तुकारामांनी आयुष्यभर आपल्या अभंगांतून सत्याचा गौरव केल्याचं आढळतं. ते म्हणतात,
६९
जाणावे ते सार । नाही तरी दगा फार ।।१।।
डोळे झांकिलिया रवि । नाही ऐसा होय जेवी ॥२॥
बहुथोड्या आड निवारिता लाभ जाड ।।३।।
तुका म्हणे खरे । नेले हातीचे अंधारें ।।४।।
(अभंग. क्र. २०८७)
जे सारभूत आहे, यथार्थ सत्य आहे, ते जाणावं. नाही तर माणसाची मोठी फसवणूक होते. असत्याच्या पाठीमागं धावणाराला मोठा फटका बसतो. सत्य कधी लपून रहात नसतं. ते सूर्याप्रमाणं स्वयंप्रकाशी असतं. सूर्य प्रकाशत असतानाही आपण डोळे मिटून घेतले, तर सूर्य जणू काही अस्तित्वात नाही, असा भास होऊ शकतो. सत्याच्या बाबतीतही अशीच स्थिती असते. आपण सत्याकडं डोळेझाक केली, तरी सत्याचं अस्तित्व लोप पावत नाही. सत्याच्या आड येणारे जे काही थोडे बहुत अडथळे असतात ते दूर केले, की आपल्याला मोठा लाभ प्राप्त होतो. याउलट, आपण अज्ञानाच्या अंधारालाच चिकटून बसलो, तर सत्य आपल्याला दुरावतं. असं घडू नये, म्हणून आपण सावध रहावं.
डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment