Saturday, 17 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संगत १८)

१८
तृषाकाळीं उदकें भेटी | पडे मिठी आवडीचा ||१||
ऐसियाचा हो का संग | जिवलग संतांचा ||२||
मिष्टान्नाचा योग भुते | म्हणता चुके पुरेसे ||३||
तुका म्हणे माते बाळा | कळवळा भेटीचा ||४||
                   (अभंग क्र. १३०१)

आपल्याला तहान लागलेली असावी आणि त्या वेळी आपल्याला नेमकं पाणी भेटावं, हा प्रसंग मोठा आनंदाचा असतो. ही घटना आपल्याला आवडणारी, आपल्या मनाला सुखावून टाकणारी असते. तहानेच्या क्षणी पाणी भेटल्यामुळं जो आनंद लाभतो, तसाच आनंद जिवलग संतांच्या संगतीमुळंही लाभतो. म्हणून, प्रत्येकानं अशी संगत लाभण्याची इच्छा करावी आणि ती प्राप्त करण्यासाठी योग्य ते प्रयत्नही करावेत. आपल्याला भूक लागलेली असावी आणि त्या वेळी आपल्याला मिष्टान्न प्राप्त व्हावं आणि तेही विपुल प्रमाणात ! अशा वेळी त्या पक्वान्नाचा जितका आस्वाद घेता येईल, तितका घ्यावा. बाळ आणि आई यांच्या भेटीमधे जी कळवळ्याची, वात्सल्याची उत्कटता असते, तीच सर्वसामान्य माणसाच्या आणि संतांच्‍या भेटीमधे असते.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment