Monday, 19 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संगत २०)

२०
देव होसी तरी आणिकांते करिसी | संदेह येविशी करणे न लगे ||१||
दुष्ट होसी तरी आणिकांते करिसी | संदेह येविशी  करणे न लगे ||२||
तुका म्हणे जे दर्पणीं बिंबले | ते तया बाणले निश्चयेसी ||३||
                   (अभंग क्र. ११२८)

तुकारामांनी प्रस्तुत अभंगात संगतीचा आणखी एक पैलू सांगितला आहे. दुसऱ्याच्या संगतीत आपल्यावर काय परिणाम होतात, हे जसं त्यांनी नोंदवलं आहे, तसंच आपल्या संगतीचा इतरांवर काय परिणाम होतो, तेही त्यांनी नोंदविलं आहे. त्यांनी इथं वापरलेला 'देव' हा शब्द सद्गुणांनी युक्त मनुष्य असा व्यापक अर्थ देणारा आहे. तुकाराम या अभंगात जणू काही आपल्या प्रत्येकाशी बोलत आहेत. तू जर स्वतः सद्गुणांनी युक्त सज्जन असशील तर आपल्या सहवासात येणाऱ्या इतरांना तू सज्जन बनवशील, याविषयी शंका बाळगण्याचं कारण नाही, असं ते आपल्याला म्हणत आहेत. याउलट आपण दुष्ट असू, तर इतरांनाही दुष्ट बनवू, याविषयीही शंका बाळगण्याचं कारण नाही, असं ते स्पष्टपणानं सांगत आहेत. जो जसा असतो, त्याचं प्रतिबिंबही आरशामध्ये नेमकं तसंच पडतं, त्याच पद्धतीनं माणूस जसा असतो, तसाच त्याच्या संगतीचा परिणाम होतो. म्हणून, इतरांना सद्गुणी बनवावं अशी आपली इच्छा असल्यास आधी आपण सद्गुणी असणं महत्वाचं आहे, असं तुकाराम सांगत आहेत.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment