आपलं मनुष्यत्व उन्नत करण्यासाठी आघात पचवणं महत्त्वाचं असतं, हे तुकारामांनी आणखी एका अभंगात अनेक उदाहरणं देऊन स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात,
६५
तापल्यावाचून नव्हे अळंकार । पिटूनिया सार उरले ते ।। १ ।।
मग कदाकाळी नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र ते चि ।। २ ।।
कळिवर बरे भोगू द्यावे भोगा । फांसिले ते रोगा हाती सुटे ।। ३ ।।
तुका म्हणे मन करावे पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरि ।। ४ ।।
(अभंग. क्र. २४००)
जगभरच्या लोकांना सोन्याच्या दागिन्यांचं आकर्षण असतं, हे प्रसिद्धच आहे. सोनं हा धातू खरोखरच देखणा असून, तो माणसाचं मूळचं सौंदर्य खुलवतो. पण सोन्यापासून दागिना बनविण्याची प्रक्रिया सोन्याच्या दृष्टीनं मात्र तशी सुखाची नसते. त्याला तापवल्याशिवाय, उष्णतेनं भाजून काढल्याशिवाय त्याचा अलंकार घडत नाही. त्याला नुसतं तापवलंच जात नाही, तर सोनार आपल्या हत्यारानं त्याला वेगवेगळ्या अंगानं ठोकतही राहतो. या प्रक्रियेमुळे सोन्यामधे काही हिणकस भाग मिसळलेला असला, तर तो बाजूला होतो आणि अस्सल, सारभूत सोनं उरतं. त्याचा दागिना बनतो. माणसाचंही असंच आहे, असं तुकारामांना सुचवायचं आहे. आघात सोसले नाहीत, सोसण्याची ही प्रक्रिया नष्ट केली, आघात झाल्याबरोबर तीव्र द्वेषाची भावना निर्माण झाली, तर जे मित्र असतात तेच शत्रू होतात. शरीराच्या वाट्याला जे भोग आलेले असतात, ते त्याला भोगू द्यावेत, त्यांना धैर्यानं सामोरं जावं. शरीरात काही गंभीर रोग झाला असला, तर फासण्या टाकल्यानंतरच म्हणजेच एक प्रकारची शस्त्रक्रिया केल्यानंतरच शरीराची त्या रोगातून सुटका होते. त्या फासण्या सोसायलाच हव्यात. जीवनाच्या प्रवासात माणसानं हे सगळं शिकून घेतलं पाहिजे. संकटं, दुःखं, प्रतिकूल परिस्थिती, शत्रुत्व अशा अनेक गोष्टी आपल्या वाट्याला येतात. पण या बाबतीत आपण खंबीर होऊन त्या सगळ्या गोष्टी झेलाव्यात. पाठेळ म्हणजे ओझं वाहणारं जनावर जसं खूप काही सोसतं, तसं आपल्या मनाला पाठेळ बनवावं. जोपर्यंत पदार्थ शिजत नाही, तोपर्यंत त्यानं जाळ सोसलाच पाहिजे. तसंच जीवनात जोपर्यंत परिपक्वता लाभत नाही, तोपर्यंत आघात सोसायलाच हवेत आणि एकदा परिपक्वता लाभली, की त्यानंतर आघात पचवण्याचं सामर्थ्य प्राप्त झालेलंच असतं.
डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment