Tuesday, 30 August 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ५९ )

                     प्रयत्न

         जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं, यावर तुकारामांनी अतिशय भर दिला होता. एका विख्यात अभंगात ते म्हणतात,

५९ 
साधूनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकाते डोळां न पाहवे ।। १ ।। 
साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिके कापती देखोनिया ।। २ ।। 
असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।। ३ ।। 
(अभंग. क्र. २९८)

         सरावामुळं अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील माणसाच्या आवाक्यात येतात. जालीम विष प्याल्यास माणसाला प्राण गमवावे लागतात. पण विषाचा थोडाथोडा अंश पिण्याचा सराव करत जाणारे लोक क्रमाक्रमानं तो अंश वाढवत नेऊन तोळा तोळा विष देखील पचवू लागतात.
          सराव न केलेल्या इतरांना त्यांचं विष पिण्याचं दृश्य डोळ्यांनी बघवतही नाही. विषारी सापाचा दंश माणसाच्या मृत्यूला कारणीभूत होतो, परंतु काही लोक सरावानं सापांना आपल्या हातात पकडतात. त्यांच्यासारखा सराव न केलेले इतर लोक ते दृश्य पाहूनच थरथर कापू लागतात. माणसाच्या जीवनात इतर क्षेत्रांत नेमकं असंच घडत असतं. एखादी गोष्ट असाध्य आहे, ती प्राप्त करणं कदापि शक्य होणार नाही, असं तिच्याविषयी वाटत असतं. परंतु एखादा प्रयत्नवादी मनुष्य खटपट करतो, धडपडतो, यातायात करतो आणि प्रारंभी असाध्य वाटणारी ती गोष्टही त्याच्या दृष्टीनं साध्य होते. हे घडू शकतं, ते अभ्यासामुळं, सरावामुळं, कठोर परिश्रमामुळं, प्रयत्नामुळं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment