आघात ६७
घाव सोसण्याचाच विषय तुकारामांनी आणखी एका अभंगात आग्रहानं मांडला आहे. ते म्हणतात,
६७
मस्तकीं सहावे ठाकियासी जाण । तेव्हा देवपण भोगावे गा ॥ १ ॥
आपुलिये स्तुती निंदा अथवा मान । टाकावा थुंकोन पैलीकडे ।। २ ।।
सदगुरुसेवन ते चि अमृतपान । करुनी प्राशन बेसावे गा ।। ३ ।।
आपुल्या मस्तक पडोत डोंगर । सुखाचे माहेर टाकू नये ।। ४ ।।
तुका म्हणे आता सांगू तुला किती ?। जिण्याची फजीती करू नये ॥ ५ ॥
(अ.क्र.४२१४)
एखादा सामान्य दगड असतो. त्यानं जर आपल्या मस्तकावर टाकीचे घाव सोसले, तर तो देव बनतो. दगड असूनही घाव सोसल्यामुळं त्याला देवपण भोगायला मिळतं. अर्थात, असे घाव सोसण्यासाठी मनामधे एक प्रकारचं धैर्य, स्थैर्य आणि संतुलन असावं लागतं. जीवनाच्या प्रवासात कुणी स्तुती करतं, कुणी निंदा करतं, कुणी मान देतं. परंतु माणसानं त्या सर्व अवस्थांतून जाताना मनाचं संतुलन टिकवावं. या प्रकारच्या गोष्टींमधे अडकून पडण्याची भावना बाजूला सारावी; ती भुंकूनच टाकावी आणि तिच्या पलीकडं जावं, असं म्हटलं तरी चालेल. अशा गोष्टींमधे अडकून पडण्यापेक्षा आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सज्जन गुरूच्या सहवासात रहावं, त्याचा उपदेश हे अमृतच मानून त्याचं प्राशन करावं आणि त्याचा आनंद घेत स्वस्थ रहावं. आपल्या मस्तकावर संकटाचे डोंगर पडले, तरी त्यांची पर्वा करू नये. संतांच्या सहवासात जे सुख मिळतं, ते गमावू नये. हा सहवास म्हणजे जणू काही सुखाचं माहेर असतं आणि ते हरवून बसू नये. याउलट, घाव सोसायचे नाहीत, स्तुती आणि निंदा यांच्यात अडकून पडायचं, संतांचा सहवास टाळायचा आणि मस्तकावर संकट आलं की खचून जायचं, हा प्रकार आपल्या जिंदगीची फजिती करणारा असतो. तुकाराम जणू काही आपल्या सर्वांना कळवळून सांगत आहेत, की अशी फजिती करून घेऊ नका.
डॉ.आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८