Wednesday, 25 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३५)

आता, शब्द महत्वाचे असतात, हे खरंच आहे. परंतु त्यांचं खरं सौंदर्य आणि सामर्थ्य अर्थामधे असतं. अर्थ बाजूला केला, तर शब्द निव्वळ फोलपटासारखे होतात. म्हणूनच, अर्थ न जाणता पाठांतर करणं तुकारामांना मान्य नव्हतं. ते म्हणतात,

३५
अर्थेंविण पाठांतर कासया करावे ? ! व्यर्थ चि मरावे घोकूनिया !!१!!
घोकूनिया काय ? वेगीं अर्थ पाहे ! अर्थरूप राहे होऊनिया !!२!!
तुका म्हणे ज्याला अर्थीं आहे भेटी ! नाही तरी गोष्टी बोलो नका !!३!!
                                  (अभंग क्र. ४२१२)

अर्थ समजून न घेता पाठांतर कशाला करावं ? शब्द नुसते उगाचच घोकून व्यर्थ कशाला मरावं ? शब्द नुसते घोकून काय उपयोग ? चटकन त्यांचा अर्थ पहावा. किंबहुना, आपण शब्दांच्या मदतीनं अर्थरूप व्हावं. जो मनुष्य अर्थाला भेटण्याचा, त्याला जाणण्याचा, त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं जीवन सार्थक होतं. आपल्याला अर्थापर्यंत जायचं नसेल, तर पोकळ शब्दांच्या गप्पा मारू नयेत.

(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

No comments:

Post a Comment