Thursday, 1 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील ५,६)

          संतांबरोबरचं आपलं जिव्हाळ्याचं नातं स्पष्ट करताना तुकारामांना अनेकदा मायलेकरांच्या नात्याची आठवण होते. ते म्हणतात,

मातेचिये चित्तीं | अवघी बाळकाची व्याप्ति ||१||
देह विसरे आपुला | जवळीं घेता सीण गेला ||२||
दावी प्रेमभाते | आणि अंगावरि चढते ||३||
तुका संतांपुढे | पायीं झोंबे लाडें कोडें ||४||
                          (अभंग क्र. २७७६)

लेकराचे हित | वाहे माउलीचे चित्त ||१||
ऐसी कळवळ्याची जाती | करी लाभेंविण प्रीती ||२||
पोटीं भार वाहे | त्याचे सर्वस्व ही साहे ||३||
तुका म्हणे माझे | तैसे तुम्हा संतां ओझे ||४||

                     (अभंग क्र. १७४१)

आईच्या मनामधे इथून-तिथून बाळ व्यापून राहते. त्याचा विचार करताना ती आपलं देहभान विसरुन जाते. त्याला जवळ घेतल्यावर तिचा शीण जातो. तिनं मायेनं त्याला खाऊ दाखवला,  की ते तिच्या अंगावर झेपावतं. आपण या मुलाप्रमाणं संतांच्या पायांना लाडानं, कोडकौतुक करुन घेण्याच्या इच्छेनं झोंबतो, असं तुकाराम म्हणतात.
   लेकराचं हित व्हावं, हाच विचार माउलीच्या मनामधे असतो. तिच्या मनातील या कळवळ्याची जातकुळी अक्षरशः जगावेगळी असते. कसल्याही फायद्याची, परतफेडीची अपेक्षा न बाळगता प्रेम करणं म्हणजे काय, याचं आईच्या प्रेमाइतकं दुसरं उत्तम उदाहरण असू शकत नाही. आधी ती आपल्या उदरात त्याचा भार वाहते आणि नंतर आयुष्यभर त्याचं सर्व काही सहन करते. तुकारामांच्या दृष्टीनं संत हे आईसारखे असल्यामुळं ते त्यांना आपला भार वाहण्याची विनंती करीत आहेत.

2 comments:

  1. सुरेख निरुपण

    ReplyDelete
  2. खूप छान अभंग संकलन,अभंग निरूपण

    ReplyDelete