Monday, 12 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संत १३, १४)

संतांचा सहवास माणसाचं जीवन आरपार बदलून टाकतो. म्हणूनच संतांची भेट हा आपल्या जीवनातील मोठा आनंदसोहळा वा सण असल्याचं तुकारामांना वाटतं. ते म्हणतात,

१२
धन्य आजि दिन | जाले संतांचे दर्शन ||१||
जाली पापातापा तुटी | दैन्य गेले उठाउठी ||२||
जाले समाधान | पायीं विसावले मन ||३||
तुका म्हणे आले घरा | तो चि दिवाळीदसरा ||४||
                   (अभंग क्र. ९९४)

१३
धन्य काळ संतभेटी | पायीं मिठी पडिली तो ||१||
संदेहाची सुटली गाठी | जाले पोटीं शीतळ ||२||
भवनदीचा जाला तारा | या उत्तरा प्रसादें ||३||
तुका म्हणे मंगळ आता | कोण दाता याहूनि ? ||४||
                   (अभंग क्र. ८८१)

आज संतांचं दर्शन झालं, हा धन्यतेचा दिवस होय. आता सगळी पापं, सगळे ताप नाहीसे झाले. भेटीबरोबर ताबडतोब जीवनातील दीनवाण्या सर्व गोष्टी दूर झाल्या. संतांच्या पायी मन विसावलं आणि त्यामुळं समाधान झालं, जीव सुखावला. आपल्याकडं जे अनेक सण आहेत, त्यांमधे दिवाळी आणि दसरा हे सण सगळ्यात मोठे मानले जातात. तुकाराम मात्र काही वेगळाच विचार करतात. संत घरी येणं, हाच आपल्या दृष्टीनं खराखुरा दिवाळीदसरा आहे, असं त्यांना वाटतं. संतांची भेट होणं, त्यांच्या पाया पडणं, हा काळ तुकारामांच्या दृष्टीनं जीवन कृतार्थ करणारा झाला. त्यांच्या मनातील संदेहाची गाठ सुटली. मनातील सर्व शंका दूर झाल्या. अंतर्यामी शीतलता निर्माण झाली. संतांच्या उपदेशाचा प्रसाद मिळाला आणि तो संसाररुपी नदी तरुन जाण्यासाठी नाव बनला. या जगामधे मंगल, हितकारक, कल्याणकारक गोष्टी देणारा यांच्याखेरीज दुसरा कोण दाता मिळेल बरं, असा प्रश्न तुकारामांनी विचारला आहे. संतांसारखा आपल्या आयुष्याला मंगलमय करुन टाकणारा दुसरा कोणी नाही, ही भावना त्यांनी यातून व्यक्त केली आहे.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment