संत
तुकाराम संतांविषयीची आपल्या मनातील विलक्षण ओढ व्यक्त करताना वारंवार त्यांच्या प्रेमाची तुलना आईच्या वात्सल्याशी करतात. याचं कारणही स्पष्ट आहे. संतांच्या अंतःकरणात सर्वसामान्य लोकांविषयी आईच्या वात्सल्यासारखीच करुणा असते. सावाभाविकच, माणूस सुखदुःखाच्या प्रसंगी जसा आईकडं धाव घेतो, तशीच धाव माणसानं संतांकडंही घ्यावी, असं तुकारामांना वाटत असे. या उत्कट भावनेतूनच त्यांनी संतांविषयी अनेक अभंग लिहिले आहेत.
संत करुणाशील असतात, हे खरंच. परंतु जगात अनेकदा संतत्वाचा मुखवटा धारण करणारे लोकही असतात. अशा लोकांपासून संतांचं वेगळेपण कळावं, म्हणून तुकारामांनी संतांची एक अचूक व्याख्याच आपल्या हाती दिली आहे. ते म्हणतात,
अभंग ९
जे का रंजले गांजले | त्यासि म्हणे जो आपुले ||१||
तो चि साधु ओळखावा | देव तेथे चि जाणावा ||२||
मृदु सबाह्य नवनीत | तैसे सज्जनाचे चित्त ||३||
ज्यासि आपंगिता नाही | त्यासि धरी जो ह्रदयीं ||४||
दया करणे जे पुत्रासी | ते चि दासा आणि दासी ||५||
तुका म्हणे सांगू किती ? | तो चि भगवंताची मूर्ती ||६||
(अभंग क्र. ३४७)
जगात अनेक माणसं दुःखीकष्टी असतात. प्रतिकूल परिस्थितीच्या रेट्यानं जेरीला आलेली असतात. आपल्या सहवासात येणारा असाच एखादा माणूस परिस्थितीनं रंजीस आलेला असतो, गांजलेला-त्रासलेला असतो. समाजात अनेक माणसं या मेटाकुटीला आलेल्या व्यक्तीची उपेक्षा करतात, त्यांच्याकडं दुर्लक्ष करतात. परंतु एखादा माणूस त्या दुःखी माणसाला जवळ करतो. तो आपला माणूस आहे, असं मानून आपलेपणानं त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. जो अशा दुःखी माणसाच्या बाबतीत अशी आत्मीयता दाखवतो, तोच संत वा साधू आहे, हे ओळखावं. अशा माणसाला केवळ साधू मानूनच तुकाराम थांबत नाहीत, तर देव देखील अशा माणसाच्या ठिकाणीच असतो, असं ते म्हणतात. देवाची प्राप्ती करायची असेल, तर त्याचा शोध अशा संतांच्या सहवासात घेतला पाहिजे, हा तुकारामांचा उपदेश आपण नीट समजून घेतला पाहिजे. या संतसज्जनांचं मन करुणेमुळं किती हळुवार झालेलं असतं, ते सांगताना त्यांनी अंतर्बाह्य मऊ असलेल्या लोण्याची उपमा दिली आहे. एखादा माणूस निराधार, अनाथ असतो. त्याला सांभाळणारा कोणी नसतो. परंतु, जो खराखुरा संत असतो, तो त्या निराधार माणसाला आपल्या ह्रदयाशी धरतो. आपल्या पुत्रावर जे प्रेम करायचं, तेच आपले दास आणि दासी यांच्यावरही करायचं, अशा विशाल अंतःकरणाचा मनुष्य हा खरा संत म्हटला जातो. अशा व्यक्तीचं मोठेपण पुनःपुन्हा सांगावं, असं तुकारामांना वाटतं. असा मनुष्य म्हणजे साक्षात भगवंताची मूर्ती होय, हे तुम्हांला किती वेळा सांगू, असा प्रश्नच त्यांनी लोकांना विचारला आहे. खरं तर हा प्रश्न आपल्याला पण लागू आहे, हे आपण अतिशय गंभीरपणानं समजून घेतलं पाहिजे.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment