Monday, 29 August 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( शेती ५६ )

अभंग क्र. ५६ 

बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ।।१।।
वाया गेले ऐसे दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥२॥
पाल्याची जतन | तरि प्रांतीं येती कण ॥ ३ ॥
तुका म्हणे आळा । उदक देता लाभे फळा ॥ ४॥ 
(अ.क्र. २०८६ ) 

एका दृष्टीनं हा अभंग हे देखील शेतकऱ्याच्या जीवनावरचं एक सुरेख सूत्रच आहे. शेतकरी प्रारंभी शेतात बी पेरतात, नंतर अनेक प्रकारे कष्ट करतात, काळजी घेतात आणि अखेरीस गाडीतून धान्याची पोती घरी आणतात. खरं तर जेव्हा बी पेरलं जातं, तेव्हा ते मातीत गाडलं जातं. ते अदृश्य होतं. नाहीसं झाल्यासारखं वाटतं. त्याचं अस्तित्व हरवल्यासारखं होतं. जणू काही पेरलेलं बी वाया गेलं असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र ते बी जरी मातीत गाडलं गेल्यासारखं वाटलं, त्याचं तोंड मातीनं झाकून टाकलेलं असलं, त्याला मातीच्या आड दडपून टाकण्यात आलेलं असलं, तरी ते तिथं एक क्षणभरही गप्प बसत नाही. त्याच्या अंतर्यामीचं चैतन्य त्याला दडपून टाकणाऱ्या मातीला आतून धडका देऊ लागतं. ते तिला आपल्या अस्तित्वाची, आपल्या उगवण्याच्या क्षमतेची जाणीव करून देऊ लागतं. अखेरीस ते तिला भेगा पाडून प्रकाशात डोकावतं, मोकळ्या आकाशात झेपावतं आणि धान्यामधे रूपांतरित होतं. प्रथमदर्शनी जे वाया गेल्यासारखं वाटत होतं, त्याच्या आत सुप्त स्वरूपात इतका प्रचंड लाभ लपलेला होता, हे नंतर ध्यानात येतं.
         अर्थात, बीजाच्या उदरात लपलेला हा लाभ आपोआप शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही, हे मात्र पक्कं ध्यानात ठेवलं पाहिजे. जमिनीला धडका देऊन एक नाजुकसा अंकुर बाहेर पडतो. त्याला कोवळी, लुसलुशीत पानं फुटतात. पुढं त्याचं मोठं रोप वा झाड बनतं. त्याच्या अंगावर कोवळ्या, देखण्या पानांची लेणी चढतात. पण या सर्व काळात त्या पानांची काळजी घ्यावी लागते. त्यांना जपावं लागतं. किडीपासून, टोळधाडीपासून, वाऱ्या - वादळापासून, कडक उन्हापासून त्यांना वाचवावं लागतं. अशा रीतीनं काळजीपूर्वक त्यांचं जतन केलं, तरच त्याचं धान्यकणांमधे रूपांतर होऊ शकतं. धान्यकणांचा प्रत्यय घेता येतो, उपभोग घेता येतो. या मधल्या काळात त्या रोपाला नीट आळं करून पाणी द्यावं लागतं. तरच अखेरीस फळाचा लाभ होऊ शकतो. आळं केलं नाही, तर पाटानं दिलेलं पाणी अथवा पावसाचं पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जातं. ते जमिनीत जिरत मुरत नाही. त्याची ओल रोपाच्या मुळांपर्यंत जात नाही. स्वाभाविकच, अशा रोपापासून फळं मिळण्याची आशा दुरावते. थोडक्यात म्हणजे शेतात बी पेरल्यानंतर पुढं गाड्या भरून धान्य मिळू शकतं, पण मधल्या काळात त्याला खूप जपावं लागतं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक : संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment