काही लोक आपल्याकडं विशिष्ट प्रकारच्या शक्ती आहेत, इतरांकडं नसलेलं ज्ञान आहे, असं भासवून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात. तुकाराम अशा लोकांवर टीका करतात, याचा अर्थ सर्वसामान्य लोकांनी अशा ढोंगी लोकांपासून सावध रहावं, असंच सांगू इच्छितात. एका अभंगात त्यांनी म्हटलं आहे,
४४
सांगो जाणती शकुन ! भूत भविष्य वर्तमान !!१!!
त्यांचा आम्हांसी कंटाळा ! पाहो नावडती डोळां !!२!!
रिद्धीसिद्धींचे साधक ! वाचासिद्ध होती एक !!३!!
तुका म्हणे जाती ! पुण्यक्षयें अधोगती !!४!!
(अभंग क्र. १५०१)
आपल्याला शकुन-अपशकुनांची फळं कळतात, आपण अंतर्ज्ञानानं, भूत-भविष्य-वर्तमान अशा तिन्ही काळांतील घटना सांगू शकतो, असे काही लोक म्हणत असतात. ज्योतिषी, मांत्रिक वगैरे लोकांचा यांच्यामधे अंतर्भाव होतो. परंतु या लोकांकडं प्रत्यक्षात असं कोणतंही सामर्थ्य नसतं, हे तुकाराम निःसंदिग्धपणे जाणत होते. म्हणूनच, आपल्याला असं सांगणाऱ्यांचा कंटाळा आहे. आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडं पाहणं देखील आपल्याला आवडत नाही, असं तुकाराम अगदी ठणकावून सांगतात. आपल्याला रिद्धीसिद्धी नावाच्या अलौकिक शक्ती प्राप्त झाल्या आहेत, असं काही जण सांगतात. काही जण आपण 'वाचासिद्ध' आहोत, असं म्हणतात. म्हणजेच, आपण जे जे बोलतो, ते ते घडतं, असं ते भासवतात. अशा प्रकारचे लोक पुण्याचा क्षय होऊन अधोगतीला जातात, असं तुकाराम म्हणतात. याचा अर्थ, लोकांची अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांनी पूर्वी जरी काही सत्कर्म केलेली असली, तरी तीही वाया जातात. जे निष्पाप लोकांची वंचना करतात, त्यांचा स्वतःचाही अधःपात होतो, मग ते इतरांचं कल्याण करतील ही शक्यताच नाही. म्हणून, लोकांनी त्यांच्यापासून सावध रहावं, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये वा विसंबून राहू नये, असं तुकाराम महाराज सुचवत आहेत.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment