Monday, 13 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (चमत्कार ४६)

तुकारामांच्या ईश्वरविषयक धारणा अतिशय वस्तुनिष्ठ होत्या. ईश्वर आपल्या स्वतःच्या जवळच असतो, त्याला इतरत्र शोधणं व्यर्थ आहे, अशी त्यांची भावना होती. एका अभंगात ते म्हणतात,

४६

देहीं असोनिया देव ! वृथा फिरतो निर्दैव !!१!!
देव आहे अंतर्यामीं ! व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं !!२!!
नाभी मृगाचे कस्तुरी ! व्यर्थ हिंडे वनांतरीं !!३!!
साखरेचे मूळ ऊस ! तैसा देहीं देव दिसे !!४!!
दुधीं असता नवनीत ! नेणे तयाचे मथित !!५!!
तुका सांगे मूढजना ! देहीं देव का पाहाना !!६!!
                      (अभंग क्र. ४४८२)

देव आपल्या शरीरातच असतो, याचा अर्थ आपल्या ठिकाणी जे सद्गुण असतात, जे चांगले आचारविचार असतात, त्यांच्यामधेच ईश्वराचं अस्तित्व असतं. कित्येकदा माणसाला हे कळत नाही. तो ईश्वराचा शोध घेण्यासाठी उगाचच बाहेरच्या जगात फिरत असतो. स्वतःच्या ठिकाणी असलेल्या सर्वश्रेष्ठ वैभवाचं भान नसलेला हा मनुष्य दुर्दैवीच म्हणावा लागेल. देव त्याच्या अंतर्यामीच असतो, परंतु तो त्याचा शोध घेण्यासाठी उगाचच तीर्थक्षेत्रं धुंडाळत असतो. त्याचं हे वागणं कस्तुरीमृगासारखं असतं. त्या मृगाचा नाभीमधेच कस्तुरी असते. परंतु तो तिचा शोध घेण्यासाठी सगळ्या वनामधे उगाचच हिंडत राहतो. खरं म्हणजे ऊस हेच जसं साखरेचं उगमस्थान असतं, साखर सत्त्वरूपानं मूलतः उसातच असते, तसा देव माणसाच्या देहातच असतो. लोणी दुधातच असतं, परंतु त्या दुधाचं दही बनवावं आणि त्याचं मंथन करून लोणी मिळवावं, हे ज्याला कळत नाही, तो इतर मार्गांनी कितीही प्रयत्न केले, तरी लोणी मिळवू शकत नाही. आपल्या आत डोकावून न पाहणाऱ्या, स्वतःच्या अस्तित्वाचा नीट शोध न घेणाऱ्या लोकांविषयी तुकाराम करुणेपोटीच नाराजी व्यक्त करतात. तुम्ही असे कसे मूढ आहात, स्वतःच्या शरीरात तुम्ही देवाला का पहात नाही, असा वेडेपणा का करीत आहात, असा प्रश्न त्यांनी लोकांना अगदी तळमळीनं विचारला आहे. ईश्वराच्या अस्तित्वाचा, स्वरूपाचा आणि स्थानाचा शोध कसा घ्यावा, याविषयीचं तुकारामांनी केलेलं हे मार्गदर्शन सत्यही आहे आणि सुंदरही आहे.

(संग्राहकसंजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

No comments:

Post a Comment