अशा संतांच्या ऋणातून मुक्त होणंही अशक्य, असं तुकारामांना वाटतं. ते म्हणतात,
१५
काय सांगो आता संतांचे उपकार ? | मज निरंतर जागविती ||१||
काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई ? | ठेविता हा पायीं जीव थोडा ||२||
सहज बोलणे हितउपदेश | करूनि सायास शिकविती ||३||
तुका म्हणे वत्स धेनुवेचा चित्तीं | तैसे मज येती सांभाळीत ||४||
(अभंग क्र. ३६५६)
अखंडपणे सावध करणाऱ्या, जागृतीचा संदेश देणाऱ्या संतांचे जे उपकार आहेत, त्यांचं वर्णन करणंही अशक्य आहे, असं तुकारामांना वाटतं. काय दिलं असता त्यांच्या ऋणातून उतराई होता येईल, असा त्यांना प्रश्न पडला आहे. संतांच्या पायांवर जीव ठेवला, तरी त्यामुळं ऋण फिटणार नाही, ती कृती थिटीच ठरेल, असं त्यांचं मन म्हणत आहे. सहवासात असताना संत जे सहजपणानं बोलतात, तो ऐकणाऱ्याच्या दृष्टीनं हिताचा उपदेश ठरतो. ते मोठे प्रयत्न करून, कष्ट करून शिकवतात. गायीच्या चित्तामधे ज्याप्रमाणं तिच्या वासराची काळजी असते, त्याप्रमाणं संत आपली काळजी करतात, जीवनातील सर्व प्रसंगात सांभाळतात, असं तुकारामांनी अतिशय कृतज्ञतेनं नोंदविलं आहे.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment