Thursday, 22 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २२)

       तुकाराम इथं आपल्या उपदेश करण्याच्या कृतीचं एक प्रकारे समर्थन करीत आहेत, आपलं मन मोकळं करीत आहेत.
            आणखी एका अभंगात ते म्हणतात,
२२
बोलिलो ते काही तुमचिया हिता ! वचन नेणता क्षमा कीजे ||१||
वाट दावी तया न लगे रुसावे ! अतित्याई जीवें नाश पावे ||२||
निंब दिला रोग तुटाया अंतरी | पोभाळिता वरि आत चरे ||३||
तुका म्हणे हित देखण्यासि कळे | पडती आंधळे कूपा माजी ||४||
                          (अभंग क्र. १३१)

          आपण जे काही बोललो, जो काही उपदेश केला, ते सगळं तुमच्या हितासाठी होतं ; असं तुकाराम अगदी कळवळून सांगत आहेत. आपण नकळत काही दुखावणारं बोललो असेल तर क्षमा करा, असं त्यांनी अगदी विनम्रतेनं म्हटलं आहे. चुकीच्या वाटेनं चाललेल्या माणसाला कधी कधी कठोरपणानं चार गोष्टी सांगाव्या लागतात. सांगणार्‍यानं त्या कितीही सद्भावनेनं सांगितल्या असल्या, तरी ऐकणार्‍याला ते रुचतंच असं नाही. सज्जन लोक मात्र अशा लोकांनाही प्रसंगी आंजारुन-गोंजारुन,  गोड बोलून अथवा क्षमा मागूनही पुनःपुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण जो करुणेपोटी इतरांना चांगली वाट दाखवू इच्छीत असतो, त्यानं त्यांच्यावर रुसून चालत नाही. इतरांनीही त्याच्यावर रुसू नये. आपल्या हिताचा उपदेश नाकारण्याचा आततायीपणा केला, तर जीवाचा नाश होतो. शरीरात असलेला रोग नाहीसा व्हावा, म्हणून कोणी औषध म्हणून कडूलिंब दिला, तर रोगी माणसानं तो आपल्या हितासाठी आपल्या पोटात घेतला पाहिजे. तो नुसता वरवर चोळला, तर आतल्या रोगाची वाढच होत राहणार. उपदेशाचंही तसंच आहे. तो वरवर ऐकून सोडून दिला, तर माणसाचं दुःख दूर होऊ शकत नाही. जो डोळस असतो, समंजस असतो, विवेकी असतो, त्याला आपलं हित बरोबर कळतं. परंतु ज्यांच्याकडं डोळसपणा नसतो असे आंधळे लोक विहिरीत पडतात, म्हणजेच आपली हानी करून घेतात.


(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment