आणखी एका अभंगात त्यांनी प्रयत्नाचा गौरव करताना म्हटलं आहे,
६१
दधिमाझी लोणी जाणती सकळ । ते काढी निराळे जाणे मथन ॥ १ ॥
अग्नि काष्ठामाजी ऐसे जाणे जन मथिलियाविण कैसा जाळी ?॥ २ ॥
तुका म्हणे मुख मळीण दर्पणीं । उजळिल्यावाचूनि कैसे भासे ? ।। ३ ।।
(अभंग. क्र. २८०७)
दह्यामधे लोणी असतं, हे सर्वजण जाणतात. परंतु, ज्याला दही घुसळण्याचं ज्ञान असतं, तोच दह्यातून लोणी वेगळं काढून घेतो. लाकडामधे अग्नी असतो, हे लोकांना ठाऊक असतं. पण, दोन लाकडं एकमेकांवर घासली नाहीत, तर तो अग्नी निर्माण कसा होणार आणि ज्वलनाचं कार्य कसं करणार ? आरसा जर मळलेला असला, तर तो पुसला पाहिजे, स्वच्छ केला पाहिजे, तसं न करता त्याच्यामधे आपला चेहरा जसाच्या तसा कसा दिसू शकेल ? ही सगळी उदाहरणं तुकाराम आपल्याला प्रयत्नांची प्रेरणा देण्यासाठी देत आहेत. फळं मिळू शकतात, ती कित्येकदा आपल्या आसपासच असतात, आपल्या आवाक्यात असतात, परंतु ती मिळवण्यासाठी आवश्यक ती धडपड मात्र जरूर केली पाहिजे, हे त्यांना सांगायचं आहे.
डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment