Saturday, 24 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २३)

    परोपकार करू इच्छिणाऱ्या संतांच्या मनातील तळमळ स्पष्ट करण्यासाठी तुकारामांनी आणखी एका अभंगात कडूलिंबाचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात:

२३

पुढिलिया सुखें निंब देता भले ! बहुत वारले होय दु:ख !!१!!
हे तो वर्म असे माउलीचे हाती ! हाणी मारी प्रीती हितासाठी !!२!!
खेळता विसरे भूक तान घर ! धरूनिया कर आणी बळें !!३!!
तुका म्हणे पाळी तोंडीचिया घासें ! उदार सर्वस्वें सर्वकाळ !!४!!
                              (अभंग क्र. २१४८)

        आजारी माणसाला औषध म्हणून कडूलिंब देणं, हे त्याच्या पुढच्या सुखाच्या दृष्टीने सुखकारक असतं. त्यामुळं त्याचं खूपसं दु:ख दूर होतं. मुलाच्या बाबतीत आईचं जे वागणं असतं, त्यामधून हे रहस्य नेमकेपणानं व्यक्त होतं. ती प्रसंगी त्याला मारहाण करते, पण हे तिचं त्याच्यावरचं प्रेमच असतं, ती हे त्याच्या हितासाठी करत असते. मूल खेळण्यात रममाण झालं, की ते तहान-भूक विसरून जातं, त्याला घरी येण्याचं भानही रहात नाही. मग आई जबरदस्तीनं त्याचा हात धरून त्याला घरी आणते. ती आपल्या तोंडचा घास भरवून त्याचं पोषण करते. ती सर्व प्रकारे सदैव त्याच्या बाबतीत उदारच असते. आई जशी मुलाच्या हितासाठी त्याच्यावर अशी जबरदस्ती करते, तशीच संतही दु:खी-कष्टी लोकांना काहीशा जबरदस्तीनं सन्मार्गावर आणण्यासाठी उपदेश करतात.

(संग्राहक संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment