Sunday, 18 September 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( शुद्धता ७५)

                   (शुद्धता  ७५)

         माणसाचं स्वत:चं वर्तन अशुद्ध, सदोष, अनैतिक असलं, की त्याला बाकीचं सगळं जगही तसंच असल्यासारखं वाटतं. हे सांगताना तुकाराम म्हणतात,

७५ 
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाही ॥१॥ 
रोग्याविषतुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाही ।।२।। 
तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण । तया त्रिभुवन अवघे खोटे ।।३।। 
(अ.क्र. ३०२)

        आंधळ्या माणसाला स्वत: ला दृष्टी नसते. त्यामुळं त्याला सगळं जगही आंधळं असल्यासारखं वाटतं. जो रोगी असतो, त्याच्या तोंडाला रोगामुळे चव नसते आणि त्यामुळे त्याला मिष्टान विषासारखं लागतं. माणसाचंही तसंच आहे. जो स्वतः शुद्ध नसतो, त्याला सगळं त्रिभुवन खोटं असल्यासारखं वाटतं.

डॉ. आ.ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( शुद्धता ७४ )

                     (शुद्धता  ७४)

जगात ज्या गोष्टी वाईट असतात, ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, त्या देखील आपल्यावर उपकार करतात, असा एक आगळा विचार तुकारामांनी एका अभंगात मांडला आहे. ते म्हणतात,

७४ 
वाइटाने भले हीनें दाविले चांगले ।।१।। एकाविण एका कैचे मोल होते फुका ।।२।।
विधे दाविले अमृत कडू गोड घाते हित ॥३॥
काळिमेने ज्योती दिवस कळो आला राती ॥४॥
उंच निंच गारा हिरा परिस मोहरा ॥५॥
तुका म्हणे भले ऐसे नष्टांनी कळले ॥६॥ 
(अभंग.क्र. १७२२)

जे वाईट आहे, त्याचा अनुभव घेतला, की जगात चांगलं काय आहे ते कळतं. म्हणजे वाईट गोष्टच आपल्याला चांगल्या गोष्टीची ओळख करून देते. जे हिणकस आहे, त्याच्याकडं पाहिलं, की दर्जेदार आणि अस्सल काय असतं, ते खऱ्या अर्थानं कळतं. जगात वाईट गोष्ट असल्याशिवाय चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. ती गोष्ट अतिशय मौल्यवान असूनही फुकट मिळण्यासारखी आहे, असं लोकांना वाटतं. विषामुळे अमृताचं मोल कळतं, कडू पदार्थामुळं गोड पदार्थाची किंमत कळते घात करणारी गोष्ट अनुभवली, की हितकारक गोष्टीचं महत्त्व समजतं. काळिमा लावणाऱ्या गोष्टीमुळे ज्योतीचं खरं स्वरूप कळतं. रात्रीमुळे दिवसाचं महत्व समजतं. ओबडधोबड गारगोटीमुळं हिरा, परीस, मोहरा यांचं महत्त्व कळतं. अशा रीतीनं दुर्जनांमुळं सज्जनांचं महत्त्व कळतं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( शुद्धता ७३ )

                    (शुद्धता  ७३)

         आपलं वर्तन विशुद्ध असावं, चारित्र्य निर्दोष असावं, यावाबतीत तुकाराम अतिशय आग्रही होते. एका अभंगात ते म्हणतात,

७३ 
शुद्धबीजा पोटीं । फळे रसाळ गोमटी ।।१।।
मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥२॥ 
सर्वांग निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ || ३ ॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ।। ४ ।। (अभंग. क्र. ६२)

          जे बीज शुद्ध असतं, त्याचा वंशविस्तार झाल्यानंतर त्याला येणारी फळंही तशीच शुद्ध असतात, रसाळ आणि सुंदर असतात. म्हणून माणसानं आपल्या तोंडी अमृताची वाणी असू द्यावी. याचा अर्थ लोकांशी बोलताना जे हिताचं असेल, कल्याणाचं असेल आणि मधुरही असेल, ते बोलावं, आपला देह, आपलं सगळं जीवन हे कारणी लावावं, चांगल्या कामासाठी खर्ची घालावं. मन गंगेच्या पाण्याप्रमाणं सर्व बाजूंनी निर्मळ ठेवावं. आपलं अवघं जीवन असं बनलेलं असलं, म्हणजे आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांची सगळी दुःख दूर होतात. आपल्या भेटीनं त्यांचे ताप नाहीसे होतात, त्यांना विसावा मिळतो, मनःशांती मिळते, त्यांचे जीव सुखावतात.

डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

Friday, 2 September 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( सत्य ७२ )

                      सत्य ७२

            सगळी माणसं माणूस म्हणून समान असली, तरी चारित्र्य, शील, कर्तृत्व इ. कारणांनी त्यांच्यामधे योग्य तो फरक करणं, हेच विवेकाचं लक्षण असतं. काही उदाहरणांच्या द्वारे हे स्पष्ट करताना तुकाराम म्हणतात,

७२ 
दह्याचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागो नये ॥१॥ 
आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणे । दोहींशी समान पाहो नये ।।२।। 
पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी संसाटी करू नये ।।३।।
तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजू नये ॥४॥

(अभंग. क्र. २४९२)

            एकाच दह्यामधून ताक आणि लोणी निघतं. ते एकाच ठिकाणाहून निघालं आहे. एवढ्या कारणानं त्या दोन्ही पदार्थांना एकाच किमतीत मागू नये. आकाशामधे चंद्र आणि तारांगणं असतात. परंतु दोघांकडं समान दृष्टीनं पाहू नये. पृथ्वीच्या पोटी हिराही सापडतो आणि गारगोटीही सापडते, परंतु दोहोंना समान मानू नये. त्याच पद्धतीनं संत परोपकार, करुणा, शील इ. कारणांनी सर्वसामान्य लोकांपेक्षा अधिक उन्नत असतात. म्हणून, त्या दोघांना समान मानू नये. उलट, सामान्य माणसांनी संतांच्या जीवनाचा आदर्श आपल्या नजरेसमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी. आपल्याला प्रेरणा देणाऱ्या सर्व महामानवांच्या बाबतीत आपला हाच दृष्टिकोण असावा.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( सत्य ७१ )

                ‌‌     सत्य ७१

माणसानं जीवनाच्या प्रवासात निर्भेळ सत्य मिळवावं, हे सांगताना ते म्हणतात, 

७१ 
थोडे परी निरे । अविट ते घ्यावे खरे ॥ १॥
घ्यावे जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥२॥
चित्त ठेवी ग्वाही । आणिकांशी चाड नाही ॥३॥
आपले ते हित फार । तुका म्हणे खरे सार ॥४॥

 (अभंग. क्र.५७८)

माणसानं जे विशुद्ध आणि खरं असेल, ते घ्यावं. ते थोडं असलं, तरी त्याची गोडी अबीट असते. तेच हितकारक असतं. ज्यामुळं नुकसान होणार नाही, ते घ्यावं. ते थोडं असलं, तरी आपोआप वाढत जातं. एका बीजाच्या पोटी वाढता वाढता असंख्य बीजं निर्माण होतात. सत्यही असंच वाढत जातं. आपण जे स्वीकारतो, ते सत्य आहे अशी आपल्या मनानं ग्वाही देणं, हे खरं महत्त्वाचं असतं. इतर लोक काय म्हणतात, याची पर्वा करण्याची गरज नसते. सारभूत सत्य प्राप्त होणं, हे आपलं खरं हित असतं. आपण त्याच्यावरच लक्ष केंद्रित करावं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( सत्य ७० )

                        सत्य ७०

असत्याचा प्रसार करणाऱ्या दुष्टांसारखं आपलं वर्तन नाही, हे तुकारामांनी आवर्जून सांगितलं आहे. ते म्हणतात,

७० 
नव्हे खळवादी मता च पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥ १॥ 
साक्षत्वेसी मना आणावी उत्तरे । परिपाकी खरे खोटे कळे ॥२॥
नव्हे एकदेशी शब्द हा उखता । ब्रह्मांडापुरता घेईल त्यासी ॥३॥
तुका विनवणी करी जाणतिया । बहुमतें वाया श्रमो नये ॥४॥

(अभंग. क्र. १४६४) 

          एखादा मनुष्य आपली दुष्टपणाची मतं मांडत असतो. त्याचं सगळं बोलणं आपली या प्रकारची मतं मांडण्यापुरतंच मर्यादित असतं. मी या माणसासारखा नाही, माझा उपदेश हा सत्याची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आहे, असं स्पष्ट आत्मनिवेदन तुकारामांनी केलं आहे. सत्य-असत्य यांच्या बाबतीत साक्षच काढायची असेल, तर दुष्टाचं बोलणं आणि माझं बोलणं यांची तुलना करावी, म्हणजे अखेरीस खरं काय आणि खोटं काय ते कळू शकेल, असं ते म्हणतात. माझा शब्द, माझं बोलणं, माझा उपदेश एकांगी वा संकुचित नाही, जो कोणी त्याला समजून घेईल त्याच्या दृष्टीनं तो विश्वव्यापक आहे, असंही ते म्हणतात. आत्मविश्वासानं आणि निर्धारानं हे नोंदविल्यानंतर ते जाणत्या लोकांना एक विनवणी करतात. दुष्ट माणसं आपली जी खूप काही मतं मांडत असतात, त्यांच्या नादी लागून आपले श्रम वाया घालवू नयेत, ही त्यांची विनंती आहे. एकीकडून आत्मविश्वास आणि दुसरीकडून विनम्रता, हा त्यांच्या या अभंगाचा खास वेगळेपणा आहे.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक (सत्य ६९ )

                      सत्य ६९

          तुकारामांनी आयुष्यभर आपल्या अभंगांतून सत्याचा गौरव केल्याचं आढळतं. ते म्हणतात,

६९ 
जाणावे ते सार । नाही तरी दगा फार ।।१।।
डोळे झांकिलिया रवि । नाही ऐसा होय जेवी ॥२॥ 
बहुथोड्या आड निवारिता लाभ जाड ।।३।।
तुका म्हणे खरे । नेले हातीचे अंधारें ।।४।।

(अभंग. क्र. २०८७)

        जे सारभूत आहे, यथार्थ सत्य आहे, ते जाणावं. नाही तर माणसाची मोठी फसवणूक होते. असत्याच्या पाठीमागं धावणाराला मोठा फटका बसतो. सत्य कधी लपून रहात नसतं. ते सूर्याप्रमाणं स्वयंप्रकाशी असतं. सूर्य प्रकाशत असतानाही आपण डोळे मिटून घेतले, तर सूर्य जणू काही अस्तित्वात नाही, असा भास होऊ शकतो. सत्याच्या बाबतीतही अशीच स्थिती असते. आपण सत्याकडं डोळेझाक केली, तरी सत्याचं अस्तित्व लोप पावत नाही. सत्याच्या आड येणारे जे काही थोडे बहुत अडथळे असतात ते दूर केले, की आपल्याला मोठा लाभ प्राप्त होतो. याउलट, आपण अज्ञानाच्या अंधारालाच चिकटून बसलो, तर सत्य आपल्याला दुरावतं. असं घडू नये, म्हणून आपण सावध रहावं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( आघात ६८ )

                    आघात ६८

          फळांच्या पक्वतेच्या संदर्भात तुकारामांनी एकापेक्षा एक सरस असे किती तरी अभंग लिहिले आहेत. त्यांपैकी एका अभंगात ते म्हणतात,

६८ 
फळ देठीहून झडे । मग मागुते न जोडे ।।१॥
 म्हणोनि तातडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥२॥
पुढे चढे हात । त्याग मागिला उचित ।।३।।
 तुका म्हणे रणीं । नये पाहो परतोनि ।। ४।।

 (अभंग. क्र. १८४६)

फळ एकदा देठापासून तुटलं, की नंतर ते मूळ जागी जोडलं जात नाही. म्हणून ते क असताना तोडण्याची घाई करू नये. अशा प्रकारची घाई खोटी म्हणजे हानिकारक ठरते. औचित्य सांभाळलं, योग्य वेळी योग्य गोष्ट केली, तर ती सत्कारणी लागते. यशस्वी होते. जे फळाच्या बाबतीत, तेच जीवनातील इतर घटनांच्याही बाबतीत घडतं. म्हणून पुढची गोष्ट पक्केपणानं हाती लागल्यानंतरच आधीची गोष्ट सोडणं योग्य ठरतं. याचा अर्थ त्या त्या कामाच्या बाबतीतही परिस्थिती पक्व होणं आवश्यक असतं. प्रत्येक गोष्टीचं फळ मिळण्यासाठी योग्य वेळ जावा लागतो. म्हणून घाईघाईनं कोणताही निर्णय घेऊ नये. सर्व बाजू समजावून घेतल्याशिवाय, मागचा पुढचा विचार केल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलू नये. एकदा विचारपूर्वक पाऊल उचललं, की मग मात्र माघार घेऊ नये. एकदा रणांगणात उतरल्यानंतर फिरून मागं पाहू नये.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक (आघात ६७ )

                    आघात ६७

          घाव सोसण्याचाच विषय तुकारामांनी आणखी एका अभंगात आग्रहानं मांडला आहे. ते म्हणतात, 

६७ 
मस्तकीं सहावे ठाकियासी जाण । तेव्हा देवपण भोगावे गा ॥ १ ॥ 
आपुलिये स्तुती निंदा अथवा मान । टाकावा थुंकोन पैलीकडे ।। २ ।। 
सदगुरुसेवन ते चि अमृतपान । करुनी प्राशन बेसावे गा ।। ३ ।।
आपुल्या मस्तक पडोत डोंगर । सुखाचे माहेर टाकू नये ।। ४ ।। 
तुका म्हणे आता सांगू तुला किती ?। जिण्याची फजीती करू नये ॥ ५ ॥

(अ.क्र.४२१४)

एखादा सामान्य दगड असतो. त्यानं जर आपल्या मस्तकावर टाकीचे घाव सोसले, तर तो देव बनतो. दगड असूनही घाव सोसल्यामुळं त्याला देवपण भोगायला मिळतं. अर्थात, असे घाव सोसण्यासाठी मनामधे एक प्रकारचं धैर्य, स्थैर्य आणि संतुलन असावं लागतं. जीवनाच्या प्रवासात कुणी स्तुती करतं, कुणी निंदा करतं, कुणी मान देतं. परंतु माणसानं त्या सर्व अवस्थांतून जाताना मनाचं संतुलन टिकवावं. या प्रकारच्या गोष्टींमधे अडकून पडण्याची भावना बाजूला सारावी; ती भुंकूनच टाकावी आणि तिच्या पलीकडं जावं, असं म्हटलं तरी चालेल. अशा गोष्टींमधे अडकून पडण्यापेक्षा आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सज्जन गुरूच्या सहवासात रहावं, त्याचा उपदेश हे अमृतच मानून त्याचं प्राशन करावं आणि त्याचा आनंद घेत स्वस्थ रहावं. आपल्या मस्तकावर संकटाचे डोंगर पडले, तरी त्यांची पर्वा करू नये. संतांच्या सहवासात जे सुख मिळतं, ते गमावू नये. हा सहवास म्हणजे जणू काही सुखाचं माहेर असतं आणि ते हरवून बसू नये. याउलट, घाव सोसायचे नाहीत, स्तुती आणि निंदा यांच्यात अडकून पडायचं, संतांचा सहवास टाळायचा आणि मस्तकावर संकट आलं की खचून जायचं, हा प्रकार आपल्या जिंदगीची फजिती करणारा असतो. तुकाराम जणू काही आपल्या सर्वांना कळवळून सांगत आहेत, की अशी फजिती करून घेऊ नका.

डॉ.आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक (आघात ६६ )

                   आघात ६६

          अनेक प्रकारचे आघात पचविल्यानंतर माणसाचं व्यक्तिमत्व परिपक्व बनतं, हा आशय मांडताना जनावराला माणसाळविण्याच्या प्रक्रियेचा दाखला तुकारामांनी एका अभंगात फार सुरेख रीतीनं दिला आहे. एका अभंगात ते म्हणतात,

६६ 
पाठेळ करिता न साहावे वारा। साहेलिया ढोरा गोणी चाले ।। १ ।। 
आपणा आपण हे चि कसवटी । हर्षामर्थ पोटी विरो धावे ।। २ ।। 
नवनीत तोंवरी कडकडी लोणी । निश्चळ होऊनी राहे मग ॥ ३ ॥
तुका म्हणे जरी जग टाकी घाया । त्याच्या पडे पायां जन मग ॥ ४ ॥

(अभंग. क्र. २४०१)

एखादं ओझ्याचं जनावर जोपर्यंत नीट माणसाळलेलं नसतं, अगदी तरुण आणि अप्रशिक्षित असतं, तोपर्यंत त्याच्या ठिकाणी एक अनिर्बंध असा बेफामपणा असतो. त्याच्या पाठीवर ओझं ठेवण्याची गोष्ट दूरच, वाऱ्याचा स्पर्श झाला तरी ते थयथयाट करू लागतं. वाराही सहन न होण्याइतका त्याचा स्वभाव त्यावेळी उद्दाम असतो. पण तेच जनावर एकदा का नीट माणसाळलं, की मग मात्र त्याच्या पाठीवर मालानं भरलेल्या गोण्या टाकल्या, तरी ते यत्किंचितही प्रतिकार न करता, कसलीही खळखळ न करता निमूटपणे त्या गोण्या वाहून नेतं. जणू काही दोन ध्रुवांमधे असावं, इतकं अंतर त्याच्या वागण्यात निर्माण होतं. एखाद्या खोडाला जेव्हा पहिल्यांदा बैलगाडी, कुळव, नांगर वगैरे औताला जुंपलं जातं, तेव्हा तो प्रसंग एका परीनं शेतकऱ्याची परीक्षा घेणाराच असतो. तो खोड आपल्या ताकदीच्या जोरावर आपल्या जोडीच्या बैलालाही हवं तिकडं खेचून बैलगाडी वा औत उधळून टाकतो. एखादा अपघात घडवितो. पण हळूहळू तो रुळतो आणि पुढं खांद्याला घट्टे पडल्यानंतर मानेवर कितीही जड जू ठेवलं, तरी कुठलाही गोंधळ न घालता शांतपणे शेतकऱ्याला सहकार्य करतो. हा शेतकऱ्याच्या जीवनात येणारा नेहमीचा अनुभव आहे.

           जीवनाचा प्रवास करणाऱ्या प्रत्येक माणसानं या घटनेवरून बोध घ्यावा, असं तुकारामांना वाटतं. तरुण वयात मनामधे एक प्रकारचं उतावळेपण असतं. कोणालाही न जुमानण्याची, कोणाचंही काही न ऐकण्याची, स्वच्छंदी आणि प्रसंगी उद्धट अशी मनोवृत्ती माणसाच्या ठिकाणी असते. ज्याला आपलं जीवन यशस्वी व्हावं असं वाटतं, त्यानं आपल्या अवखळपणाला आवर घातला पाहिजे. स्वतःच स्वतःला काही कसोटी लावली पाहिजे. काही नियमांत बांधून घेतलं पाहिजे. आपल्या ठिकाणी वादळाप्रमाणं घोंघावणारे हर्ष, क्रोम यांसारखे विकार आपल्या आतच विरू दिले पाहिजेत. त्यांना योग्य पद्धतीनं नियंत्रित केलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे आपल्या भावभावना, इच्छा आकांक्षा यांना योग्य वळण लावलं पाहिजे. त्यांच्यावर संयम ठेवला पाहिजे.
             तरुणपणात विकारांच्या आहारी जाणारा मनुष्य आणि क्रमशः स्वतःवर विजय मिळवून परिपक्व झालेला मनुष्य यांच्यामधे असलेलं अंतर स्पष्ट करण्यासाठी तुकारामांनी लोण्याचं उदाहरण दिलं आहे. दैनंदिन जीवनातील अत्यंत सामान्य घटनेच्या सूक्ष्म निरीक्षणातून तुकाराम कवित्वाची कोवळी पालवी कशी निर्माण करीत असत, याचा हा उत्तम पुरावा होय. लोणी कढविण्यासाठी त्याला उष्णता दिली, की जोपर्यंत त्याचा 'लोणीपणा' संपत नाही, तोपर्यंत ते कडकडतं. या रूपानं ते जणू काही आपली उच्छृंखलता प्रकट करतं. पण एकदा का त्याचं तुपात रूपांतर झालं, की मग ते निशळ होऊन राहतं, जणू काही शांत, निर्विकार बनतं. त्याचा कच्चेपणा लोप पावतो. जो दगड टाकीचे घाव सोसूनही टिकून राहतो, त्याला देव मानून लोक त्याच्या पाया पडतात.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८