Tuesday, 30 August 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( आघात ६५ )

                  (आघात ६५)

आपलं मनुष्यत्व उन्नत करण्यासाठी आघात पचवणं महत्त्वाचं असतं, हे तुकारामांनी आणखी एका अभंगात अनेक उदाहरणं देऊन स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात,

६५ 
तापल्यावाचून नव्हे अळंकार । पिटूनिया सार उरले ते ।। १ ।। 
मग कदाकाळी नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र ते चि ।। २ ।। 
कळिवर बरे भोगू द्यावे भोगा । फांसिले ते रोगा हाती सुटे ।। ३ ।। 
तुका म्हणे मन करावे पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरि ।। ४ ।। 

(अभंग. क्र. २४००)

       जगभरच्या लोकांना सोन्याच्या दागिन्यांचं आकर्षण असतं, हे प्रसिद्धच आहे. सोनं हा धातू खरोखरच देखणा असून, तो माणसाचं मूळचं सौंदर्य खुलवतो. पण सोन्यापासून दागिना बनविण्याची प्रक्रिया सोन्याच्या दृष्टीनं मात्र तशी सुखाची नसते. त्याला तापवल्याशिवाय, उष्णतेनं भाजून काढल्याशिवाय त्याचा अलंकार घडत नाही. त्याला नुसतं तापवलंच जात नाही, तर सोनार आपल्या हत्यारानं त्याला वेगवेगळ्या अंगानं ठोकतही राहतो. या प्रक्रियेमुळे सोन्यामधे काही हिणकस भाग मिसळलेला असला, तर तो बाजूला होतो आणि अस्सल, सारभूत सोनं उरतं. त्याचा दागिना बनतो. माणसाचंही असंच आहे, असं तुकारामांना सुचवायचं आहे. आघात सोसले नाहीत, सोसण्याची ही प्रक्रिया नष्ट केली, आघात झाल्याबरोबर तीव्र द्वेषाची भावना निर्माण झाली, तर जे मित्र असतात तेच शत्रू होतात. शरीराच्या वाट्याला जे भोग आलेले असतात, ते त्याला भोगू द्यावेत, त्यांना धैर्यानं सामोरं जावं. शरीरात काही गंभीर रोग झाला असला, तर फासण्या टाकल्यानंतरच म्हणजेच एक प्रकारची शस्त्रक्रिया केल्यानंतरच शरीराची त्या रोगातून सुटका होते. त्या फासण्या सोसायलाच हव्यात. जीवनाच्या प्रवासात माणसानं हे सगळं शिकून घेतलं पाहिजे. संकटं, दुःखं, प्रतिकूल परिस्थिती, शत्रुत्व अशा अनेक गोष्टी आपल्या वाट्याला येतात. पण या बाबतीत आपण खंबीर होऊन त्या सगळ्या गोष्टी झेलाव्यात. पाठेळ म्हणजे ओझं वाहणारं जनावर जसं खूप काही सोसतं, तसं आपल्या मनाला पाठेळ बनवावं. जोपर्यंत पदार्थ शिजत नाही, तोपर्यंत त्यानं जाळ सोसलाच पाहिजे. तसंच जीवनात जोपर्यंत परिपक्वता लाभत नाही, तोपर्यंत आघात सोसायलाच हवेत आणि एकदा परिपक्वता लाभली, की त्यानंतर आघात पचवण्याचं सामर्थ्य प्राप्त झालेलंच असतं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक (आघात ६४ )

                 आघात (६४)

        प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा कोणत्या ना कोणत्या प्रकारची संकटं येतातच. जो मनुष्य आतून कणखर असतो, मनानं खंबीर असतो, संकटाचे आघात पचवण्याची ज्याची ताकद असते, तो मनुष्य जगाच्या मानसन्मानाला पात्र होतो. परंतु ज्याचं व्यक्तिमत्त्व कसदार नसतं, कचखाऊ असत, तो आघात पचवू शकत नाही. तुकारामांनी एका अभंगात या सत्याचं दर्शन अचूकपणे घडवलं आहे. ते म्हणतात,

६४ 
हिरा ठेविता ऐरणीं । वांचे मारिता जो घणी ॥१॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥२॥
 मोहरा होय तोचि अंगे । सूत न जळे ज्याचे संगें ॥३॥
तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥४॥ 

(अभंग. क्र.५०)

          नैसर्गिक स्थितीत सापडलेला हिरा पैलू पाडल्याशिवाय खऱ्या अर्थानं सुंदर आणि आकर्षक होत नाही. परंतु पैलू पाडायचे, तर त्याला ऐरणीवर ठेवून, घणाचे आघात करून त्याचं मूळचं रूप खुलवावं लागतं. जो अस्सल हिरा असतो, तो हे घणाचे आघात झाले तरी फुटत नाही. त्याचा नको असलेला भाग तेवढा अलग होतो आणि बाकीचा भाग शाबूत राहतो. जो हिरा असा असेल, त्यालाच बाजारात किंमत मिळते. याउलट, हिऱ्यासारखा दिसणारा पण हिऱ्याचा अस्सलपणा नसलेला पदार्थ घणाचा तडाखा सोसू शकत नाही, त्याचा चुरा होतो. मोहरा नावाचं एक रत्न असल्याचं मानलं जातं. जे अस्सल रत्न असतं, त्याच्या जवळ ठेवलेलं सूत आगीनं जळत नाही, असं म्हणतात. या वचनाच्या वाच्याथपिक्षा त्याचा व्यंग्यार्थ महत्त्वाचा आहे. हिऱ्याचं उदाहरण असो वा मोहरा या रत्नाचं असो, ते माणसाच्या व्यक्तिमत्त्वालाही लागू पडतं. स्वार्थी, विकारग्रस्त, दुर्जन मनुष्य असहिष्णू असतो; परंतु, जे खरे संत असतात, महामानव असतात, ते जगाचे आघात सोसूनही अविचल राहतात.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ६३ )

                     प्रयत्न  (६३)

         प्रयत्नाच्या बाबतीत आणखी एका अभंगात ते म्हणतात, 

६३ 
निवडावे खड़े । तरी दळण बोजे घडे ॥१॥
नाही तर नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥२॥
निवडावे तन । सेतीं करावे राखण ॥३॥
तुका म्हणे नीत । न विचारिता नव्हे हित ॥४॥

 (अ.क्र. २१३७)

          शेतातून आणलेलं धान्य दळण्यासाठी जसंच्या तसं जात्याकडं नेलं जात नाही. मळणी करताना धान्यामधे मातीचे खडे मिसळलेले असतात. स्वाभाविकच, असं धान्य दळण्यापूर्वी निवडावं लागतं. त्यातील खडे वेचून बाजूला काढावे लागतात. तरच ते दळण चांगलं होतं. नाही तर धान्याबरोबर खड्यांचंही पीठ होतं आणि मग त्या मातीची खस भाकरी, चपाती, पोळी वगैरेंना लागते. त्यांची चव बिघडते. स्वयंपाक नासून गेल्यासारखं होतं. खडे निवडण्याच्या बाबतीत आळस केला, तर हाय हाय करण्याची वेळ येते. धान्य निर्माण होण्याच्या आधी शेतामधे पीक असतानाही आळस झटकून अशीच काळजी घ्यावी लागते. तण वेचून काढावं लागतं. कधी खुरप्यानं भांगलण करून, कधी कोळप्याने कोळपण करून, तर कधी हातानं उपटून तण नाहीसं करावं लागतं. पिकाचं रक्षण करावं लागतं. व्यापक जीवनातही हीच रीत असते. जे चांगलं आहे, ते पुरेपूर वाढावं पक्व व्हावं, असं वाटत असेल, तर त्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारं, त्याला आडवं येणारं जे वाईट असेल, ते उपटून फेकावं लागतं. त्याचं निर्मूलन करावं लागतं. सज्जनांचं रक्षण करायचं असेल, तर दुष्टांचं निर्दालन करावं लागतं. हीच वागण्याची योग्य नीती होय. ही नीती समजून न घेता, तिचा विचार न करता कोणी वागू लागला, तर ते त्याच्या दृष्टीनं हितकारक नव्हे. व्यक्तीच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या निकोप वाढीसाठी समाजातील अनिष्ट प्रवृत्ती उखडून टाकल्या, तरच तो समाज खऱ्या अर्थानं उमलू फुलू शकतो, हे तणाच्या दाखल्यावरून चांगलं स्पष्ट होतं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ६२ )

                      प्रयत्न (६२)

           प्रयत्नाच्या बाबतीत काही महत्त्वाचे पैलू तुकारामांनी एका अभंगात नोंदविले आहेत. ते म्हणतात,

६२ 
उभा ऐल थडी तेणें घालू नये उड्डी ॥ १ ॥ 
पुढे गेल्याचे उपाय करावे ते केले काय ॥ २ ॥
दिसते आहारी। नये जाऊ ऐशावरी ॥ ३ ॥
अळसाची धाडी तुका म्हणे बहु नाडी ॥ ४ ॥ (अ.क्र. ३२२२) 

         नदी तरून पलीकडं जायचं असेल, तर माणसाकडं हिंमत असावी लागते. जीवनातील विविध प्रसंगांनाही हे लागू पडतं. पलीकडं तर जायचं आहे, पण धाडस नाही म्हणून जो मनुष्य अलीकडच्या काठावरच उभा असतो, त्यानं पाण्यात उडी मारू नये. कारण, त्यासाठी त्याचं मन तयार नसतं. पाण्यात उडी मारायचीच नाही, असा याचा अर्थ नाही. योग्य ती तयारी करून उडी जरूर मारायची. आपल्या अगोदर पाण्यात उडी मारून जे यशस्वी रीतीनं पैलतीराला पोचले आहेत, त्यांनी काय काय प्रयत्न केले, ते समजून घ्यावं आणि त्याच्या आधारे आपणही तसे प्रयत्न करून पैलतीराला पोचावं. अशी तयारी करायची नाही आणि पैलतीर आपल्या आवाक्यात आहे अशी समजूत करून घेऊन पाण्यात उडी मारायची, हा योग्य मार्ग नव्हे. परंतु त्याबरोबरच निष्क्रिय न होण्याचा सावधपणाही बाळगायचा. आळसात पडून रहायचं नाही. आळसानं आपल्यावर धाड घातली, तर तो आपली मोठी हानी करतो. तात्पर्य, जीवनाचा प्रवास करताना सर्व प्रकारे काळजी घेऊन आणि जागरूक राहून वाटचाल करावी.

डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ६१ )

                       प्रयत्न  (६१)

         आणखी एका अभंगात त्यांनी प्रयत्नाचा गौरव करताना म्हटलं आहे,

६१ 
दधिमाझी लोणी जाणती सकळ । ते काढी निराळे जाणे मथन ॥ १ ॥ 
अग्नि काष्ठामाजी ऐसे जाणे जन मथिलियाविण कैसा जाळी ?॥ २ ॥
तुका म्हणे मुख मळीण दर्पणीं । उजळिल्यावाचूनि कैसे भासे ? ।। ३ ।।

(अभंग. क्र. २८०७) 

        दह्यामधे लोणी असतं, हे सर्वजण जाणतात. परंतु, ज्याला दही घुसळण्याचं ज्ञान असतं, तोच दह्यातून लोणी वेगळं काढून घेतो. लाकडामधे अग्नी असतो, हे लोकांना ठाऊक असतं. पण, दोन लाकडं एकमेकांवर घासली नाहीत, तर तो अग्नी निर्माण कसा होणार आणि ज्वलनाचं कार्य कसं करणार ? आरसा जर मळलेला असला, तर तो पुसला पाहिजे, स्वच्छ केला पाहिजे, तसं न करता त्याच्यामधे आपला चेहरा जसाच्या तसा कसा दिसू शकेल ? ही सगळी उदाहरणं तुकाराम आपल्याला प्रयत्नांची प्रेरणा देण्यासाठी देत आहेत. फळं मिळू शकतात, ती कित्येकदा आपल्या आसपासच असतात, आपल्या आवाक्यात असतात, परंतु ती मिळवण्यासाठी आवश्यक ती धडपड मात्र जरूर केली पाहिजे, हे त्यांना सांगायचं आहे.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ६० )

        तुकाराम प्रयत्नवादाचे फार मोठे पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या अनेक अभंगांतून दैनंदिन जीवनातील उदाहरणं देऊन प्रयत्नाचं महत्त्व आपल्या मनावर बिंबवलं आहे. एका अभंगात ते म्हणतात,

६० 
ओले मूळ भेदी खडकाचे अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धि ।। १ ।। 
नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही कईवाड तोंच वरि ॥ २ ॥ 
दोरें चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासें सेवनीं विष पडे ॥ ३ ॥
तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव । जठरीं बाळा वाव एकाएकी ? ।। ४ ।।

(अभंग. क्र. १४००)

          ओलं मूळ खडकाचं अंग भेटू शकतं. अभ्यासामुळं, म्हणजेच सततच्या सरावामुळे माणसाला सर्व अंगांनी परिपूर्ण अशी कार्यसिद्धी प्राप्त होते. होऊ शकत नाही, इतकं अवघड जगात काही नाही. जोपर्यंत आपण एखादं कार्य करण्याचा निश्चय करीत नाही, तोपर्यंतच ते अवघड वाटतं. दोरा जर एखाद्या दगडावर विशिष्ट पद्धतीनं घासला, तर त्या घर्षणानं त्या दगडाला कच पडतो आणि तो दगडही कापला जातो. अभ्यासामुळं विषही पचनी पडू शकतं. गर्भस्थ लहान मूल आईच्या उदरात स्वतः साठी प्रयत्नपूर्वक जागा निर्माण करतं. या सर्व उदाहरणांतून तुकारामांनी प्रयत्नाचं व अभ्यासाचं महत्त्व जोरदारपणे मांडलं आहे.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ५९ )

                     प्रयत्न

         जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं, यावर तुकारामांनी अतिशय भर दिला होता. एका विख्यात अभंगात ते म्हणतात,

५९ 
साधूनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकाते डोळां न पाहवे ।। १ ।। 
साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिके कापती देखोनिया ।। २ ।। 
असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।। ३ ।। 
(अभंग. क्र. २९८)

         सरावामुळं अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील माणसाच्या आवाक्यात येतात. जालीम विष प्याल्यास माणसाला प्राण गमवावे लागतात. पण विषाचा थोडाथोडा अंश पिण्याचा सराव करत जाणारे लोक क्रमाक्रमानं तो अंश वाढवत नेऊन तोळा तोळा विष देखील पचवू लागतात.
          सराव न केलेल्या इतरांना त्यांचं विष पिण्याचं दृश्य डोळ्यांनी बघवतही नाही. विषारी सापाचा दंश माणसाच्या मृत्यूला कारणीभूत होतो, परंतु काही लोक सरावानं सापांना आपल्या हातात पकडतात. त्यांच्यासारखा सराव न केलेले इतर लोक ते दृश्य पाहूनच थरथर कापू लागतात. माणसाच्या जीवनात इतर क्षेत्रांत नेमकं असंच घडत असतं. एखादी गोष्ट असाध्य आहे, ती प्राप्त करणं कदापि शक्य होणार नाही, असं तिच्याविषयी वाटत असतं. परंतु एखादा प्रयत्नवादी मनुष्य खटपट करतो, धडपडतो, यातायात करतो आणि प्रारंभी असाध्य वाटणारी ती गोष्टही त्याच्या दृष्टीनं साध्य होते. हे घडू शकतं, ते अभ्यासामुळं, सरावामुळं, कठोर परिश्रमामुळं, प्रयत्नामुळं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

Monday, 29 August 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( शेती ५८ )

५८ 

उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ ।
आपले सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥ 
नेम नाही लाभ हानि । अवचित घडती दोनी।
 विचारूनि मनीं । पाहिजे ते प्रयोजावे ॥२॥
 जाळ जाळा काळे । करपो नेदावे आगळे ।
 जेविता वेगळे | ज्याचे त्याचे तेथे शोभे ॥३॥
 पाळी नांगर पाभारी । तन निवडूनि सोंकरी ।
तुका म्हणे घरीं । सेज जमा सेवटी ॥४॥ 

(अ.क्र. ३६८०)

काळ अथवा वेळ हे सृष्टीमधील एक मूलभूत आणि अत्यंत महत्वाचं परिमाण आहे. तसं पाहिलं, तर काळ हा काही ज्ञानेंद्रियांना प्रत्यक्षरीत्या जाणता येईल असा पदार्थ नव्हे. आपण डोळ्यांनी त्याला पाहू शकत नाही; कानांनी ऐकू शकत नाही; त्वचेला त्याचा स्पर्श जाणवत नाही; जिभेला त्याची चव कळत नाही आणि नाकानं त्याचा गंधही अनुभवता येत नाही. अशा रीतीनं ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत येत नसल्यामुळं जणू काही त्याला अस्तित्वच नाही, असं वाटण्यासारखं त्याचं स्वरूप आहे. तरी देखील अवघ्या सृष्टीतील अणुरेणूंवर त्याची सत्ता चालत असल्याचं दिसतं. प्राण्यांच्या जीवनावर तर त्याचा विलक्षण प्रभाव असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्राण्यांना जे काही अस्तित्व लाभलेलं असतं, त्या अस्तित्वामधे क्षणाक्षणाला परिवर्तन होत असल्याचं आढळतं. तात्पर्य, प्रत्यक्षरीत्या ज्याच्या अस्तित्वाविषयीच संशय निर्माण होतो, तो काळ कमालीचा सामर्थ्यशाली आहे, हे जीवनातील उलथापालथी पाहता अप्रत्यक्षरीत्या आपल्या ध्यानात येतं.
              सृष्टीमधील सर्वच पदार्थ आणि त्यातही खास करून सर्व प्राणी हे काळाच्या माध्यमातून आपल्या अस्तित्वाचा वा जीवनाचा प्रवास करीत असतात. यांपैकी प्राण्यांच्या प्रवासाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. ज्या प्राण्याला योग्य काळी योग्य कृती करण्याचं भान असतं, तो प्राणी जीवनामधे कमालीचा यशस्वी होतो. बाह्य सृष्टीवर अथवा आपल्याशी स्पर्धा करणाऱ्या इतर प्राण्यांवर मात करण्यात तर तो सफल होतोच, पण अशा बाह्य घटकांशी संबंध नसलेल्या स्वरूपाची, स्वतःच्या आंतरिक विकासाची प्रक्रिया घडत असतानाही तो सफलतेचं अत्युच्च शिखर गाठू शकतो. याचा अर्थ वेळेचं अचूक भान असणं आणि योग्य वेळी योग्य कृती करणं, हा प्राण्यांच्या जीवनातील यशाला कारणीभूत होणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
            काळ आणि वेळ यांच्या संबंधातील हा विचार संत तुकारामांनी वरील अभंगात मार्मिक रीतीनं मांडला असून त्यासाठी त्यांनी दिलेला शेतीच्या क्षेत्रातील दाखला म्हणजे एक श्रेष्ठ दर्जाचं 'कृषिसूत्र'च आहे, असं म्हणता येतं. प्राचीन भारतात बरंचसं लेखन सूत्रशैलीत होत असे. अल्पाक्षर, असंदिग्ध आणि सारयुक्त असणं, हे सूत्राचं खास लक्षण असतं. तुकारामांनी प्रस्तुत अभंगातील शेवटच्या चरणामधे शेतात कराव्या लागणाऱ्या प्राथमिक मशागतीपासून ते मळणी करून घरात धान्याची रास आणेपर्यंत ज्या ज्या क्रिया कराव्या लागतात, त्यांपैकी प्रमुख अशा बहुतेक क्रियांची सूत्रशैलीमधे नोंद केली असून त्या सर्व क्रिया योग्य वेळी योग्य क्रमानं केल्या, तरच घरात धान्याची रास येऊ शकते, हे स्पष्ट केलं आहे.
         योग्य वेळ साधण्यासाठी आपलं सर्वं युक्तिबळ आपण वापरलं पाहिजे, असं तुकाराम म्हणतात. युक्तिबळ म्हणजे युक्तीचं बळ असंही म्हणता येईल किंवा युक्ती आणि बळ असंही म्हणता येईल. ते कसंही असो; विशिष्ट कार्य करण्याच्या बाबतीत योग्य वेळ साधण्यासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावलं पाहिजे, असं तुकारामांच्या या वचनाचं तात्पर्य आहे. जीवनाच्या प्रवासात, काळाच्या ओघात केव्हा काय घडेल, ते सांगता येत नाही. काळाच्या उदरात काय काय लपलेलं आहे, ते आधी समजू शकत नाही. अकस्मात एखादी लाभाची गोष्टही घडू शकते आणि एखादं संकट कोसळल्यामुळं हानीही होऊ शकते. हे सगळं ध्यानात घेऊन माणसानं आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पावलावर सावध रहावं. ज्या वेळी जी गोष्ट करणं आवश्यक असतं, त्या वेळी ती गोष्ट न चुकता करावी. आळस करू नये. हलगर्जीपणा करू नये. विलंब लावू नये, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी स्वैंपाकाचं उदाहरण दिलं आहे. एखादा पदार्थ शिजत घातल्यानंतर तो शिजण्यासाठी त्याला योग्य वेळी आवश्यक ती उष्णता दिली पाहिजे. ज्या वेळी चुलीमधे जाळ देणं आवश्यक आहे, त्या वेळी तो दिला पाहिजे. त्याबरोबरच पदार्थ शिजल्यानंतर योग्य वेळी जाळ थांबविलाही पाहिजे. तसा तो थांबविला नाही, तर शिजत घातलेला पदार्थ करपून जाऊ शकतो. जाळ देण्याच्या वेळी जाळ दिला आणि जाळ थांबविण्याच्या वेळी तो थांबविला, तरच शिजविलेल्या पदार्थाचा खरा आस्वाद घेता येतो. उत्तम भोजनाचा आनंद प्राप्त करता येतो.

वेळेचं औचित्य अशा पद्धतीनं स्पष्ट करता करता तुकारामांनी शेतीचं एक उदाहरण दिलं आहे. शेतकरी आधी आपल्या शेताची मशागत करतो. काही वेळा तो शेत नांगरण्याऐवजी नुसती कुळवाची पाळी देतो. काही वेळा तो जमिनीची नांगरट करतो. जमिनीचा पोत, आधी घेतलेलं पीक, पाऊसकाळ, शेतामधे वाढणारं तण इ. गोष्टींचा विचार करून तो या बाबतीतील निर्णय घेतो. . कुळवण, नांगरट यांसारखी मशागत करून सज्ज झाल्यावर तो पावसाची वाट पाहतो. मग पावसाळ्यात योग्य वेळ साधून पेरणी करतो. पुढं पीक जसं वाढू लागतं, तसं त्यामधे तणही वाढू लागतं. मग योग्य वेळी तो तण काढण्याचं काम करतो. पुढं पीक जोमानं वाढून त्याच्या कणसांमधे दाणे भरतात, तेव्हा तो पाखरं वगैरेंपासून पिकाची राखण करतो. क्रमानं हे सगळं करीत गेल्यानंतर अखेरीस मळणी करून घरामधे धान्याची रास आणतो. ही रास प्राप्त करणं हे त्याचं ध्येय असतं. ते त्यानं पाहिलेलं हळुवार स्वप्न असतं. पण ते स्वप्न साकार होण्यासाठी उन्हाळ्यात केलेल्या मशागतीपासून क्रमश: शेतीची सर्व कामं वेळेवर करणं आवश्यक असतं. भारताचा सर्वश्रेष्ठ व्याकरणकार पाणिनी आपल्या एकेका सूत्रामधे हजारो शब्दांचे नियम सांगून टाकतो. जणू काही त्याच पद्धतीनं संत तुकारामांनी आपल्या अभंगाच्या या एका चरणामधे एका सूत्रामधे शेतकऱ्याला त्याच्या वर्षभराच्या कालखंडात कराव्या लागणाऱ्या सर्व कामांची संक्षेपानं नोंद केली आहे.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( शेती ५७ )

प्रत्येक काम वेळेवर केलं पाहिजे, या बाबतीत तुकाराम फार आग्रही होते. कोणत्या वेळी कोणतं काम करावं आणि ते केव्हा थांबवावं, याचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे, असा त्यांचा उपदेश होता. ते म्हणतात,

५७ 
शिजल्यावरी जाळ ।  वाया जायाचे ते मूळ ॥१॥
 ऐसा वारावा तो श्रम । अतिशयी नाही काम ॥२॥
 सांभाळावे वर्म । उचिताच्या काळे धर्म ॥३॥
तुका म्हणे कळे। ऐसे कारणाचे वेळे ॥४॥
 (अ.क्र. ३२२१)

पदार्थ शिवल्यानंतर जाळ चालू ठेवणं, ही गोष्ट केलेलं सर्व काही वाया घालवण्याला कारणीभूत होते. अशा प्रकारचे वाया जाणारे श्रम टाळावेत. केलेलं काम निष्फळ बनविणारा अतिरेक काही कामाचा नाही. हे यशस्वी जीवनाचं रहस्य सांभाळावं. योग्य वेळी योग्य गोष्ट करणं, हा खरा धर्म होय, खरं कर्तव्य होय. काम करण्याच्या वेळी हे नीट कळतं. अर्थात, ज्यांना ते कळतं, त्यांचंच जीवन सफल होतं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( शेती ५६ )

अभंग क्र. ५६ 

बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ।।१।।
वाया गेले ऐसे दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥२॥
पाल्याची जतन | तरि प्रांतीं येती कण ॥ ३ ॥
तुका म्हणे आळा । उदक देता लाभे फळा ॥ ४॥ 
(अ.क्र. २०८६ ) 

एका दृष्टीनं हा अभंग हे देखील शेतकऱ्याच्या जीवनावरचं एक सुरेख सूत्रच आहे. शेतकरी प्रारंभी शेतात बी पेरतात, नंतर अनेक प्रकारे कष्ट करतात, काळजी घेतात आणि अखेरीस गाडीतून धान्याची पोती घरी आणतात. खरं तर जेव्हा बी पेरलं जातं, तेव्हा ते मातीत गाडलं जातं. ते अदृश्य होतं. नाहीसं झाल्यासारखं वाटतं. त्याचं अस्तित्व हरवल्यासारखं होतं. जणू काही पेरलेलं बी वाया गेलं असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र ते बी जरी मातीत गाडलं गेल्यासारखं वाटलं, त्याचं तोंड मातीनं झाकून टाकलेलं असलं, त्याला मातीच्या आड दडपून टाकण्यात आलेलं असलं, तरी ते तिथं एक क्षणभरही गप्प बसत नाही. त्याच्या अंतर्यामीचं चैतन्य त्याला दडपून टाकणाऱ्या मातीला आतून धडका देऊ लागतं. ते तिला आपल्या अस्तित्वाची, आपल्या उगवण्याच्या क्षमतेची जाणीव करून देऊ लागतं. अखेरीस ते तिला भेगा पाडून प्रकाशात डोकावतं, मोकळ्या आकाशात झेपावतं आणि धान्यामधे रूपांतरित होतं. प्रथमदर्शनी जे वाया गेल्यासारखं वाटत होतं, त्याच्या आत सुप्त स्वरूपात इतका प्रचंड लाभ लपलेला होता, हे नंतर ध्यानात येतं.
         अर्थात, बीजाच्या उदरात लपलेला हा लाभ आपोआप शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही, हे मात्र पक्कं ध्यानात ठेवलं पाहिजे. जमिनीला धडका देऊन एक नाजुकसा अंकुर बाहेर पडतो. त्याला कोवळी, लुसलुशीत पानं फुटतात. पुढं त्याचं मोठं रोप वा झाड बनतं. त्याच्या अंगावर कोवळ्या, देखण्या पानांची लेणी चढतात. पण या सर्व काळात त्या पानांची काळजी घ्यावी लागते. त्यांना जपावं लागतं. किडीपासून, टोळधाडीपासून, वाऱ्या - वादळापासून, कडक उन्हापासून त्यांना वाचवावं लागतं. अशा रीतीनं काळजीपूर्वक त्यांचं जतन केलं, तरच त्याचं धान्यकणांमधे रूपांतर होऊ शकतं. धान्यकणांचा प्रत्यय घेता येतो, उपभोग घेता येतो. या मधल्या काळात त्या रोपाला नीट आळं करून पाणी द्यावं लागतं. तरच अखेरीस फळाचा लाभ होऊ शकतो. आळं केलं नाही, तर पाटानं दिलेलं पाणी अथवा पावसाचं पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जातं. ते जमिनीत जिरत मुरत नाही. त्याची ओल रोपाच्या मुळांपर्यंत जात नाही. स्वाभाविकच, अशा रोपापासून फळं मिळण्याची आशा दुरावते. थोडक्यात म्हणजे शेतात बी पेरल्यानंतर पुढं गाड्या भरून धान्य मिळू शकतं, पण मधल्या काळात त्याला खूप जपावं लागतं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक : संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( शेती ५५ )

पिकांना कृत्रिम रीतीनं दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या संदर्भात तुकारामांचे काही अभंग मनाला अगदी भुरळ घालणारे आहेत. ते एका अभंगात म्हणतात, 

५५ 

बळ बुद्धी बेचुनिया शक्ती । उदक चालवावे युक्ती ।।१।। 
नाही चळण तथा अंगीं । धावे लवणामागे वेगीं ।।२।।
पाट मोट कळा । भरित पखाला सागळा ।।३।।
बीज ज्यासी घ्यावे । तुका म्हणे तैसे व्हावे ।। ४ ।। 
(अ.क्र. १८७८)

मोट वगैरे साधनांनी विहिरीतून उपसलेलं पाणी पाटानं नेऊन पिकाला नीट पाजणं, हा शेतीमधील एक खास अनुभव आहे. पाणी पिकापर्यंत व्यवस्थित नेणं हे मोठ्या कौशल्याचं काम असतं. बळ बुद्धी, शक्ती युक्ती वापरून वापरून पाणी पिकापर्यंत नीट न्यावं लागतं. पाण्याला स्वतःची अशी गती नसते. त्याच्या अंगी स्वतःचं असं काही 'चळण' नसतं, चलनवलन नसतं. लवणामागं म्हणजे उताराच्या दिशेनं वेगानं धावणं हा त्याचा स्वभाव असतो. हा स्वभाव ओळखून शेतकऱ्यानं पाट उताराच्या दिशेनं न्यायचा असतो. आधी पाट तयार करायचा आणि मग मोट, पखाल, सागळा इ. साधनांनी पाणी उपसून ते त्या पाटात सोडायचं असतं. या पाटाच्या बाबतीत खूप दक्षता घ्यावी लागते. वाटेत कुठं चढ असेल, तर तो काढून टाकून वाट मोकळी करावी लागते. खडक असेल, तर तो फोडावा लागतो. आवश्यक तिथं वळण घ्यावं लागतं. ज्या रानाला पाणी द्यायचं, ते शक्यतो समपातळीत राहील, अशा पद्धतीनं त्याची बांध-बंदिस्ती करावी लागते. नांगराचं तास घालतानाही फाळानं निघाणारी माती चढाच्या बाजूला न जाता उताराच्या बाजूला पडेल, याची काळजी घ्यावी लागते. वाफे तयार करताना त्या वाफ्यातील सर्व पिकाला समान रीतीनं पाणी मिळेल, हे पहावं लागतं. 'वाकुरी' तयार करताना, त्यांचे 'भुंडे' तयार करताना पाणी समपातळीत राहण्याच्या दृष्टीनं काळजी घ्यावी लागते. एका वाफ्यातून दुसऱ्या वाफ्याला, एका वाकुऱ्यातून दुसऱ्या वाकुऱ्याला, एका खांडातून (वाकुऱ्यांच्या समूहातून दुसऱ्या खांडाला पाणी नेण्याची योग्य व्यवस्था करावी लागते. झाडांसाठी रोपांसाठी आळी करावी लागतात. पावसाचं पाणी देखील शेतात समपातळीत रहावं, हे पहावं लागतं. नाही तर एका ठिकाणी पाणी साठून तेथील पीक अती पाण्यानं कुजण्याचा पिवळं पडण्याचा धोका संभवतो, तर दुसरीकडं सगळं पाणी पृष्ठभागावरून वाहून गेल्यामुळं जमीन लगेच कोरडी पडून तेथील पाणी सुकण्याचं संकट निर्माण होतं. वरवर साधी-सोपी वाटणारी ही गोष्ट बारकाईनं तपासून पाहिली, की शेतकऱ्याला किती अवधान ठेवावं लागतं, हे समजतं. हे अवधान न ठेवणारा शेतकरी पाटाचं पाणी पिकाला देऊ लागला, तर जमीन विषम पातळीत असल्यामुळं पाणी नको तिथं फुटतं, शेतकऱ्यानं आयत्या वेळी माती ओढण्याचा प्रयत्न केला, तर त्याला पाणी आवरत नाही आणि मग ते सगळ्या रानाची दैना दैना उडवून लावतं. पिकाला कुठं पाणी मिळालं, तर कुठं नाही, अशी अवस्था होते. म्हणून तर तुकारामांनी बळ - शक्ती, बुद्धी - युक्ती असे जवळपास एकाच अर्थाचे शब्द दोनदा वापरून, तसंच शक्ती आणि बुद्धी या दोहोंची आवश्यकता नोंदवून शेतकऱ्याची जबाबदारी स्पष्ट केली आहे. एकदा पिकापर्यंत पाणी नीट पोचलं, की मग शेतात जे बी पेरलेलं असेल, त्याला अनुसरून पीक येतं. शेतकऱ्याचे प्रयत्न सफल होतात.
डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक (शेती ५४)

शेती
अभंग क्र. ५४ 

फळ पिके देठीं । निमित्य वारियाची भेटी ॥१॥
 हा तो अनुभव रोकडा कळो येतो खरा कुडा ॥२॥ 
तोडिलिया बळें वाया जाती काची फळे ॥३॥
 तुका म्हणे मन तेथे आपुले कारण ॥ ४॥
 (अ.क्र. १८४८)

          शेतकऱ्यानं खूप जपणूक केल्यानंतर झाडं फळांनी बहरतात. झाडा-झाडावरची रसाळ, टपोरी फळं पाहून शेतकऱ्याचं मन हरखून जातं; पण हाच क्षण शेतकऱ्याला एक फार महत्त्वाचा इशारा देत असतो. तो शेतकऱ्याच्या अनुभवाचा कस जोखणारा असतो. ती फळं नेमकी केव्हा काढायची, कधी उतरवायची, याचा निर्णय घेणं फक्त जाणकार शेतकऱ्यालाच जमू शकतं. अडाणी, अननुभवी शेतकरी इतकं सगळं वैभव वाया घालवील, हा धोका संभवतो. अशा शेतकऱ्यांना आणि त्याद्वारे जीवनाचा प्रवास करणाऱ्या सर्वच पथिकांना तुकारामांनी या अभंगाद्वारे अनुभवाचे बोल ऐकवले आहेत.
      झाडावर जी असंख्य फळं लगडलेली असतात, त्यांपैकी एखादं फळ जरी पाडाला येऊन देठावरच पिकलं, तरी शेतकऱ्याला झाडावर चढून ते काढावं लागत नाही. वाऱ्याची एखादी हळुवार झुळूक येण्याचं निमित्त झालं, तरी ते फळ देठापासून हळूच अलग होतं, झाडापासून निसटतं आणि झटकन भूमीचा आश्रय घेतं. अशा रीतीनं पक्वता ही जणू काही स्वयंसिद्ध असते. तिची चाचपणी करावी लागत नाही, तपासणी करावी लागत नाही. हा तर शेतकऱ्याचा रोकडा, रोख असा अनुभव आहे. त्याच्याद्वारे खरं काय आणि खोटं काय हे सहज कळून येतं; पक्कं काय आणि कच्चं काय, त्याचा आपोआप उलगडा होतो. पाडाचं एक फळ झाडावरील सर्व फळांच्या वतीनं बोलतं. त्यांच्या पिकलेपणाची ग्वाही देतं, घोषणा करतं. जे फळ पक्व झालेलं असतं, त्याला ताकद लावून ओढावं लागत नाही, बळ लावून खेचावं लागत नाही, नखाच्या तीक्ष्णतेनं खुडावं लागत नाही. वाऱ्याचा नाजुक स्पर्श त्याला त्याच्या इष्ट स्थळी पोचविण्यासाठी पुरेसा होतो.
          फळ असं पाडाला आलेलं नसताना एखाद्यानं जबरदस्तीनं झाडावरची फळं काढली, तर ती कच्ची फळं वाया जातात. ती पिकत नाहीत. त्यांचा रंग बदलत नाही, की स्वाद बदलत नाही. बदललाच, तर तो अनिष्ट दिशेनं बदलतो आणि मग ती फळं खाण्याला योग्य होत नाहीत. अननुभवी शेतकरी कच्ची फळं काढतात किंवा काही वेळा चोराचिलटांच्या उपद्रवामुळंही शेतकऱ्यांना फळं काढण्याची घाई करावी लागते. परंतु या प्रकारात त्यांचं प्रचंड नुकसान होतं.
          जे फळांच्या बाबतीत तेच मानवी व्यक्तित्वांच्याही बाबतीत घडत असतं. परिपक्व व्यक्तिमत्त्वाची माणसं त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या नीट पेलतात, व्यवस्थित पार पाडतात. याउलट ज्यांना विषयाचं ज्ञान पूर्णपणे प्राप्त झालेलं नाही, विशिष्ट क्षेत्राच्या खाचाखोचा कळलेल्या नाहीत, ज्यांनी चढ-उतार अनुभवलेले नाहीत, अशी माणसं निकराच्या प्रसंगामधे टिकत नाहीत. त्यांचं कच्चेपण उघडं पडतं. ती हरण्याची, पराभूत होण्याची, वाया जाण्याची शक्यता असते. म्हणून कोणतीही गोष्ट पिकेपर्यंत, तिची योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा केली पाहिजे. संयम ठेवून शांतपणे ती पक्व होण्याची वाट पाहिली पाहिजे. हे सगळं आपल्या मनातच घडत असतं. त्यामुळं या बाबतीत आपण जे काही निर्णय घेतो, त्यामागं आपलं मन हेच अवघं कारण असतं. म्हणून त्या मनालाच शिस्तबद्ध बनवलं पाहिजे. त्याच्यामधे अनुभवाच्या आधारे शहाणपण निर्माण केलं पाहिजे.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८