Tuesday, 31 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३९)

संतांची भेट झाली, की त्यांच्याकडून काहीतरी हिताचंच ऐकायला मिळतं, हे स्पष्ट करताना तुकाराम एका अभंगात म्हणतात,

३९

भल्याचे दर्शन ! तेथे शुभ चि वचन !!१!!
बोलावी हे धर्मनीत ! क्षोभें होत नाही हित !!२!!
मर्यादा ते बरी ! वेळ जाणावी चतुरी !!३!!
तुका म्हणे बहु ! लगे ऐसे बरे मऊ !!४!!
                    (अभंग क्र. ३०४०)

भल्या माणसाची भेट झाली, की त्याच्या तोंडून काही तरी हिताचंच ऐकायला मिळतं. काही तरी धर्माचं, नीतीचं बोलावं, हा त्याचा स्वभाव असतो. त्याला दुखावण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं काही नुकसान होत नाही, परंतु आपण आपल्या हिताला मुकतो. म्हणून, शहाण्या लोकांनी अशा प्रसंगी नीट मर्यादा जाणावी, वेळप्रसंग जाणावा आणि त्याच्या सहवासातून आपल्याला आपल्या हिताचं जे काही मिळवता येईल, ते मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्याबरोबर अतिशय मऊपणानं संयमानं, औचित्यानं बोलणं हे चांगलं असतं. त्याच्या बरोबरच्या अशा संवादामुळं आपल्याला त्याच्याकडून चार चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्यांच्यामुळं आपलं जीवन चांगल्या दिशेनं बदलू शकतं.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

 

Sunday, 29 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३८)

संतांचा उपदेश किती हितकारक असतो, हे सांगताना तुकारामांचं मन इतकं आनंदमय झालं आहे, की त्यांच्या शब्दाशब्दामधून प्रसन्नता ओसंडून वाहताना दिसते. एका अभंगात ते म्हणतात,

३८

जीवित्व ते किती ? ! हे चि धरिता बरे चित्तीं !!१!!
संत सुमनें उत्तरें ! मृदू रसाळ मधुरें !!२!!
विसावता कानीं ! परिपाक घडे मनीं !!३!!
तुका म्हणे जोडी ! हाय जतन रोकडी !!४!!
              (अभंग क्र.१३५१)

बोलून चालून आपलं आयुष्य किती थोडं असतं, याचा माणसानं आपल्या मनामधे नीट विचार करावा. असं केलं असता त्याचा नीट उपयोग करण्याची भावना तीव्र होऊ शकते. आयुष्याचं चीज व्हायचं असेल, तर आपल्या हितचिंतकांचा उपदेश ऐकणं हे आपल्या कल्याणाचं असतं. संतांचे उपदेशाचे बोल, ही खरं तर फुलं असतात. त्यांची वचनं मृदू असतात, रसाळ असतात, मधुर असतात. ती आपल्या कानांमधे विसावली, तर तिथून आपल्या आत उतरतात आणि त्यांचा आपल्या मनावर चांगला परिणाम होतो. आपल्याला होणारा हा लाभ असाधारण असतो. खरं तर हा रोखीचा व्यवहार असतो. माणसानं संतांच्या वचनांचा होणारा हा लाभ चांगला जतन करायला हवा, त्याच्या आधारे आपलं जीवन कृतार्थ करायला हवं.


(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Friday, 27 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३७)

शब्दांच्या बाह्य स्वरूपापेक्षा अर्थ अधिक महत्त्वाचा, शब्दांना अनुसरून केलेलं आचरण महत्त्वाचं, किंबहुना कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत बहिरंगापेक्षा अंतरंगच महत्त्वाचं, हे तुकारामांनी एका अभंगात मनाला सहज पटणाऱ्या भाषेत नोंदविलं आहे. ते म्हणतात,

३७

सोनियाचा कळस ! माजी भरिला सुरारस !!१!!
काय करावे प्रमाण ? ! तुम्ही सांगा संतजन !!२!!
मृत्तिकेचा घट ! माजी अमृताचा सांट !!३!!
तुका म्हणे हित ! ते मज सांगावे त्वरित !!४!!
                  (अभंग क्र. ११४६)

एखादा सोन्याचा घडा आहे आणि त्यामधे मद्य भरलेलं आहे. अशा वेळी घडा सोन्याचा आहे याला महत्त्व द्यायचं, की त्याच्यामधे मद्य भरलेलं आहे हे ध्यानात घ्यायचं, ते तुम्हीच सांगा, असं तुकारामांनी संतजनांना विचारलं आहे. त्यांनी हाच प्रश्न संतांना आणखी एक प्रकारे विचारला आहे. घडा मातीचा आहे. पण त्यामधे अमृताचा साठा आहे, अशी स्थिती असेल, तर महत्त्व कशाला द्यावं, ते मला त्वरित सांगा, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांना उत्तर काय अभिप्रेत आहे, ते स्पष्ट आहे. घडा सोन्याचा आहे, की मातीचा आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्यामधे काय आहे, हे खरं महत्त्वाचं आहे. तसंच, कोणत्याही गोष्टीचं बाह्य रूप कसं आहे, याकडं लक्ष देण्यापेक्षा तो पदार्थ आतून कसा आहे, त्याचं सत्त्व कसं आहे हे पहावं, असा तुकारामांचा दृष्टीकोण आहे.


(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८


 

Thursday, 26 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३६)

शब्दाला अर्थाची जोड नसेल तर ज्याप्रमाणं तो पोकळ होतो, त्याप्रमाणं त्याला आचरणाची जोड नसेल तरी तो निरर्थक ठरतो. म्हणून, आपल्या शब्दाला, बोलण्याला आचरणाची जोड दिली पाहिजे, या बाबतीत तुकाराम अतिशय आग्रही होते. या संदर्भातील त्यांचा एक अभंग अतिशय विख्यात आहे. त्यामधे ते म्हणतात,

३६
बोले तैसा चाले ! त्याची वंदीन पाउले !!१!!
अंगें झाडीन अंगण ! त्याचे दासत्व करीन !!२!!
त्याचं होईन किंकर ! उभा ठाकेन जोडोनि कर !!३!!
तुका म्हणे देव ! त्याचे चरणी माझा भाव !!४!!
                    (अभंग क्र.४३१६)


तुकारामांनी या अभंगात व्यक्त केलेली भावना अतिशय उत्कट आहे. कोणताही दुटप्पीपणा वा ढोंग न करता बोलणं आणि वागणं यांमधे सुसंगती ठेवणाऱ्या व्यक्तीविषयी तुकारामांनी जो आदर व्यक्त केला आहे, तो त्यांच्या आंतर्बाह्य विशुद्ध शीलाचा द्योतक आहे. ते अशा माणसाच्या पायांवर मस्तक ठेवून त्याला वंदन करण्यास, स्वतःच्या हाताने त्याचे आंगण झाडण्यास, त्याचं दास्य करण्यास आणि त्याचा नोकर होऊन त्याची आज्ञा ऐकण्यासाठी त्याच्या पुढं हात जोडून उभं राहण्यास तयार आहेत. असा मनुष्य म्हणजे देव आहे आणि माझ्या मनातील आदराची भावना त्याच्या चरणी आहे, असं ते म्हणतात. आपण जेव्हा एखादा शब्द उच्चारतो, तेव्हा आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी येते, याचं भान तुकारामांच्या या अभंगामुळं येऊ शकतं आणि आलं पाहिजेही.



(संग्राहक :- संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८





Wednesday, 25 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३५)

आता, शब्द महत्वाचे असतात, हे खरंच आहे. परंतु त्यांचं खरं सौंदर्य आणि सामर्थ्य अर्थामधे असतं. अर्थ बाजूला केला, तर शब्द निव्वळ फोलपटासारखे होतात. म्हणूनच, अर्थ न जाणता पाठांतर करणं तुकारामांना मान्य नव्हतं. ते म्हणतात,

३५
अर्थेंविण पाठांतर कासया करावे ? ! व्यर्थ चि मरावे घोकूनिया !!१!!
घोकूनिया काय ? वेगीं अर्थ पाहे ! अर्थरूप राहे होऊनिया !!२!!
तुका म्हणे ज्याला अर्थीं आहे भेटी ! नाही तरी गोष्टी बोलो नका !!३!!
                                  (अभंग क्र. ४२१२)

अर्थ समजून न घेता पाठांतर कशाला करावं ? शब्द नुसते उगाचच घोकून व्यर्थ कशाला मरावं ? शब्द नुसते घोकून काय उपयोग ? चटकन त्यांचा अर्थ पहावा. किंबहुना, आपण शब्दांच्या मदतीनं अर्थरूप व्हावं. जो मनुष्य अर्थाला भेटण्याचा, त्याला जाणण्याचा, त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं जीवन सार्थक होतं. आपल्याला अर्थापर्यंत जायचं नसेल, तर पोकळ शब्दांच्या गप्पा मारू नयेत.

(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Tuesday, 24 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३४)

शब्द हे साधन अतिशय प्रभावी आहे, ते शास्त्रही आहे आणि म्हणूनच ते अतिशय जपून, काळजीपूर्वक आणि विवेकानं वापरलं पाहिजे, हा तुकारामांचा आग्रह होता. म्हणूनच शब्दप्रयोगाच्या बाबतीत ते समाजाला वारंवार मार्गदर्शन करीत असत. कुणी अर्थहीन, कठोर, भावशून्य आणि प्रसंगी दुसऱ्याच्या काळजाला जखमा करणारं बोलत असेल, तर आपण त्यापासून दूर रहावं, नाही तर तसं बोलण्याची आपल्यालाही सवय लागू शकते, हे समजावून सांगताना ते म्हणतात,

३४
फट्याचे बडबडे चवी ना सवाद ! आपुला चि वाद आपणासी !!१!!
कोणे या शब्दाचे मरावे घसणी ! अंतरे शाहाणी राहिजे हो !!२!!
गाढवाचा भुंक आइकता कानीं ! काय कोडवाणी ऐसियेचे ? !!३!!
तुका म्हणे ज्यासी करावे वचन ! त्याचे येती गुण अंगास ते !!४!!
                            (अभंग क्र. ४२०६)

एखादा मनुष्य मागचा पुढचा विचार न करता फटाफट बडबड करतो, त्याच्या बोलण्याला ना चव असते, ना स्वाद असतो. ते बोलणं काही हितकारक नसतं. असं बोलणं ऐकत बसण्यापेक्षा आपण अंतर्मुख होऊन आपल्याच विश्वात मग्न होणं चांगलं. आपण आपला स्वतःशीच वाद करावा, संवाद करावा. या आत्मवादातून, आत्मसंवादातून आपल्याला स्वतःचाच शोध घेता येईल. त्यातून आपल्याला आपले गुणदोष समजतील आणि आपण स्वतःचं शुद्धीकरण करू शकू, आपला विकास साधू शकू. दुसऱ्याचे नको असलेले शब्द ऐकून त्याच्याशी वाद घालण्याची घासाघीस करीत बसणं म्हणजे एक प्रकारचं मरणंच होय. असं उगीचच कुणी कशाला मरावं ? त्यापेक्षा आपल्या आत डोकावून पहावं, आपल्या आतच असलेल्या सुखाच्या भांडाराचा शोध घ्यावा, हेच शहाणपणाचं होय. गाढवाचं ओरडणं हे काही गोडव्यानं भरलेलं नसतं. आपण कानांनी ते ऐकलं, तर आपल्याला काही आनंद होत नाही, त्याचं कोडकौतुक वाटत नाही, आपण काही त्याचं ओरडणं ऐकून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही. हा सावधपणा आवश्यक आहे. कारण आपण ज्याच्याबरोबर बोलतो, संवाद करतो, त्याचे गुण आपल्या अंगाला चिकटतात.


(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Saturday, 21 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३३)

शब्दरूपी साधन कसं वापरावं, याविषयी तुकारामांनी आपल्याला नाना मार्गांनी सल्ला दिला आहे. ते म्हणतात,

३३
वचन ते नाही तोडीत शरीरा ! भेदत अंतरा वज्राऐसे !!१!!
काही न सहावे काशा ही कारणें ! संदेह निधान देह बळी !!२!!
नाही शब्द मुखीं लागत तिखट ! नाही जड होत पोट तेणें !!३!!
तुका म्हणे जरी गिळे अहंकार ! तरी वसे घर नारायण !!४!!
                   (अभंग क्र. २४४०)
एखादा मनुष्य जेव्हा दुसऱ्याला दुखावणारं काही तरी बोलतो, तेव्हा ते बोलणं काही ऐकणाऱ्याच्या शरीराला तोडत नाही. पण ते बोलणं वज्राप्रमाणं त्याच्या अंतःकरणाला भेदत जातं. अशा प्रकारे बोलणारा तापट माणूस कुठल्याही कारणानं काहीही सहन करीत नाही. एखाद्या बाबतीत त्याला काही संदेह, संशय असलाच, तर तो त्याचा देह बळी गेल्यानंतरच म्हणजे त्याच्या मृत्यूनंतरच दूर होतो. याचा अर्थ त्याला लागट बोलण्याची जी सवय लागलेली असते, ती तो हयात असेपर्यंत सुटत नाही. मरेपर्यंत तो त्याच पद्धतीनं बोलत राहतो. अशा प्रकारे बोलणारा मनुष्य जेव्हा काही शब्द उच्चारतो, तेव्हा ते शब्द काही त्याच्या तोंडात तिखट लागत नाहीत किंवा अशा शब्दामुळं काही त्याचं व ऐकणाराचं पोट जड होत नाही, त्यामुळं आपल्या बोलण्याचा काय परिणाम होतो , हे त्याला कळत नाही. परंतु या प्रकारातून घरात मात्र दुःखाचा कल्लोळ निर्माण होतो. खरं तर माणसानं जर अहंकार गिळला, तर घरामधे साक्षात ईश्वर वास्तव्य करू लागतो.


(संग्राहक :- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८