Thursday, 8 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संत ११)

    जो सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाची काळजी वाहतो, तोच संत या नावाला साजेसा असतो, हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,

११
देवाची पूजा हे भूताचे पाळण | मत्सर तो सीण बहुतांचा ||१||
रुसावे फुगावे आपुलियावरि | उरला तो हरि सकळ ही ||२||
तुका म्हणे संतपण या चि नावे | जरि होय जीव सकळांचा ||३||
                  (अभंग क्र. ३८५४)

प्राणिमात्रांचं पालन करणं, हीच देवाची पूजा होय. याउलट इतरांचा मत्सर करणं, हा आनंद नसून शीणच होय. माणसाला जे काही रुसायचं फुगायचं असेल, ते त्यानं स्वतःच्या बाबतीत करावं, स्वतःचे दोष दूर करण्यासाठी स्वतःविरुद्ध तक्रार करावी, स्वतःविरुद्ध बंड करावं, पण इतरांशी मात्र आपुलकीनं वागावं. मग आपल्या बाहेरचं सर्व जग म्हणजे ईश्वर आहे, असा अनुभव घेता येतो. इतर सर्वांचा जीव म्हणजे आपणच, त्यांचा जीव हा आपलाच जीव, अशी भावना बनली, असं वर्तन घडलं, तरच संत हे नाव धारण करण्यास तो मनुष्य पात्र ठरतो.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment