तुकारामांनी शुभ आणि अशुभ यांच्या संदर्भात आपल्याला एक अतिशय आश्वासक संदेश दिला आहे. एवढ्या महान संतानं दिलेला हा संदेश आपण ध्यानात घेतला नाही, तर आपल्यासारखे करंटे आपणच, असं म्हणावं लागेल. ते म्हणतात,
४५
शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ ! अशुभ मंगळ मंगळाचे !!१!!
हातीचिया दीपें दुराविली निशी ! न देखिजे कैसी आहे ते ही !!२!!
सुख दुःखाहूनि नाही विपरीत ! देतील आघात हितफळे !!३!!
तुका म्हणे आता आम्हांसी हे भले ! अवघे चि जाले जीव जंत !!४!!
(अभंग क्र. २००३)
या अभंगात सर्व दिशा आणि काळ शुभ झाले, एवढेच सांगून ते थांबत नाहीत. सर्वसामान्य माणसं ज्यांना अशुभ म्हणतात, त्या गोष्टी आमच्या दृष्टीनं मंगलातील मंगल, शुभातील शुभ म्हणजे सर्वांत शुभ झाल्या आहेत, असं म्हणतात. तुकारामांवर अपार प्रेम करणाऱ्या लोकांनी त्यांच्या या वृत्तीचा अंगीकार केला पाहिजे, असं मला वाटतं. माणसांमधे आरपार बदल करून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्या या विचारात आहे. याच अभंगात त्यांनी पुढं काढलेले उद्गार कसे आत्मविश्वासानं ओतप्रोत भरलेले आहेत. हातात घेतलेल्या दिव्यामुळं रात्र दुरावली आहे आणि ती कशी आहे, ते दिसतही नाही इतकी दुरावली आहे, असं ते म्हणतात. हा दिवा विचारांचा आहे. विवेकाचा आहे. ज्ञानाचा आहे. मानसिक सामर्थ्याचा आहे. अज्ञानाची आणि दुबळेपणाची रात्र कुठल्या कुठं पळून गेली आहे. ते केवळ एक आत्मनिष्ठ अनुभव म्हणून ते सांगत आहेत, असं नाही. आपल्या तमाम भावंडांनी हा विचार पचवावा, हे सामर्थ्य प्राप्त करावं, अशीच त्यांची भावना आहे. असं सामर्थ्य प्राप्त झालं, की अशुभाचंही शुभात रूपांतर होतं. आघात देखील हितकारक फळं देतील, याचा अर्थ संकटं नुसती दूर होतील वा नष्ट होतील असं नाही, तर त्या संकटांचंच हितकारक, कल्याणकारक गोष्टींमध्ये रूपांतर होईल. स्वतःचं आंतरिक विश्व बदललं, की बाहेरचं अवघं विश्वही बदलेल. मग कुणी अशुभ, अपवित्र आहे, ही भावना राहणार नाही. सगळे प्राणीही भले वाटू लागतील. चांगले वाटू लागतील. या अभंगाच्या अखेरीस तुकाराम म्हणतात, की सर्व जीवजंतू हे आता त्यांच्या दृष्टीनं भले झाले आहेत. मनाची उत्कट प्रसन्नतेनं फुललेली ही अवस्था आपल्याला लाभावी, असं कुणालाही वाटावं, इतकं मोठं वैभव या उद्गारात आहे.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment