Tuesday, 30 August 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ६० )

        तुकाराम प्रयत्नवादाचे फार मोठे पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या अनेक अभंगांतून दैनंदिन जीवनातील उदाहरणं देऊन प्रयत्नाचं महत्त्व आपल्या मनावर बिंबवलं आहे. एका अभंगात ते म्हणतात,

६० 
ओले मूळ भेदी खडकाचे अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धि ।। १ ।। 
नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही कईवाड तोंच वरि ॥ २ ॥ 
दोरें चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासें सेवनीं विष पडे ॥ ३ ॥
तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव । जठरीं बाळा वाव एकाएकी ? ।। ४ ।।

(अभंग. क्र. १४००)

          ओलं मूळ खडकाचं अंग भेटू शकतं. अभ्यासामुळं, म्हणजेच सततच्या सरावामुळे माणसाला सर्व अंगांनी परिपूर्ण अशी कार्यसिद्धी प्राप्त होते. होऊ शकत नाही, इतकं अवघड जगात काही नाही. जोपर्यंत आपण एखादं कार्य करण्याचा निश्चय करीत नाही, तोपर्यंतच ते अवघड वाटतं. दोरा जर एखाद्या दगडावर विशिष्ट पद्धतीनं घासला, तर त्या घर्षणानं त्या दगडाला कच पडतो आणि तो दगडही कापला जातो. अभ्यासामुळं विषही पचनी पडू शकतं. गर्भस्थ लहान मूल आईच्या उदरात स्वतः साठी प्रयत्नपूर्वक जागा निर्माण करतं. या सर्व उदाहरणांतून तुकारामांनी प्रयत्नाचं व अभ्यासाचं महत्त्व जोरदारपणे मांडलं आहे.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment