Tuesday, 30 August 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ६२ )

                      प्रयत्न (६२)

           प्रयत्नाच्या बाबतीत काही महत्त्वाचे पैलू तुकारामांनी एका अभंगात नोंदविले आहेत. ते म्हणतात,

६२ 
उभा ऐल थडी तेणें घालू नये उड्डी ॥ १ ॥ 
पुढे गेल्याचे उपाय करावे ते केले काय ॥ २ ॥
दिसते आहारी। नये जाऊ ऐशावरी ॥ ३ ॥
अळसाची धाडी तुका म्हणे बहु नाडी ॥ ४ ॥ (अ.क्र. ३२२२) 

         नदी तरून पलीकडं जायचं असेल, तर माणसाकडं हिंमत असावी लागते. जीवनातील विविध प्रसंगांनाही हे लागू पडतं. पलीकडं तर जायचं आहे, पण धाडस नाही म्हणून जो मनुष्य अलीकडच्या काठावरच उभा असतो, त्यानं पाण्यात उडी मारू नये. कारण, त्यासाठी त्याचं मन तयार नसतं. पाण्यात उडी मारायचीच नाही, असा याचा अर्थ नाही. योग्य ती तयारी करून उडी जरूर मारायची. आपल्या अगोदर पाण्यात उडी मारून जे यशस्वी रीतीनं पैलतीराला पोचले आहेत, त्यांनी काय काय प्रयत्न केले, ते समजून घ्यावं आणि त्याच्या आधारे आपणही तसे प्रयत्न करून पैलतीराला पोचावं. अशी तयारी करायची नाही आणि पैलतीर आपल्या आवाक्यात आहे अशी समजूत करून घेऊन पाण्यात उडी मारायची, हा योग्य मार्ग नव्हे. परंतु त्याबरोबरच निष्क्रिय न होण्याचा सावधपणाही बाळगायचा. आळसात पडून रहायचं नाही. आळसानं आपल्यावर धाड घातली, तर तो आपली मोठी हानी करतो. तात्पर्य, जीवनाचा प्रवास करताना सर्व प्रकारे काळजी घेऊन आणि जागरूक राहून वाटचाल करावी.

डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment