Saturday, 3 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील ८)

तुकारामांनी आईच्या वात्सल्याप्रमाणंच वडिलांच्या प्रेमाचाही मोठा गौरव केला आहे. ते म्हणतात,


बाप करी जोडी लेकराचे ओढी | आपुली करवंडी वाळवूनी ||१||
एकाएकी केला मिरासीचा धनी | कडिये वागवूनी भार खांदीं ||२||
लेवऊनी पाहे डोळां अळंकार | ठेवा दावी थोर करुनिया ||३||
तुका म्हणे नेदी गांजूं आणिकांसी | उदार जीवासी आपुलिया ||४||
                   (अभंग क्र.३२६८)

बाप लेकराच्या प्रेमापोटी संपत्ती जमवत राहतो. त्यासाठी कष्ट करतो, पोट खनपटीला जाईपर्यंत उपासमार सहन करतो. त्याला कडेवर घेतो, खांद्यावर बसवतो आणि मग एकदम आपल्या सगळ्या वैभवाचा, साधनसामग्रीचा मालक बनवून टाकतो. आपल्या कष्टातून मिळवलेलं सगळं त्याला आयतं देतो. त्याच्या अंगावर दागिने घालतो आणि आपल्या डोळ्यांनी ते दृश्य पाहून त्याला डोळ्यांचं पारणं फिटल्यासारखं समाधान होतं. आपल्याकडच्या संपत्तीचं भांडार जेवढं वाढवता येईल, तेवढं वाढवून तो ते त्याला दाखवतो, त्याच्या स्वाधीन करतो. तो स्वतःच्या जीवावर उदार होतो, आपल्या प्राणांची पर्वा करीत नाही, पण दुसर्‍या कोणाला आपल्या लेकराच्या वाटेला जाऊ देत नाही, त्याचा छळ करु देत नाही.
        आईवडील आणि मुलं यांच्या या अतिशय जिव्हाळ्याच्या नात्याचा विचार करताना दोन पैलूंकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आपण मुलांसाठी इतकं सारं केलं आहे, म्हणून त्यांनी सदैव आपल्या मुठीत राहिलं पाहिजे, आपण म्हणू ते ऐकलं पाहिजे, आपण सांगू तसंच वागलं पाहिजे, असा हट्ट धरुन आईवडिलांनी मुलांचं स्वातंत्र्य कदापि हिरावून घेता कामा नये. त्यांना पंख द्यायचे, ते पंख बळकट करण्यासाठी त्यांना सर्व प्रकारची मदतही करायची, परंतु त्याबरोबरच त्यांना उड्डाणाचं स्वातंत्र्यही द्यायचं, तरच आपण त्यांच्यासाठी घेतलेल्या कष्टांचं खऱ्या अर्थाने चीज होतं.
       दुसऱ्या बाजूनं मुलांनीही आईवडिलांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याची जाण सदैव ठेवली पाहिजे. त्यांच्याविषयी अपार कृतज्ञता बाळगली पाहिजे. कृतज्ञता हा माणसाच्या काळजाचा सुगंध असतो, असं म्हणतात. मुलांनी आईवडिलांच्या बाबतीत हे वचन सदैव स्मरणात ठेवावं. काही बाबतीत त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात आणि तसे मतभेद होणं हा काही त्यांचा अनादर नव्हे. परंतु मतभेद होणं ही गोष्ट वेगळी आणि कृतघ्न बनणं ही गोष्ट वेगळी. आपल्या जीवनाचे निर्णय प्रसंगी त्यांच्या विरोधात जाऊनही घ्यावे लागले, तर ते जरुर घ्यावेत. परंतु तसं करताना त्यांनी आपल्यासाठी जे काही केलेलं असतं, त्यासाठी आयुष्यभर त्यांच्याविषयी कृतज्ञ मात्र जरुर रहावं.

(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील ९४२२३४५३६८)

No comments:

Post a Comment