मनुष्य कोणता का व्यवसाय करीत असेना, तो जर प्रामाणिकपणे कष्ट करीत असेल, तर धनसंपत्ती त्याच्याकडं आपोआप चालून येते, हे व्यापाराचं उदाहरण देऊन तुकारामांनी एका अभंगात स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात,
४८
धनवंता घरीं ! करी धन चि चाकरी !!१!!
होय बैसल्या व्यापार ! न लगे सांडावे चि घर !!२!!
रानीं वनीं द्वीपीं ! असती ती होती सोपी !!३!!
तुका म्हणे मोल ! देता काही नव्हे खोल !!४!!
(अभंग क्र. २७९९)
ज्यानं प्रयत्न करून धन मिळवलेलं असतं, त्याच्या घरी धनच चाकरी करू लागतं. व्यापाराचं उदाहरण घेतलं, तरी हे स्पष्ट होतं. व्यापार घरबसल्या होत असतो. ग्राहक व्यापाऱ्याकडं येत असल्यामुळं व्यापाऱ्याला घर सोडावं लागतच नाही. मनुष्य रानात असो, वनात असो अथवा बेटावर असो, त्याच्याकडं धन असलं, की त्याची सगळी कामं सोपी होतात. त्याला जे काही हवं असतं, त्याची किंमत मोजली, की त्याला सर्व काही मिळतं, त्याच्या दृष्टीने काही अवघड रहात नाही. संसार सुखाचा करू इच्छिणाऱ्या माणसानं धनाचा द्वेष करू नये, कोणता ना कोणता उद्योग नीट करून धन मिळवावं आणि त्याच्या आधारे आपलं जीवन सफल करावं, हा तुकारामांचा मोलाचा सल्ला आहे.
(संग्राहक : संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment