Sunday, 18 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संगत १९)

१९
चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर | क्षोभविता दूर तो चि भले ||१||
ऐसी परंपरा आलीसे चालत | भलत्याची नीत त्यागावरी ||२||
हो का पिता पुत्र बंधु कोणी तरि | विजाति संग्रही धरू नये ||३||
तुका म्हणे सत्य पाळावे वचन | अन्यथा आपण करू नये ||४||
                      (अभंग क्र. ४१०२)

       तुकाराम सामाजिक व्यवहारांचं सूक्ष्म विश्लेषण करण्याच्या बाबतीत अतिशय कुशल होते. त्यामुळे ते एकाच विषयाचे अनेक पैलू ध्यानात घेत असत. प्रस्तुत अभंगात त्यांनी संगतीचा एक वेगळाच पैलू शब्दबद्ध केला आहे. ज्याचं मन आपल्या मनाशी जुळतं, त्याचीच संगत आपल्याला आवडते,  आपल्याला आनंद देते आणि म्हणून अशा माणसांचीच संगत करावी. जो स्वतःच्या सहवासानं आपल्या मनात क्षोभ निर्माण करतो, आपलं मन अस्वस्थ करून टाकतो, त्याला दूर ठेवणं हेच चांगलं होय. परंपरा अशीच चालत आली आहे. ज्याची संगत भलती-सलती असेल, त्याच्या सहवासाचा त्याग करावा, हीच खरी नीती होय. मग अशी व्यक्ती पिता असो, पुत्र असो, बंधू असो, की आणखी कोणी असो. ज्यांचं वर्तन आपल्या मूल्यांशी जुळत नाही, त्याचा सहवास करू नये. आपण सत्य वचनाचं, नैतिकतेचं, माणूसकीचं पालन करावं, त्यापेक्षा वेगळं वागू नये. याचा अर्थ आपल्या सदाचाराच्या वागण्याला ज्याचा अडथळा होत असेल, त्याच्यापासून दूर रहावं.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment