Tuesday, 31 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३९)

संतांची भेट झाली, की त्यांच्याकडून काहीतरी हिताचंच ऐकायला मिळतं, हे स्पष्ट करताना तुकाराम एका अभंगात म्हणतात,

३९

भल्याचे दर्शन ! तेथे शुभ चि वचन !!१!!
बोलावी हे धर्मनीत ! क्षोभें होत नाही हित !!२!!
मर्यादा ते बरी ! वेळ जाणावी चतुरी !!३!!
तुका म्हणे बहु ! लगे ऐसे बरे मऊ !!४!!
                    (अभंग क्र. ३०४०)

भल्या माणसाची भेट झाली, की त्याच्या तोंडून काही तरी हिताचंच ऐकायला मिळतं. काही तरी धर्माचं, नीतीचं बोलावं, हा त्याचा स्वभाव असतो. त्याला दुखावण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं काही नुकसान होत नाही, परंतु आपण आपल्या हिताला मुकतो. म्हणून, शहाण्या लोकांनी अशा प्रसंगी नीट मर्यादा जाणावी, वेळप्रसंग जाणावा आणि त्याच्या सहवासातून आपल्याला आपल्या हिताचं जे काही मिळवता येईल, ते मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्याबरोबर अतिशय मऊपणानं संयमानं, औचित्यानं बोलणं हे चांगलं असतं. त्याच्या बरोबरच्या अशा संवादामुळं आपल्याला त्याच्याकडून चार चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्यांच्यामुळं आपलं जीवन चांगल्या दिशेनं बदलू शकतं.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

 

Sunday, 29 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३८)

संतांचा उपदेश किती हितकारक असतो, हे सांगताना तुकारामांचं मन इतकं आनंदमय झालं आहे, की त्यांच्या शब्दाशब्दामधून प्रसन्नता ओसंडून वाहताना दिसते. एका अभंगात ते म्हणतात,

३८

जीवित्व ते किती ? ! हे चि धरिता बरे चित्तीं !!१!!
संत सुमनें उत्तरें ! मृदू रसाळ मधुरें !!२!!
विसावता कानीं ! परिपाक घडे मनीं !!३!!
तुका म्हणे जोडी ! हाय जतन रोकडी !!४!!
              (अभंग क्र.१३५१)

बोलून चालून आपलं आयुष्य किती थोडं असतं, याचा माणसानं आपल्या मनामधे नीट विचार करावा. असं केलं असता त्याचा नीट उपयोग करण्याची भावना तीव्र होऊ शकते. आयुष्याचं चीज व्हायचं असेल, तर आपल्या हितचिंतकांचा उपदेश ऐकणं हे आपल्या कल्याणाचं असतं. संतांचे उपदेशाचे बोल, ही खरं तर फुलं असतात. त्यांची वचनं मृदू असतात, रसाळ असतात, मधुर असतात. ती आपल्या कानांमधे विसावली, तर तिथून आपल्या आत उतरतात आणि त्यांचा आपल्या मनावर चांगला परिणाम होतो. आपल्याला होणारा हा लाभ असाधारण असतो. खरं तर हा रोखीचा व्यवहार असतो. माणसानं संतांच्या वचनांचा होणारा हा लाभ चांगला जतन करायला हवा, त्याच्या आधारे आपलं जीवन कृतार्थ करायला हवं.


(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Friday, 27 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३७)

शब्दांच्या बाह्य स्वरूपापेक्षा अर्थ अधिक महत्त्वाचा, शब्दांना अनुसरून केलेलं आचरण महत्त्वाचं, किंबहुना कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत बहिरंगापेक्षा अंतरंगच महत्त्वाचं, हे तुकारामांनी एका अभंगात मनाला सहज पटणाऱ्या भाषेत नोंदविलं आहे. ते म्हणतात,

३७

सोनियाचा कळस ! माजी भरिला सुरारस !!१!!
काय करावे प्रमाण ? ! तुम्ही सांगा संतजन !!२!!
मृत्तिकेचा घट ! माजी अमृताचा सांट !!३!!
तुका म्हणे हित ! ते मज सांगावे त्वरित !!४!!
                  (अभंग क्र. ११४६)

एखादा सोन्याचा घडा आहे आणि त्यामधे मद्य भरलेलं आहे. अशा वेळी घडा सोन्याचा आहे याला महत्त्व द्यायचं, की त्याच्यामधे मद्य भरलेलं आहे हे ध्यानात घ्यायचं, ते तुम्हीच सांगा, असं तुकारामांनी संतजनांना विचारलं आहे. त्यांनी हाच प्रश्न संतांना आणखी एक प्रकारे विचारला आहे. घडा मातीचा आहे. पण त्यामधे अमृताचा साठा आहे, अशी स्थिती असेल, तर महत्त्व कशाला द्यावं, ते मला त्वरित सांगा, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांना उत्तर काय अभिप्रेत आहे, ते स्पष्ट आहे. घडा सोन्याचा आहे, की मातीचा आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्यामधे काय आहे, हे खरं महत्त्वाचं आहे. तसंच, कोणत्याही गोष्टीचं बाह्य रूप कसं आहे, याकडं लक्ष देण्यापेक्षा तो पदार्थ आतून कसा आहे, त्याचं सत्त्व कसं आहे हे पहावं, असा तुकारामांचा दृष्टीकोण आहे.


(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८


 

Thursday, 26 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३६)

शब्दाला अर्थाची जोड नसेल तर ज्याप्रमाणं तो पोकळ होतो, त्याप्रमाणं त्याला आचरणाची जोड नसेल तरी तो निरर्थक ठरतो. म्हणून, आपल्या शब्दाला, बोलण्याला आचरणाची जोड दिली पाहिजे, या बाबतीत तुकाराम अतिशय आग्रही होते. या संदर्भातील त्यांचा एक अभंग अतिशय विख्यात आहे. त्यामधे ते म्हणतात,

३६
बोले तैसा चाले ! त्याची वंदीन पाउले !!१!!
अंगें झाडीन अंगण ! त्याचे दासत्व करीन !!२!!
त्याचं होईन किंकर ! उभा ठाकेन जोडोनि कर !!३!!
तुका म्हणे देव ! त्याचे चरणी माझा भाव !!४!!
                    (अभंग क्र.४३१६)


तुकारामांनी या अभंगात व्यक्त केलेली भावना अतिशय उत्कट आहे. कोणताही दुटप्पीपणा वा ढोंग न करता बोलणं आणि वागणं यांमधे सुसंगती ठेवणाऱ्या व्यक्तीविषयी तुकारामांनी जो आदर व्यक्त केला आहे, तो त्यांच्या आंतर्बाह्य विशुद्ध शीलाचा द्योतक आहे. ते अशा माणसाच्या पायांवर मस्तक ठेवून त्याला वंदन करण्यास, स्वतःच्या हाताने त्याचे आंगण झाडण्यास, त्याचं दास्य करण्यास आणि त्याचा नोकर होऊन त्याची आज्ञा ऐकण्यासाठी त्याच्या पुढं हात जोडून उभं राहण्यास तयार आहेत. असा मनुष्य म्हणजे देव आहे आणि माझ्या मनातील आदराची भावना त्याच्या चरणी आहे, असं ते म्हणतात. आपण जेव्हा एखादा शब्द उच्चारतो, तेव्हा आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी येते, याचं भान तुकारामांच्या या अभंगामुळं येऊ शकतं आणि आलं पाहिजेही.



(संग्राहक :- संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८





Wednesday, 25 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३५)

आता, शब्द महत्वाचे असतात, हे खरंच आहे. परंतु त्यांचं खरं सौंदर्य आणि सामर्थ्य अर्थामधे असतं. अर्थ बाजूला केला, तर शब्द निव्वळ फोलपटासारखे होतात. म्हणूनच, अर्थ न जाणता पाठांतर करणं तुकारामांना मान्य नव्हतं. ते म्हणतात,

३५
अर्थेंविण पाठांतर कासया करावे ? ! व्यर्थ चि मरावे घोकूनिया !!१!!
घोकूनिया काय ? वेगीं अर्थ पाहे ! अर्थरूप राहे होऊनिया !!२!!
तुका म्हणे ज्याला अर्थीं आहे भेटी ! नाही तरी गोष्टी बोलो नका !!३!!
                                  (अभंग क्र. ४२१२)

अर्थ समजून न घेता पाठांतर कशाला करावं ? शब्द नुसते उगाचच घोकून व्यर्थ कशाला मरावं ? शब्द नुसते घोकून काय उपयोग ? चटकन त्यांचा अर्थ पहावा. किंबहुना, आपण शब्दांच्या मदतीनं अर्थरूप व्हावं. जो मनुष्य अर्थाला भेटण्याचा, त्याला जाणण्याचा, त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं जीवन सार्थक होतं. आपल्याला अर्थापर्यंत जायचं नसेल, तर पोकळ शब्दांच्या गप्पा मारू नयेत.

(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Tuesday, 24 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३४)

शब्द हे साधन अतिशय प्रभावी आहे, ते शास्त्रही आहे आणि म्हणूनच ते अतिशय जपून, काळजीपूर्वक आणि विवेकानं वापरलं पाहिजे, हा तुकारामांचा आग्रह होता. म्हणूनच शब्दप्रयोगाच्या बाबतीत ते समाजाला वारंवार मार्गदर्शन करीत असत. कुणी अर्थहीन, कठोर, भावशून्य आणि प्रसंगी दुसऱ्याच्या काळजाला जखमा करणारं बोलत असेल, तर आपण त्यापासून दूर रहावं, नाही तर तसं बोलण्याची आपल्यालाही सवय लागू शकते, हे समजावून सांगताना ते म्हणतात,

३४
फट्याचे बडबडे चवी ना सवाद ! आपुला चि वाद आपणासी !!१!!
कोणे या शब्दाचे मरावे घसणी ! अंतरे शाहाणी राहिजे हो !!२!!
गाढवाचा भुंक आइकता कानीं ! काय कोडवाणी ऐसियेचे ? !!३!!
तुका म्हणे ज्यासी करावे वचन ! त्याचे येती गुण अंगास ते !!४!!
                            (अभंग क्र. ४२०६)

एखादा मनुष्य मागचा पुढचा विचार न करता फटाफट बडबड करतो, त्याच्या बोलण्याला ना चव असते, ना स्वाद असतो. ते बोलणं काही हितकारक नसतं. असं बोलणं ऐकत बसण्यापेक्षा आपण अंतर्मुख होऊन आपल्याच विश्वात मग्न होणं चांगलं. आपण आपला स्वतःशीच वाद करावा, संवाद करावा. या आत्मवादातून, आत्मसंवादातून आपल्याला स्वतःचाच शोध घेता येईल. त्यातून आपल्याला आपले गुणदोष समजतील आणि आपण स्वतःचं शुद्धीकरण करू शकू, आपला विकास साधू शकू. दुसऱ्याचे नको असलेले शब्द ऐकून त्याच्याशी वाद घालण्याची घासाघीस करीत बसणं म्हणजे एक प्रकारचं मरणंच होय. असं उगीचच कुणी कशाला मरावं ? त्यापेक्षा आपल्या आत डोकावून पहावं, आपल्या आतच असलेल्या सुखाच्या भांडाराचा शोध घ्यावा, हेच शहाणपणाचं होय. गाढवाचं ओरडणं हे काही गोडव्यानं भरलेलं नसतं. आपण कानांनी ते ऐकलं, तर आपल्याला काही आनंद होत नाही, त्याचं कोडकौतुक वाटत नाही, आपण काही त्याचं ओरडणं ऐकून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही. हा सावधपणा आवश्यक आहे. कारण आपण ज्याच्याबरोबर बोलतो, संवाद करतो, त्याचे गुण आपल्या अंगाला चिकटतात.


(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Saturday, 21 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३३)

शब्दरूपी साधन कसं वापरावं, याविषयी तुकारामांनी आपल्याला नाना मार्गांनी सल्ला दिला आहे. ते म्हणतात,

३३
वचन ते नाही तोडीत शरीरा ! भेदत अंतरा वज्राऐसे !!१!!
काही न सहावे काशा ही कारणें ! संदेह निधान देह बळी !!२!!
नाही शब्द मुखीं लागत तिखट ! नाही जड होत पोट तेणें !!३!!
तुका म्हणे जरी गिळे अहंकार ! तरी वसे घर नारायण !!४!!
                   (अभंग क्र. २४४०)
एखादा मनुष्य जेव्हा दुसऱ्याला दुखावणारं काही तरी बोलतो, तेव्हा ते बोलणं काही ऐकणाऱ्याच्या शरीराला तोडत नाही. पण ते बोलणं वज्राप्रमाणं त्याच्या अंतःकरणाला भेदत जातं. अशा प्रकारे बोलणारा तापट माणूस कुठल्याही कारणानं काहीही सहन करीत नाही. एखाद्या बाबतीत त्याला काही संदेह, संशय असलाच, तर तो त्याचा देह बळी गेल्यानंतरच म्हणजे त्याच्या मृत्यूनंतरच दूर होतो. याचा अर्थ त्याला लागट बोलण्याची जी सवय लागलेली असते, ती तो हयात असेपर्यंत सुटत नाही. मरेपर्यंत तो त्याच पद्धतीनं बोलत राहतो. अशा प्रकारे बोलणारा मनुष्य जेव्हा काही शब्द उच्चारतो, तेव्हा ते शब्द काही त्याच्या तोंडात तिखट लागत नाहीत किंवा अशा शब्दामुळं काही त्याचं व ऐकणाराचं पोट जड होत नाही, त्यामुळं आपल्या बोलण्याचा काय परिणाम होतो , हे त्याला कळत नाही. परंतु या प्रकारातून घरात मात्र दुःखाचा कल्लोळ निर्माण होतो. खरं तर माणसानं जर अहंकार गिळला, तर घरामधे साक्षात ईश्वर वास्तव्य करू लागतो.


(संग्राहक :- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

 

Monday, 16 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३२)

भाषा हे माणसाला लाभलेलं संपर्काचं अतिशय महत्वाचं साधन आहे. तुकारामांनी भाषेचं आणि तिच्यामधील शब्दांचं महत्त्व उत्तम रीतीनं जाणलं होतं. ते स्वतः तर शब्दप्रभू होतेच. एकेका शब्दावर त्यांचं नितान्त प्रेम होतं. शब्दाचा गौरव करताना ते म्हणतात,
३२
आम्हा घरीं धन शब्दाची च रत्ने | शब्दाची च शस्त्रे यत्न करू ||१||
शब्द चि आमुच्या जीवात्मा जीवन | शब्दें वाटू धन जनलोकां ||२||
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव | शब्दें चि गौरव पूजा करू ||३||
                     (अभंग क्र. ३३९६)

सामान्यतः माणूस जीवनात सुखी आणि यशस्वी होण्यासाठी पैसाआडका, सोनंनाणं, रत्नं जमवण्याच्या मागं असतो. तुकारामांसारखी माणसं मात्र आपलं सुख अशा भौतिक वस्तूंमधे शोधत नाहीत. त्यांची स्वतःची काही मूल्यं असतात, दृष्टीकोण असतात. तुकारामांनी आपल्या जीवनातील फार मोठा आनंद शब्दाच्या माध्यमातून प्राप्त केला होता. त्यामुळं शब्दाचा अपार गौरव करताना ते म्हणतात :  आमच्या घरी शब्दाचीच रत्नं आहेत. समाजव्यवस्था बदलण्यासाठी तुकारामांना एक प्रकारचं युद्धच करावं लागलं. परंतु त्या युद्धासाठी त्यांनी शस्त्रं वापरली, ती शब्दाचीच. त्यांचा वापर योग्य रीतीनं करण्यासाठी त्यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. त्यांच्या दृष्टीने शब्दांचं स्थान इतकं असाधारण होतं, की शब्द आपल्या जीवाचं जीवन आहे, असं ते म्हणतात. आपल्या अस्तित्वाचं खरं सत्त्व शब्दांमधे आहे, आपल्या अभंगांमधे आहे, अशी त्यांची भावना होती. त्यांचं काव्य अक्षरशः त्यांच्या अस्तित्वाच्या गाभ्यामधून अंकुरलं होतं, हे त्यांच्या या वचनातून व्यक्त होतं. तुकाराम काही लोकांना प्रत्येक वेळी प्रत्यक्ष रीत्या भौतिक संपत्तीचं दान देत नव्हते. परंतु शब्दांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना दिलेलं वैभव पिढ्यानपिढ्या पुरणारं आहे. आपण लोकांना शब्दानं धन वाटत आहोत, हे त्यांचे उद्गार इतिहासाच्या कसोटीवर सत्य ठरले आहेत. आपल्या दृष्टीनं शब्द हाच देव आहे, या भाषेत त्यांनी शब्दांचं माहात्म्य सांगितलं आहे. या देवाचा गौरव करण्यासाठी, त्याची पूजा करण्यासाठी ते शब्दांचाच वापर करण्याची भाषा करीत आहेत. तुकाराम किती शब्दमय झाले होते, त्यांच्या व्यक्तित्वाचा अणुरेणूही कसा शब्दात्मक झाला होता आणि ते शब्दावर किती अपार प्रेम करीत होते, ते या अभंगातून मार्मिक रीतीने व्यक्त झालं आहे. शब्दाचं हे सगळं सामर्थ्य ओळखणारा मनुष्य आयुष्यात यशस्वी आणि आनंदी झाल्याखेरीज राहणार नाही.


(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Wednesday, 11 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश ३१)

संतांचं जीवन लोकांवर उपकार करण्यासाठी असतं, या गोष्टीचा तुकारामांच्या मनावर फार मोठा प्रभाव पडलेला होता. हा प्रभाव त्यांच्या अस्तित्वाच्या अगदी गाभ्यापर्यंत पोचला होता आणि त्यामुळं ते स्वतः परोपकारी संत बनून गेले होते. त्यांनी स्वतःच आपल्या या उन्नत अवस्थेचं अतिशय समाधानानं, तृप्त मनानं आकलन केलं होतं आणि त्या प्रसन्न मनःस्थितीमधे त्यांच्या तोंडून स्वतःविषयीच पुढील उद्गार बाहेर पडले होते,

३१
अणुरेणुया थोकडा ! तुका आकाशाएवढा !!१!!
गिळूनि सांडिले कळिवर ! भव भ्रमाचा आकार !!२!!
सांडिली त्रिपुटी ! दीप उजळला घटीं !!३!!
तुका म्हणे आता ! उरलो उपकारापुरता !!४!!
            (अभंग क्र. ९९३)

बाह्य सृष्टीची असोत, की मानवाच्या अंतःसृष्टीची असोत, दोन परस्परविरुद्ध टोकं असतात. एका बाजूला अतिशय सूक्ष्म असे अणु-रेणू असतात, तर दुसऱ्या बाजूला सर्वव्यापी आकाश असते. समतेच्या अनुभवामुळं माणसाची अंतःसृष्टी जेव्हा बाह्य सृष्टीशी एकरूप होऊन जाते, तेव्हा मनुष्य एका बाजूला स्वतः अणु-रेणूंशी एकरूप असण्याचा अनुभव घेतो, किंबहुना त्यांच्यापेक्षाही सूक्ष्म असल्याची प्रचीती त्याला घेता येते. दुसऱ्या बाजूला आपण आकाशाइतके विशाल असल्याचा अनुभवही त्याला येतो. तुकारामांनी नेमकी हीच अवस्था अनुभवली होती. ही एक असाधारण अवस्था आहे. या अवस्थेमधे सर्व विश्वाशी एकरूप झालेला मनुष्य जणू काही स्वतःचं शरीर गिळून त्याचं अस्तित्व संपवून टाकतो. आपला अवघा मीपणा, सगळा अहंकार टाकून देतो. संसारामधे मनात भ्रम निर्माण करणाऱ्या जितक्या गोष्टी असतात, त्या सगळ्या बाजूला करतो. तुकाराम आपल्या माधुर्यानं ओतप्रोत भरलेल्या या उत्कट अनुभवाला शब्दरूप देत आहेत. आपल्या शरीरात दीप उजळला आहे, असं ते म्हणतात. जो अनुभव शब्दांत पकडणं भल्याभल्यांना जमणार नाही, तो अनुभव तुकारामांनी अतिशय सहजतेनं आणि तितक्याच सौंदर्यानं केवळ तीन शब्दांत आपल्या काळजापर्यंत पोचवला आहे. या उजळलेल्या प्रकाशमय अवस्थेत त्रिपुटी सांडल्याचं ते म्हणत आहेत. त्रिपुटी म्हणजे तीन गोष्टींचा समुदाय. या तीन गोष्टी कोणत्या याचा अभ्यासकांनी, पंडितांनी, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांनी जरूर शोध घ्यावा. परंतु तुकारामांच्या हृदयाची उजळलेली अवस्था शब्दांच्या आधाराविना ज्यांच्या हृदयात आपोआपच प्रवेश करते, त्यांना त्रिपुटीचा शब्दार्थ शोधण्याची गरज नाही. ते सर्व प्रकारचा आपपरभाव, मी-तूपणा दूर करून सर्व प्राणीमात्रांशी, सर्व सृष्टीशी एकरूप झाले आहेत, हाच अर्थ आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यासाठी काही प्राप्त करावं, असं आता त्यांच्या जीवनात काही उरलेलंच नाही. त्यांचं अवघं अस्तित्व आता इतरांना कल्याणाचा मार्ग दाखविण्यासाठी आहे. तुकारामांनी आपल्या अंतःकरणातील निरपेक्ष करुणा व्यक्त करताना शब्दांना जे लावण्य दिलं आहे, त्याला त्यांच्याच सांगायचं झालं, तर 'अंतपार नाही' !


(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Friday, 6 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश ३०)

आपल्या अंतःकरणातील करुणेमुळं तुकाराम नेहमी दुःखी-कष्टी जीवांना मदत करण्याचा विचार करीत असत. लोकांनाही ते याच अर्थाचा उपदेश करीत असत. एका अभंगात ते म्हणतात,

३०
आर्तभूतां द्यावे दान ! खरे पुण्य त्या नावें !!१!!
होणार ते सुखें घडो ! लाभ जोडो महाबुद्धि !!२!!
सत्य संकल्पा च साटी ! उजळा पोटीं रविबिंब !!३!!
तुका म्हणे मनीं वाव ! शुद्ध भाव राखावा !!४!!
               (अभंग क्र. ३६५२)

दुःखानं कासावीस झालेल्या प्राण्यांना दान द्यावं, मदत करावी, या कृतीलाच खरं म्हणजे पुण्य हे नाव आहे. आपण मदत केल्यानंतर जे काही घडायचं असेल, ते खुशाल घडो. आपण त्याचा विचार करण्याचं कारण नाही. आपल्या परीनं आपल्याला शक्य आहे ते करावं, म्हणजे झालं. आपल्या महान बुद्धीनं, आपल्या श्रेष्ठ विवेकानं हाच लाभ करून घ्यावा, हे उत्तम. दुःखी-कष्टी लोकांना मदत करणं, हेच जीवनातील खरं सत्य आणि आपण त्या सत्याचाच संकल्प करावा. सूर्यबिंब उगवल्यानंतर जसं सगळं जग उजळून निघतं, तसं या संकल्पानं आपलं अंतःकरण उजळून निघावं. शुद्ध भावना जपून ठेवता यावी, यासाठी आपल्या मनामधे जागा करून घ्यावी, आपल्या अंतर्यामी शुद्ध भावनेला वाव द्यावा.


(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील) 
९४२२३४५३६८ 

Thursday, 5 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २९)

दु:खानं व्याकूळ झालेल्या माणसाला मोठी मदत केली नाही आणि नुसता शब्दानं दिलासा दिला, तरी त्याच्या दृष्टीनं तो मोठा आधार असतो. तुकाराम म्हणतात,

२९
हा गे आलो कोणी म्हणे बुडतिया ! तेणें किती तया बळ चढे !!१!!
तुम्ही तंव भार घेतला सकळ ! आश्वासिलो बाळ अभयकरें !!२!!
भुकेलिया आस दाविता निर्धार ! किती होय धीर समाधान !!३!!
तुका म्हणे दिली चिंतामणीसाटी ! उचित कांचवटी दंडवत !!४!!
               (अभंग क्र. २५५५)

पाण्यात बुडत असलेल्या माणसाला 'हा पहा, मी आलो' एवढं नुसतं तोंडानं म्हटलं, तरी त्यामुळं त्याचं बळ किती वाढतं ! संत लोकांना नेमकं हे बळच देत असतात. आपण स्वतः हा अनुभव घेतल्याचं तुकाराम सांगत आहेत. एखाद्या लहान मुलाला आपला हात उंचावून 'घाबरू नकोस' असं आश्वासन द्यावं, तसं संतांनी आपल्या बाबतीत केलं आहे आणि आपला सगळा भार स्वतःच्या अंगावर घेतला आहे, असं तुकाराम कृतज्ञतापूर्वक सांगत आहेत. एखाद्या भुकेलेल्या माणसाला नक्की भोजन देण्याची आशा दाखविली, तरी तेवढ्यानं त्याला किती धीर येतो, समाधान वाटतं. दु:खी-कष्टी माणसाला आपल्या वागण्या-बोलण्यातून दिलासा देण्याचा आनंद काही औरच असतो, हे तुकारामांनी या अभंगातून आपल्याला तळमळीनं सांगितलं आहे. जो मनुष्य असा दिलासा देतो, त्याचे उपकार मोठे असतात. संत असे उपकारकच करत असतात. आपण त्यांना दंडवत घातला, तरी त्यांच्या उपकाराची फेड होऊ शकत नाही. हे तर, एखाद्यानं आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करणारं चिंतामणीसारखं रत्न द्यावं आणि आपण त्याची परतफेड म्हणून त्याला काच देण्याचा प्रयत्न करावा, तसं आहे.


(संग्राहकसंजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २८)

लोकांच्या हितासाठीच आपण त्यांना उपदेश करतो, हे स्पष्ट करताना त्यांनी एका अभंगात म्हटलं आहे,

२८
भूतीं भगवंत ! हा तो जाणतो संकेत !!१!!
भारी मोकलितो बाण ! ज्याचा त्यासी कळे गुण !!२!!
करावा उपदेश ! निवडोनि तरि दोष !!३!!
तुका म्हणे वाटे ! चुकता आडराने काटे !!४!!
           (अभंग क्र. ८३३)

सर्व प्राण्यांमधे भगवंत असतो, हा संकेत तर मी जाणतो, असं ते म्हणतात. इतरांनीही हे जाणावं, ही त्यांची उत्कट इच्छा होती. म्हणूनच ते त्या अर्थाचा उपदेश करीत असत. हा उपदेश करणारे शब्दांचे जबरदस्त बाण मी सोडतो आणि ज्याला ते कळायला हवं त्याला ते कळतं, असं ते म्हणतात. ज्या गोष्टीचा उपदेश करायचा, त्या गोष्टीत काही दोष असू नयेत याची काळजी घेऊन उपदेश करावा, असं तत्त्व त्यांनी सांगितलं आहे. जीवनाचा प्रवास करताना माणूस वाट चुकून आडरानाला गेला, तर त्याला काट्यांचा सामना करावा लागणार, हे उघड आहे. म्हणूनच माणसानं वाटचाल करताना आवश्यक ती काळजी घ्यावी.


(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २७)

अनेकदा संतांकडून खूप चांगलं मार्गदर्शन मिळालेलं असतं, पण काही लोकांना त्याचं मोलच कळलेलं नसतं आणि त्यामुळं ते त्याची उपेक्षा करतात, त्याच्याकडं दुर्लक्ष करतात. तसं बघितलं तर प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वात खूप काही गुणवत्ता असते, परंतु माणसाला त्याचं भानच नसतं. संत ते भान देण्याचा प्रयत्न करतात. आपण शहाणपणानं तिकडं लक्ष दिलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे, साकारलं पाहिजे. हे सगळं स्पष्ट करताना तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात :

२७
मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास | असे ज्याचा त्यास नसे ठावा ||१||
भाग्यवंत घेती वेचूनिया मोलें | भारवाही मेले वाहता ओझे ||२||
चंद्रामृतें तृप्तिपारणे चकोरा | भ्रमरासी चारा सुगंधाचा ||३||
अधिकारी येथे घेती हातवटी | परीक्षवंता दृष्टी रत्न जैसे ||४||
तुका म्हणे काय अंधळिया हाती | दिले जैसे मोती वाया जाय ||५||

                  (अभंग क्र. ४३०८)

कस्तुरीमृगाच्या शरीरातच कस्तुरी असते आणि तिचा सुगंध दरवळत असतो. परंतु त्या मृगाला तिचा ठावठिकाणा माहीत नसतो, ती आपल्याच ठायी आहे हे त्याला माहीत नसतं. जे लोक सफल होणारे असतात, आपल्या हिताविषयी जागरूक असतात, ते अशा गोष्टी अगदी किंमत मोजून वेचून घेतात. याउलट, ज्यांना आपल्याकडं असलेल्या अशा गोष्टींचं भान नसतं, ते भारवाही नुसतंच ओझं वाहून मरतात. चंद्राच्या किरणातून ते अमृत स्रवतं, त्यामुळं चकोराची तृप्ती होते, ते त्याचं पारणं असतं. तो त्या अमृताचा लाभ घेतो, असा त्याचा अर्थ होतो. फुलांमधे सुगंध असतो आणि भुंग्याला ते कळत असल्यामुळं तो त्या सुगंधाचा चारा चाखतो. जे तज्ञ असतात, त्या त्या गोष्टीचे जाणकार अधिकारी असतात, ते आपल्याकडं असलेल्या हातोटीमुळं, कौशल्यामुळं आपल्याला हवी ती गोष्ट बरोबर मिळवतात. जो खराखुरा पारखी असतो, त्याच्या दृष्टीला रत्न पडलं, की तो त्याचं योग्य मोल देऊन ते नक्कीच मिळवतो. मोती हे एक असंच मौल्यवान रत्न आहे. परंतु ते आंधळ्याच्या म्हणजेच पारख नसलेल्या माणसाच्या हाती पडलं, तर ते वायाच जातं. कारण, त्याला त्याचं मोल कळत नसतं. सज्जनांचा उपदेश देखील कस्तुरीसारखा, चंद्रकिरणांतील अमृतासारखा, रत्नासारखा असतो. ज्याला त्याचं मोल कळतं, तो त्याचा लाभ घेऊन आपल्या आयुष्याचं कल्याण करतो आणि ज्याला त्याचं मोल कळत नाही, तो स्वतःच्याच हिताला मुकतो.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Tuesday, 3 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २६)

संत स्वतःच्या परोपकारी वृत्तीमुळं दु:खी लोकांचं दु:ख दूर करण्याचा स्वतःहून प्रयत्न करतात, हे त्यांचं मोठेपण होय. परंतु, जो दु:खी असतो, त्यानं संतांची वाट पहात बसण्याऐवजी स्वतः त्यांच्याकडं जावं, आपलं दु:ख त्यांच्यापुढं मांडावं आणि ते दूर करण्याचा उपाय जाणून घ्यावा, असं तुकारामांना वाटतं. जणू काही आपल्याला काही गरजच नाही आणि उपदेश करण्याविना संतांचच काही तरी अडलेलं आहे, अशा समजुतीत राहू नये, हे अतिशय प्रभावी शब्दात नोंदवताना तुकारामांनी एका अभंगात काही मार्मिक उदाहरणं दिली आहेत. ते म्हणतात,

२६
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ ? ! देखोनिया गूळ धाव घाली !!१!!
याचकाविण काय खोळंबला दाता ? ! तोचि धावे हिता आपुलिया !!२!!
उदक अन्न काये म्हणे मज खा ये ? ! भुकेला तो जाये चोजवीत !!३!!
व्याधी पिडिला धावे वैद्याचिया घरा ! दु:खाच्या परिहारा आपुलिया !!४!!
तुका म्हणे जया आपुले स्वहित ! करणे तो चि प्रीत धरी कथे !!५!!

                                    (अभंग क्र. २३८०)

 गूळ हे मुंगीचं खाद्य असतं. पण गुळाच्या वतीनं कुणी मुंगीला ' ये आणि गूळ खा ' असं निमंत्रण पाठवलेलं नसतं. गुळाला गरज नसते, तर मुंगीलाच गरज असते. मुंगीलाही आपली गरज कळते आणि ती गूळ पाहून तो खाण्यासाठी त्याच्याकडे धाव घेते. याचक आणि दाता यांच्या बाबतीतही हीच स्थिती असते. दाता काही याचकाविना खोळंबून बसलेला नसतो. याचकाला आपलं हित कळतं आणि तो आपल्या हितासाठी दात्याकडं धाव घेतो. पाणी काही ' या आणि मला प्या ' असं म्हणत नाही. अन्न काही ' या आणि मला खा ' असं म्हणत नाही. ज्याला तहान लागलेली असते, तोच शोध घेत पाण्याकडं जातो. ज्याला भूक लागलेली असते, तोच शोध घेत अन्नाकडं जातो. ज्याला रोगाची पीडा झालेली असते, तो आपलं दु:ख दूर करण्यासाठी वैद्याच्या घराकडे धाव घेतो. तुकाराम महाराजांनी ही सर्व उदाहरणं संतांच्या उपदेशाविषयी सांगितली आहेत. संत कथेमधून, प्रवचनामधून लोकांना त्यांच्या हिताचा उपदेश करीत असतात. ज्याला आपलं हित करून घ्यायचं असतं, त्यानं स्वतःहून त्या उपदेशाची गोडी मनात बाळगून तिचा लाभ घ्यायला हवा, असा त्यांचा सल्ला आहे.


(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८