संत
आपल्या अंतःकरणातील कळवळ्यापोटी संत कसे वागतात, ते उपमांद्वारे स्पष्ट करताना तुकाराम म्हणतात,
अभंग १०
अर्भकाचे साटी | पंतें हाती धरिली पाटी ||१||
तैसे संत जगीं | क्रिया करुनी दाविती अंगीं ||२||
बालकाचे चाली | माता जाणुनि पाउल घाली ||३||
तुका म्हणे नाव | जनासाठी उदकीं ठाव ||४||
(अभंग क्र. ४०८२)
लोकांच्या कल्याणासाठी संत नेहमी चांगल्या वागणुकीचा उपदेश करीत असतात. परंतु, हा उपदेश करण्याचा अधिकार त्यांनी स्वतःच्या चारित्र्यानं प्राप्त केलेला असतो. लोकांना जे सांगायचं, ते आपण आधी करुन दाखवायचं, ही त्यांच्या जगण्याची रीत असते. मुलानं हातात पाटी कशी धरावी, पेन्सिलीनं अक्षर कसं गिरवावं, हे त्याला शिकवताना शिक्षक आधी स्वतःच्या हातात पाटी घेतो. आई मुलाला चालायला शिकवताना स्वतः एक एक पाऊल चालून त्याला पावलं टाकायला शिकविते. नाव स्वतः पाण्यात वावरते, ती स्वतःसाठी नव्हे, तर लोकांना पैलतीराला नेण्यासाठी. संतांचं कार्य हे असंच लोकांच्या कल्याणासाठी असतं.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६४
No comments:
Post a Comment