Sunday, 2 April 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ५१)

मानवी जीवनात सतत चढ-उतार होत असतात. माणसानं अशा गोष्टींना संतुलित वृत्तीनं सामोरं जावं, हा संदेश तुकारामांनी एका अतिशय सुरेख अभंगात दिला आहे. ते म्हणतात,

५१

कैं वाहावे जीवन ! कैं पलंगीं शयन !!१!!
जैसी जैसी वेळ पडे ! तैसे तैसे होणे घडे !!२!!
कैं भौज्य नानापरी ! कैं कोरड्या भाकरी !!३!!
कैं बसावे वहनीं ! कैं पायी अन्हवाणी !!४!!
कैं उत्तम प्रावर्णे ! कैं वसने ती जीर्णे !!५!!
कैं सकळ संपत्ती ! कैं भोगणे विपत्ती !!६!!
कैं सज्जनाशी संग ! कैं दुर्जनाशी योग !!७!!
तुका म्हणे जाण ! सुख दुःख ते समान !!८!!
                 (अभंग क्र. २८१९)

कधी सेवक बनून पाणी वाहून नेण्याचं काम करावं, तर कधी धनवंत बनून पलंगावर झोपण्याचं सुख भोगावं. माणसाच्या जीवनात येणारे हे परस्परविरोधी प्रसंग असतात. आपल्यावर जशी वेळ येईल, तसं तिला सामोरं जावं. कधी नाना प्रकारच्या पक्वान्नांचं भोजन करायला मिळतं, तर कधी कोरड्या भाकरी खाण्याचा प्रसंगही अनुभवावा लागतो. कधी वाहनात बसून आरामशीर प्रवास करण्याची संधी मिळते, तर कधी अनवाणी पायी चालण्याची वेळ येते. कधी उत्तम वस्त्रं परिधान करायला मिळतात, तर कधी जुने, फाटके कपडे वापरावे लागतात. कधी सर्व प्रकारची संपत्ती लाभते, तर कधी संकटांचे भोग भोगावे लागतात. कधी सज्जनांची संगत लाभते, तर कधी दुर्जनांचा सामना करावा लागतो. जीवन हे असं आहे. या प्रवासात सुखंही वाट्याला येतात आणि दुःखंही भोगावी लागतात. विवेकी माणूस सुखांच्या काळात हुरळून जात नाही, उद्दाम होत नाही आणि दुःखांच्या काळात खचून जात नाही, वैफल्यग्रस्त होत नाही. दोन्ही प्रकारच्या अवस्थांमधे जो आपल्या मनाचं संतुलन राखतो, त्याचंच जीवन खऱ्या अर्थानं कृतार्थ होतं.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment