Tuesday, 30 August 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ६३ )

                     प्रयत्न  (६३)

         प्रयत्नाच्या बाबतीत आणखी एका अभंगात ते म्हणतात, 

६३ 
निवडावे खड़े । तरी दळण बोजे घडे ॥१॥
नाही तर नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥२॥
निवडावे तन । सेतीं करावे राखण ॥३॥
तुका म्हणे नीत । न विचारिता नव्हे हित ॥४॥

 (अ.क्र. २१३७)

          शेतातून आणलेलं धान्य दळण्यासाठी जसंच्या तसं जात्याकडं नेलं जात नाही. मळणी करताना धान्यामधे मातीचे खडे मिसळलेले असतात. स्वाभाविकच, असं धान्य दळण्यापूर्वी निवडावं लागतं. त्यातील खडे वेचून बाजूला काढावे लागतात. तरच ते दळण चांगलं होतं. नाही तर धान्याबरोबर खड्यांचंही पीठ होतं आणि मग त्या मातीची खस भाकरी, चपाती, पोळी वगैरेंना लागते. त्यांची चव बिघडते. स्वयंपाक नासून गेल्यासारखं होतं. खडे निवडण्याच्या बाबतीत आळस केला, तर हाय हाय करण्याची वेळ येते. धान्य निर्माण होण्याच्या आधी शेतामधे पीक असतानाही आळस झटकून अशीच काळजी घ्यावी लागते. तण वेचून काढावं लागतं. कधी खुरप्यानं भांगलण करून, कधी कोळप्याने कोळपण करून, तर कधी हातानं उपटून तण नाहीसं करावं लागतं. पिकाचं रक्षण करावं लागतं. व्यापक जीवनातही हीच रीत असते. जे चांगलं आहे, ते पुरेपूर वाढावं पक्व व्हावं, असं वाटत असेल, तर त्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारं, त्याला आडवं येणारं जे वाईट असेल, ते उपटून फेकावं लागतं. त्याचं निर्मूलन करावं लागतं. सज्जनांचं रक्षण करायचं असेल, तर दुष्टांचं निर्दालन करावं लागतं. हीच वागण्याची योग्य नीती होय. ही नीती समजून न घेता, तिचा विचार न करता कोणी वागू लागला, तर ते त्याच्या दृष्टीनं हितकारक नव्हे. व्यक्तीच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या निकोप वाढीसाठी समाजातील अनिष्ट प्रवृत्ती उखडून टाकल्या, तरच तो समाज खऱ्या अर्थानं उमलू फुलू शकतो, हे तणाच्या दाखल्यावरून चांगलं स्पष्ट होतं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment