Monday, 29 August 2022

संत तुकारामांचे अभंगशतक (शेती ५४)

शेती
अभंग क्र. ५४ 

फळ पिके देठीं । निमित्य वारियाची भेटी ॥१॥
 हा तो अनुभव रोकडा कळो येतो खरा कुडा ॥२॥ 
तोडिलिया बळें वाया जाती काची फळे ॥३॥
 तुका म्हणे मन तेथे आपुले कारण ॥ ४॥
 (अ.क्र. १८४८)

          शेतकऱ्यानं खूप जपणूक केल्यानंतर झाडं फळांनी बहरतात. झाडा-झाडावरची रसाळ, टपोरी फळं पाहून शेतकऱ्याचं मन हरखून जातं; पण हाच क्षण शेतकऱ्याला एक फार महत्त्वाचा इशारा देत असतो. तो शेतकऱ्याच्या अनुभवाचा कस जोखणारा असतो. ती फळं नेमकी केव्हा काढायची, कधी उतरवायची, याचा निर्णय घेणं फक्त जाणकार शेतकऱ्यालाच जमू शकतं. अडाणी, अननुभवी शेतकरी इतकं सगळं वैभव वाया घालवील, हा धोका संभवतो. अशा शेतकऱ्यांना आणि त्याद्वारे जीवनाचा प्रवास करणाऱ्या सर्वच पथिकांना तुकारामांनी या अभंगाद्वारे अनुभवाचे बोल ऐकवले आहेत.
      झाडावर जी असंख्य फळं लगडलेली असतात, त्यांपैकी एखादं फळ जरी पाडाला येऊन देठावरच पिकलं, तरी शेतकऱ्याला झाडावर चढून ते काढावं लागत नाही. वाऱ्याची एखादी हळुवार झुळूक येण्याचं निमित्त झालं, तरी ते फळ देठापासून हळूच अलग होतं, झाडापासून निसटतं आणि झटकन भूमीचा आश्रय घेतं. अशा रीतीनं पक्वता ही जणू काही स्वयंसिद्ध असते. तिची चाचपणी करावी लागत नाही, तपासणी करावी लागत नाही. हा तर शेतकऱ्याचा रोकडा, रोख असा अनुभव आहे. त्याच्याद्वारे खरं काय आणि खोटं काय हे सहज कळून येतं; पक्कं काय आणि कच्चं काय, त्याचा आपोआप उलगडा होतो. पाडाचं एक फळ झाडावरील सर्व फळांच्या वतीनं बोलतं. त्यांच्या पिकलेपणाची ग्वाही देतं, घोषणा करतं. जे फळ पक्व झालेलं असतं, त्याला ताकद लावून ओढावं लागत नाही, बळ लावून खेचावं लागत नाही, नखाच्या तीक्ष्णतेनं खुडावं लागत नाही. वाऱ्याचा नाजुक स्पर्श त्याला त्याच्या इष्ट स्थळी पोचविण्यासाठी पुरेसा होतो.
          फळ असं पाडाला आलेलं नसताना एखाद्यानं जबरदस्तीनं झाडावरची फळं काढली, तर ती कच्ची फळं वाया जातात. ती पिकत नाहीत. त्यांचा रंग बदलत नाही, की स्वाद बदलत नाही. बदललाच, तर तो अनिष्ट दिशेनं बदलतो आणि मग ती फळं खाण्याला योग्य होत नाहीत. अननुभवी शेतकरी कच्ची फळं काढतात किंवा काही वेळा चोराचिलटांच्या उपद्रवामुळंही शेतकऱ्यांना फळं काढण्याची घाई करावी लागते. परंतु या प्रकारात त्यांचं प्रचंड नुकसान होतं.
          जे फळांच्या बाबतीत तेच मानवी व्यक्तित्वांच्याही बाबतीत घडत असतं. परिपक्व व्यक्तिमत्त्वाची माणसं त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या नीट पेलतात, व्यवस्थित पार पाडतात. याउलट ज्यांना विषयाचं ज्ञान पूर्णपणे प्राप्त झालेलं नाही, विशिष्ट क्षेत्राच्या खाचाखोचा कळलेल्या नाहीत, ज्यांनी चढ-उतार अनुभवलेले नाहीत, अशी माणसं निकराच्या प्रसंगामधे टिकत नाहीत. त्यांचं कच्चेपण उघडं पडतं. ती हरण्याची, पराभूत होण्याची, वाया जाण्याची शक्यता असते. म्हणून कोणतीही गोष्ट पिकेपर्यंत, तिची योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा केली पाहिजे. संयम ठेवून शांतपणे ती पक्व होण्याची वाट पाहिली पाहिजे. हे सगळं आपल्या मनातच घडत असतं. त्यामुळं या बाबतीत आपण जे काही निर्णय घेतो, त्यामागं आपलं मन हेच अवघं कारण असतं. म्हणून त्या मनालाच शिस्तबद्ध बनवलं पाहिजे. त्याच्यामधे अनुभवाच्या आधारे शहाणपण निर्माण केलं पाहिजे.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment