संगत
प्रत्येक मनुष्य समाजात वावरताना अनेक कारणांनी इतरांच्या सहवासात येत असतो. अशा वेळी तो ज्यांच्या संपर्कात येतो, त्यांच्या गुणदोषांचा प्रभाव त्याच्यावरही पडत असतो. आपलं जीवन अधिकाधिक सफल व्हावं, अशी आपली इच्छा असते. आपली ही इच्छा पूर्ण व्हायची असेल, तर आपण चांगल्या माणसांच्या संगतीत रहायला हवं, संतांची संगत आपल्या आयुष्याचं सोनं करते, असं तुकाराम आग्रहपूर्वक सांगत असत. ते म्हणतात,
१६
कस्तुरी भिनली जये मृत्तिके | तयेसी आणिके कैसी सरी ? ||१||
लोखंडाचे अंगीं लागला परिस | तया आणिकास कैसी सरी ? ||२||
तुका म्हणे मी न वजे यातीवरी | पूज्यमान करी वैष्णवांसी ||३||
(अभंग क्र. १७८८)
ज्या मातीमधे कस्तुरी भिनलेली असते, ती स्वतःही कस्तुरीसारखीच सुगंधानं दरवळते. ज्या मातीला असा स्पर्श झालेला नसतो, ती माती कस्तुरी भिनलेल्या मातीशी कधीही बरोबरी करु शकत नाही. ज्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झालेला नसतो, ते लोखंड परिसाचा स्पर्श झालेल्या लोखंडाची बरोबरी करु शकत नाही. याचा अर्थ असा, की ज्याला संतांचा सहवास मिळालेला नसतो, तो मनुष्य संतांचा सहवास मिळालेल्या माणसाशी कधीही बरोबरी करु शकत नाही. ज्याला संतांचा सहवास मिळालेला असतो, त्याचं जीवन आरपार बदलून जातं, ते अधिक उन्नत होतं, विशुद्ध होतं. ते संत कोणत्या जातीचे आहेत याचा आपण विचार करीत नाही, त्यांच्या जातीला महत्त्व देत नाही, तर ते वैष्णव म्हणजेच नीतिमान भक्त आहेत एवढंच पाहून त्यांना पूज्य मानतो, अशी तुकारामांची भूमिका आहे. या अभंगात तुकारामांनी संतांच्या संगतीचा गौरवही केला आहे आणि माणसामाणसांमधील समतेचं महत्त्वही लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील) ९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment