प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा कोणत्या ना कोणत्या प्रकारची संकटं येतातच. जो मनुष्य आतून कणखर असतो, मनानं खंबीर असतो, संकटाचे आघात पचवण्याची ज्याची ताकद असते, तो मनुष्य जगाच्या मानसन्मानाला पात्र होतो. परंतु ज्याचं व्यक्तिमत्त्व कसदार नसतं, कचखाऊ असत, तो आघात पचवू शकत नाही. तुकारामांनी एका अभंगात या सत्याचं दर्शन अचूकपणे घडवलं आहे. ते म्हणतात,
६४
हिरा ठेविता ऐरणीं । वांचे मारिता जो घणी ॥१॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥२॥
मोहरा होय तोचि अंगे । सूत न जळे ज्याचे संगें ॥३॥
तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥४॥
(अभंग. क्र.५०)
नैसर्गिक स्थितीत सापडलेला हिरा पैलू पाडल्याशिवाय खऱ्या अर्थानं सुंदर आणि आकर्षक होत नाही. परंतु पैलू पाडायचे, तर त्याला ऐरणीवर ठेवून, घणाचे आघात करून त्याचं मूळचं रूप खुलवावं लागतं. जो अस्सल हिरा असतो, तो हे घणाचे आघात झाले तरी फुटत नाही. त्याचा नको असलेला भाग तेवढा अलग होतो आणि बाकीचा भाग शाबूत राहतो. जो हिरा असा असेल, त्यालाच बाजारात किंमत मिळते. याउलट, हिऱ्यासारखा दिसणारा पण हिऱ्याचा अस्सलपणा नसलेला पदार्थ घणाचा तडाखा सोसू शकत नाही, त्याचा चुरा होतो. मोहरा नावाचं एक रत्न असल्याचं मानलं जातं. जे अस्सल रत्न असतं, त्याच्या जवळ ठेवलेलं सूत आगीनं जळत नाही, असं म्हणतात. या वचनाच्या वाच्याथपिक्षा त्याचा व्यंग्यार्थ महत्त्वाचा आहे. हिऱ्याचं उदाहरण असो वा मोहरा या रत्नाचं असो, ते माणसाच्या व्यक्तिमत्त्वालाही लागू पडतं. स्वार्थी, विकारग्रस्त, दुर्जन मनुष्य असहिष्णू असतो; परंतु, जे खरे संत असतात, महामानव असतात, ते जगाचे आघात सोसूनही अविचल राहतात.
डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment