पिकांना कृत्रिम रीतीनं दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या संदर्भात तुकारामांचे काही अभंग मनाला अगदी भुरळ घालणारे आहेत. ते एका अभंगात म्हणतात,
५५
बळ बुद्धी बेचुनिया शक्ती । उदक चालवावे युक्ती ।।१।।
नाही चळण तथा अंगीं । धावे लवणामागे वेगीं ।।२।।
पाट मोट कळा । भरित पखाला सागळा ।।३।।
बीज ज्यासी घ्यावे । तुका म्हणे तैसे व्हावे ।। ४ ।।
(अ.क्र. १८७८)
मोट वगैरे साधनांनी विहिरीतून उपसलेलं पाणी पाटानं नेऊन पिकाला नीट पाजणं, हा शेतीमधील एक खास अनुभव आहे. पाणी पिकापर्यंत व्यवस्थित नेणं हे मोठ्या कौशल्याचं काम असतं. बळ बुद्धी, शक्ती युक्ती वापरून वापरून पाणी पिकापर्यंत नीट न्यावं लागतं. पाण्याला स्वतःची अशी गती नसते. त्याच्या अंगी स्वतःचं असं काही 'चळण' नसतं, चलनवलन नसतं. लवणामागं म्हणजे उताराच्या दिशेनं वेगानं धावणं हा त्याचा स्वभाव असतो. हा स्वभाव ओळखून शेतकऱ्यानं पाट उताराच्या दिशेनं न्यायचा असतो. आधी पाट तयार करायचा आणि मग मोट, पखाल, सागळा इ. साधनांनी पाणी उपसून ते त्या पाटात सोडायचं असतं. या पाटाच्या बाबतीत खूप दक्षता घ्यावी लागते. वाटेत कुठं चढ असेल, तर तो काढून टाकून वाट मोकळी करावी लागते. खडक असेल, तर तो फोडावा लागतो. आवश्यक तिथं वळण घ्यावं लागतं. ज्या रानाला पाणी द्यायचं, ते शक्यतो समपातळीत राहील, अशा पद्धतीनं त्याची बांध-बंदिस्ती करावी लागते. नांगराचं तास घालतानाही फाळानं निघाणारी माती चढाच्या बाजूला न जाता उताराच्या बाजूला पडेल, याची काळजी घ्यावी लागते. वाफे तयार करताना त्या वाफ्यातील सर्व पिकाला समान रीतीनं पाणी मिळेल, हे पहावं लागतं. 'वाकुरी' तयार करताना, त्यांचे 'भुंडे' तयार करताना पाणी समपातळीत राहण्याच्या दृष्टीनं काळजी घ्यावी लागते. एका वाफ्यातून दुसऱ्या वाफ्याला, एका वाकुऱ्यातून दुसऱ्या वाकुऱ्याला, एका खांडातून (वाकुऱ्यांच्या समूहातून दुसऱ्या खांडाला पाणी नेण्याची योग्य व्यवस्था करावी लागते. झाडांसाठी रोपांसाठी आळी करावी लागतात. पावसाचं पाणी देखील शेतात समपातळीत रहावं, हे पहावं लागतं. नाही तर एका ठिकाणी पाणी साठून तेथील पीक अती पाण्यानं कुजण्याचा पिवळं पडण्याचा धोका संभवतो, तर दुसरीकडं सगळं पाणी पृष्ठभागावरून वाहून गेल्यामुळं जमीन लगेच कोरडी पडून तेथील पाणी सुकण्याचं संकट निर्माण होतं. वरवर साधी-सोपी वाटणारी ही गोष्ट बारकाईनं तपासून पाहिली, की शेतकऱ्याला किती अवधान ठेवावं लागतं, हे समजतं. हे अवधान न ठेवणारा शेतकरी पाटाचं पाणी पिकाला देऊ लागला, तर जमीन विषम पातळीत असल्यामुळं पाणी नको तिथं फुटतं, शेतकऱ्यानं आयत्या वेळी माती ओढण्याचा प्रयत्न केला, तर त्याला पाणी आवरत नाही आणि मग ते सगळ्या रानाची दैना दैना उडवून लावतं. पिकाला कुठं पाणी मिळालं, तर कुठं नाही, अशी अवस्था होते. म्हणून तर तुकारामांनी बळ - शक्ती, बुद्धी - युक्ती असे जवळपास एकाच अर्थाचे शब्द दोनदा वापरून, तसंच शक्ती आणि बुद्धी या दोहोंची आवश्यकता नोंदवून शेतकऱ्याची जबाबदारी स्पष्ट केली आहे. एकदा पिकापर्यंत पाणी नीट पोचलं, की मग शेतात जे बी पेरलेलं असेल, त्याला अनुसरून पीक येतं. शेतकऱ्याचे प्रयत्न सफल होतात.
डॉ. आ. ह. साळुंखे सर
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment