आपलं वर्तन विशुद्ध असावं, चारित्र्य निर्दोष असावं, यावाबतीत तुकाराम अतिशय आग्रही होते. एका अभंगात ते म्हणतात,
७३
शुद्धबीजा पोटीं । फळे रसाळ गोमटी ।।१।।
मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥२॥
सर्वांग निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ || ३ ॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ।। ४ ।। (अभंग. क्र. ६२)
जे बीज शुद्ध असतं, त्याचा वंशविस्तार झाल्यानंतर त्याला येणारी फळंही तशीच शुद्ध असतात, रसाळ आणि सुंदर असतात. म्हणून माणसानं आपल्या तोंडी अमृताची वाणी असू द्यावी. याचा अर्थ लोकांशी बोलताना जे हिताचं असेल, कल्याणाचं असेल आणि मधुरही असेल, ते बोलावं, आपला देह, आपलं सगळं जीवन हे कारणी लावावं, चांगल्या कामासाठी खर्ची घालावं. मन गंगेच्या पाण्याप्रमाणं सर्व बाजूंनी निर्मळ ठेवावं. आपलं अवघं जीवन असं बनलेलं असलं, म्हणजे आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांची सगळी दुःख दूर होतात. आपल्या भेटीनं त्यांचे ताप नाहीसे होतात, त्यांना विसावा मिळतो, मनःशांती मिळते, त्यांचे जीव सुखावतात.
डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment