सत्य ७२
७२
दह्याचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागो नये ॥१॥
आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणे । दोहींशी समान पाहो नये ।।२।।
पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी संसाटी करू नये ।।३।।
तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजू नये ॥४॥
(अभंग. क्र. २४९२)
एकाच दह्यामधून ताक आणि लोणी निघतं. ते एकाच ठिकाणाहून निघालं आहे. एवढ्या कारणानं त्या दोन्ही पदार्थांना एकाच किमतीत मागू नये. आकाशामधे चंद्र आणि तारांगणं असतात. परंतु दोघांकडं समान दृष्टीनं पाहू नये. पृथ्वीच्या पोटी हिराही सापडतो आणि गारगोटीही सापडते, परंतु दोहोंना समान मानू नये. त्याच पद्धतीनं संत परोपकार, करुणा, शील इ. कारणांनी सर्वसामान्य लोकांपेक्षा अधिक उन्नत असतात. म्हणून, त्या दोघांना समान मानू नये. उलट, सामान्य माणसांनी संतांच्या जीवनाचा आदर्श आपल्या नजरेसमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी. आपल्याला प्रेरणा देणाऱ्या सर्व महामानवांच्या बाबतीत आपला हाच दृष्टिकोण असावा.
डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment