Friday, 2 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील ७)

गर्भवती स्त्रीला होणारं सोलीव सुख तिच्या डोहाळ्यांमधून कसं प्रकट होतं, त्याचं भावस्पर्शी वर्णन तुकारामांनी एका अभंगात केलं आहे. ते म्हणतात,


आवडी येते गुणें | कळो, चिन्हे उमटती ||१||
पोटीचे ओठीं उभे राहे | चित्त साहे मनासी ||२||
डोहोळियाची भूक गर्भा | ताटीं प्रभा प्रतिबिंबे ||३||
तुका म्हणे मानोन घ्यावे | वाटे खावे वाटते ||४||

                            (अभंग क्र. ३२७६)

       गर्भवतीच्या वागण्यातून जे गुण प्रकट होतात, त्यावरुन तिला काय आवडतं, म्हणजेच तिला कोणते डोहाळे लागले आहेत, ते कळून येतं. तिच्या अंगी त्याची चिन्ह उमटतात. तिच्या पोटात तिची आणि गर्भाची जी इच्छा निर्माण झालेली असते, ती तिच्या ओठांवर येते, ती आपल्या तोंडानं ती इच्छा बोलून दाखवते. तिच्या मनात जी इच्छा उद्भवलेली असते, ती स्पष्टपणे बोलून दाखविण्यास तिचं चित्त तिच्या मनाला साहाय्य करतं. तिची चिंतनशक्ती मनातील इच्छेला शब्दरुप देते. गर्भाची जी भूक असते, जी इच्छा असते, ती डोहाळ्याच्या रुपानं व्यक्त होते. चंद्राच्या वा सूर्याच्या बिंबाची प्रभा पाण्यानं भरलेल्या ताटात प्रतिबिंबित व्हावी, तशीच गर्भाची इच्छा आईच्या डोहाळ्यामधे प्रतिबिंबित होते. म्हणूनच, गर्भवतीला जे काही खावंसं वाटतं, ते तिनं विनासंकोच मागून घ्यावं, असं तुकाराम महाराज म्हणतात. अर्थात, घरच्या लोकांनीही तिची इच्छा पूर्ण करावी, हे ओघानंच आलं.

(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील ९४२२३४५३६८)

No comments:

Post a Comment