आता आपल्या ध्यानात येईल, की तुकाराम आपल्या या उद्गारांमधून एकूण सर्व संतांच्या जीवितकार्याचं स्वरूपच स्पष्ट करीत आहेत. सज्जन लोक सर्वसामान्य लोकांना सन्मार्गाचा जो उपदेश करतात, त्यातून त्यांना स्वतःसाठी काही फायदा मिळवायचा नसतो, तर दुःखानी त्रासलेल्या लोकांचं दुःख दूर व्हावं ही तळमळच त्यामागं असते.
संतांचं हे वागणं नेमकं कसं असतं, हे स्पष्ट करताना तुकाराम म्हणतात :
२४
काय वाणू आता ? न पुरे हे वाणी | मस्तक चरणीं ठेवीतसे ||१||
थोरीव सांडिली आपुली परिसें | नेणे सिवो कैसे लोखंडासी ||२||
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति | देह कष्टविती उपकारें ||३||
भूतांची दया हे भांडवल संतां | आपुली ममता नाही देहीं ||४||
तुका म्हणे सुख पराविया सुखें | अमृत हे मुखें स्रवतसे ||५||
(अभंग क्र. १५१०)
संतांकडं परोपकाराची जी वृत्ती असते तिचं वर्णन करणंही अवघड आहे, ते वर्णन करण्यासाठी आपल्याकडं शब्द नाहीत, असं तुकाराम अगदी भारावलेल्या मनानं म्हणत आहेत. शब्दांना माघार घ्यावी लागत असल्यामुळं आपण संतांच्या चरणांवर मस्तक ठेऊन आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहोत, असं ते म्हणत आहेत. संतांच्या उदात्त कार्यपद्धतीचं रूप स्पष्ट करण्यासाठी ते एक दृष्टांत देत आहेत. आपल्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं करावं, असं परिसाला वाटत असतं. आपण लोखंडाला शिवण्याचा कमीपणा कसा पत्करायचा, असं तो मानत नाही. आपला मोठेपणा बाजूला ठेवून तो स्वतःहून लोखंडाला स्पर्श करतो. संत देखील नेमकं असंच वागतात. त्यांचं सगळं वैभव, व्यक्तिमत्त्व, कर्तत्व हे लोकांच्या कल्याणासाठी असतं, ते त्यांच्यावर उपकार करण्याच्या कामातच आपलं शरीर राबवितात. प्राणिमात्रांवर दया दाखवणं, हेच त्यांचं भांडवल असतं. ते स्वतःच्या देहाची, सुखाची काळजी करीत नसतात. त्यांना दुसऱ्यांच्या सुखानं सुख मिळत असतं आणि त्या इतर लोकांना सुख मिळावं, म्हणूनच त्यांच्या मुखातून उपदेशाचं अमृत स्रवत असतं, प्रकट होत असतं.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment