याला रोगाची पीडा झालेली असते, तो आपलं दु:ख दूर करण्यासाठी वैद्याच्या घराकडे धाव घेतो. तुकाराम महाराजांनी ही सर्व उदाहरणं संतांच्या उपदेशाविषयी सांगितली आहेत. संत कथेमधून, प्रवचनामधून लोकांना त्यांच्या हिताचा उपदेश करीत असतात. ज्याला आपलं हित करून घ्यायचं असतं, त्यानं स्वतःहून त्या उपदेशाची गोडी मनात बाळगून तिचा लाभ घ्यायला हवा, असा त्यांचा सल्ला आहे.


(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment