Friday, 2 September 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( आघात ६८ )

                    आघात ६८

          फळांच्या पक्वतेच्या संदर्भात तुकारामांनी एकापेक्षा एक सरस असे किती तरी अभंग लिहिले आहेत. त्यांपैकी एका अभंगात ते म्हणतात,

६८ 
फळ देठीहून झडे । मग मागुते न जोडे ।।१॥
 म्हणोनि तातडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥२॥
पुढे चढे हात । त्याग मागिला उचित ।।३।।
 तुका म्हणे रणीं । नये पाहो परतोनि ।। ४।।

 (अभंग. क्र. १८४६)

फळ एकदा देठापासून तुटलं, की नंतर ते मूळ जागी जोडलं जात नाही. म्हणून ते क असताना तोडण्याची घाई करू नये. अशा प्रकारची घाई खोटी म्हणजे हानिकारक ठरते. औचित्य सांभाळलं, योग्य वेळी योग्य गोष्ट केली, तर ती सत्कारणी लागते. यशस्वी होते. जे फळाच्या बाबतीत, तेच जीवनातील इतर घटनांच्याही बाबतीत घडतं. म्हणून पुढची गोष्ट पक्केपणानं हाती लागल्यानंतरच आधीची गोष्ट सोडणं योग्य ठरतं. याचा अर्थ त्या त्या कामाच्या बाबतीतही परिस्थिती पक्व होणं आवश्यक असतं. प्रत्येक गोष्टीचं फळ मिळण्यासाठी योग्य वेळ जावा लागतो. म्हणून घाईघाईनं कोणताही निर्णय घेऊ नये. सर्व बाजू समजावून घेतल्याशिवाय, मागचा पुढचा विचार केल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलू नये. एकदा विचारपूर्वक पाऊल उचललं, की मग मात्र माघार घेऊ नये. एकदा रणांगणात उतरल्यानंतर फिरून मागं पाहू नये.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment