संत हा जो उपदेश करतात, त्याचे आणखी काही पैलू तुकारामांनी एका अभंगात मांडले आहेत. ते म्हणतात :
२५
अधिकार तैसा दावियेला मार्ग | चालता हे मग कळो येते ||१||
जाळू नये नाव पावलेनि पार | मागील आधार बहुतांचा ||२||
तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं | नाही, करी जगीं उपकार ||३||
(अभंग क्र. ५३८)
संत सर्वांनाच उपदेश करतात, परंतु प्रत्येकाला उपदेश करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. ज्याचा जसा अधिकार असतो, जशी पात्रता असते, त्यानुसार ते त्याला कोणत्या मार्गानं जावं, त्याचा उपदेश करतात. माणूस जेव्हा त्या मार्गावरून प्रत्यक्ष चालतो, तेव्हा त्याला हा उपदेश उपयोगी पडतो. त्या वेळी त्याला या उपदेशाचं महत्त्व कळून येतं. उपदेशामुळं ज्याचं कल्याण झालेलं असतं, त्यानं संतांनी दाखविलेला मार्ग मोडू नये, त्याचं नुकसान करू नये. आपण नावेतून पलीकडं गेलो, तर पैलतीराला गेल्याच्या धुंदीत नाव जाळून टाकण्याचा कृतघ्नपणा करू नये. कारण, ती आपल्या मागून येणार्या खूप लोकांचा आधार असते. संत या नावेसारखेच असतात. आपल्याला त्यांच्या उपदेशाचा लाभ झाला, आता त्यांची गरज राहिली नाही, असं मानून त्यांना हानी पोचवू नये. कारण, ते इतर अनेकांचा आधार होत असतात. खरं तर संत हे एखाद्या वैद्यासारखे असतात. राेगी माणसाच्या अंगात रोग असतो. तो रोग काही वैद्याच्या अंगात नसतो. तरी देखील वैद्य त्या रोगाचा अभ्यास करतो, त्याचं निदान करतो आणि त्याच्यावर उपचार करतो. संतांचं कार्य हे असंच असतं. स्वतः त्यांच्या जीवनात जे दुःख नसतं, ते इतरांच्या जीवनातील दुःख त्यांना दिसत असतं आणि ते दूर करण्यासाठी त्यांची सगळी धडपड असते.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८