सत्य ७०
७०
नव्हे खळवादी मता च पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥ १॥
साक्षत्वेसी मना आणावी उत्तरे । परिपाकी खरे खोटे कळे ॥२॥
नव्हे एकदेशी शब्द हा उखता । ब्रह्मांडापुरता घेईल त्यासी ॥३॥
तुका विनवणी करी जाणतिया । बहुमतें वाया श्रमो नये ॥४॥
(अभंग. क्र. १४६४)
एखादा मनुष्य आपली दुष्टपणाची मतं मांडत असतो. त्याचं सगळं बोलणं आपली या प्रकारची मतं मांडण्यापुरतंच मर्यादित असतं. मी या माणसासारखा नाही, माझा उपदेश हा सत्याची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आहे, असं स्पष्ट आत्मनिवेदन तुकारामांनी केलं आहे. सत्य-असत्य यांच्या बाबतीत साक्षच काढायची असेल, तर दुष्टाचं बोलणं आणि माझं बोलणं यांची तुलना करावी, म्हणजे अखेरीस खरं काय आणि खोटं काय ते कळू शकेल, असं ते म्हणतात. माझा शब्द, माझं बोलणं, माझा उपदेश एकांगी वा संकुचित नाही, जो कोणी त्याला समजून घेईल त्याच्या दृष्टीनं तो विश्वव्यापक आहे, असंही ते म्हणतात. आत्मविश्वासानं आणि निर्धारानं हे नोंदविल्यानंतर ते जाणत्या लोकांना एक विनवणी करतात. दुष्ट माणसं आपली जी खूप काही मतं मांडत असतात, त्यांच्या नादी लागून आपले श्रम वाया घालवू नयेत, ही त्यांची विनंती आहे. एकीकडून आत्मविश्वास आणि दुसरीकडून विनम्रता, हा त्यांच्या या अभंगाचा खास वेगळेपणा आहे.
डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment